सासष्टी: आदिवासी समाजाचे थोर नेते, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात महत्त्वाचे योगदान दिलेल्या भगवान बिरसा मुंडा यांची १५० जयंती भारतभर साजरी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आदिवासींचा विकास व त्यांनी दिलेल्या योगदानाची माहिती आजच्या तरुण पिढी व समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आदि कर्मयोगी अभियान सुरू करण्यात आले आहे. गोव्यातही जयंती मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येणार आहे.
त्या कार्यक्रमाची रुपरेषा ठरविण्यासाठी आज मडगावात रवींद्र भवनात आदिवासी कल्याण मंत्री रमेश तवडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीतील माहिती देताना मंत्री रमेश तवडकर यांनी सांगितले, की गोव्यात तालुकावार जागृती कार्यक्रम आयोजित केले जातील.
त्यानंतर मडगावात समारोप सोहळा आयोजित करण्यात येणार असून त्यात सायकल यात्रा व जाहीर सभा यांचा समावेश आहे. मात्र, हा कार्यक्रम नेमका कधी आयोजित करावा याचा निर्णय झालेला नाही, असे तवडकर यांनी स्पष्ट केले.
जर जिल्हा पंचायत निवडणुका जाहीर झाल्या व आचारसंहिता लागू झाली, तर कार्यक्रमात बदल करावा लागेल, असे त्यांनी सांगितले. कॉंग्रेसच्या काळात आदिवासी समाजाला योग्य न्याय मिळाला नाही व भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य जनतेसमोर आले नाही.
त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आदिवासी समाज सक्षम व्हावा यासाठी वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत व त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, असेही मंत्री तवडकर यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.