सासष्टी: पक्षाची ध्येय धोरणे सामान्यांतील सामान्यांपर्यंत पोहोचविणे गरजेचे आहे. हे काम करण्याची जबाबदारी प्रत्येक कार्यकर्त्याची असून प्रत्येक सक्रिय कार्यकर्त्याने स्वतःला कार्यकर्ता न मानता नेता मानून पक्षकार्य पुढे न्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज मडगावात केले.
भाजपच्या ४५व्या स्थापना दिनानिमित्त पक्षाने १३ एप्रिल पर्यंत अनेक कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज मडगावात दक्षिण गोव्यातील सक्रिय कार्यकर्त्यांचे संमेलन आयोजित करण्यात आले. त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
त्यांनी देशात व गोव्यात भाजप सरकारने साधन सुविधा, आर्थिक, शिक्षण, आरोग्य, तंत्रज्ञान व समाज कल्याण या क्षेत्रांमध्ये भरीव प्रगती केल्याचे सांगून जगातील इतर देशांचे लक्ष वेधले आहे,असे सांगितले.
आम्हाला २०३६ पर्यंत विकसित गोव्याचे लक्ष्य गाठले पाहिजे त्यासाठी कार्यकर्त्यांनी सदैव क्रियाशील रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
कॉंग्रेस पक्षावर टीका करण्याची संधी मुख्यमंत्र्यांनी सोडली नाही. लोकसभा निवडणुकीत या पक्षाने संविधान बदलाचा खोटा प्रचार केला,असेही सांगितले.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले की, भाजपमुळे देशात कायापालट झाला. जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पंचायत तथा वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेकर, नीलेश काब्राल, दाजी साळकर, गणेश गावकर, संकल्प आमोणकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
‘अखंड, विकसित भारत’साठी कटिबद्ध, श्रीपाद नाईक
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितले की, भाजप वर्षभरात विविध उपक्रम आयोजित करून कार्यकर्त्यांना सदैव सक्रिय ठेवण्याचा प्रयत्न करतो. कॉंग्रेसने त्यांचे सरकार असताना जो गोंधळ करून ठेवला तो आता निस्तरायचे काम पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकार करत आहे. भाजप धर्म व जात बाजूला सारून अखंड व विकसित भारताचे स्वप्न पहात आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजप कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.