पणजी, कॉंग्रेसच्या गांधी घराण्याचे सल्लागार सॅम पित्रोदा यांनी वर्णद्वेषी उद्गार काढले आहेत. त्यांनी केवळ पदाचा राजीनामा देऊन भागणार नसून याबद्दल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गोमंतकीय जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी आमदार संकल्प आमोणकर यांनी गुरुवारी (ता.९) येथे भाजप कार्यालयातील पत्रकार परिषदेत केली.
पाटकर यांनी माफी न मागितल्यास त्यांची त्या वक्तव्याला सहमती आहे असे मानले जाईल, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माध्यम विभाग निमंत्रक प्रेमानंद म्हांबरे उपस्थित होते.
म्हांबरे म्हणाले, पित्रोदा यांचे वक्तव्य हे वांशिक, वर्णद्वेषी व घृणास्पद आहे. ते गांधी परिवाराचे मार्गदर्शक यावरून त्या पक्षाची मानसिकता दिसते. अयोध्येत श्री राम मंदिर उभारणीचा प्रयत्न झाला तेव्हा मंदिर का हवे, अशी विचारणा याच पित्रोदा यांनी केली होती.
भारताने बालाकोट येथे हवाई हल्ला करून अतिरेकी तळ उद्ध्वस्त केल्यावर भारतीय सेना दलाच्या सामर्थ्यावर पित्रोदा यांनीच प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. १९८४ मधील शिख विरोधी दंगली उसळल्यानंतर त्याचे समर्थनही त्यांनीच केले होते.
राज्यघटना लिहिण्यात जवाहरलाल नेहरू यांचे मोठे योगदान होते, असा शोधही त्यांनी लावला होता. अशा बुद्धिवान व्यक्तीने केलेले वक्तव्य पूर्ण विचारांतीच केले असणार म्हणून त्याबद्दल त्यांनी माफी मागितलीच पाहिजे.
काँग्रेसने जबाबदारी घ्यावी
आमोणकर म्हणाले, कोणाच्या वर्णावरून त्यांना हिणवणे हे कोणत्या प्रकारच्या माणुसकीत बसते ते कॉंग्रेसने सांगितले पाहिजे. पित्रोदा हे साधे व्यक्ती नाहीत. त्यांना गांधी घराण्याचे सल्लागार मानले जाते. याआधी कॉंग्रेस काळात झालेल्या अनेक गोष्टींचे श्रेय कॉंग्रेसने त्यांना दिले आहे.
आता त्यांच्या वक्तव्याची जबाबदारीही कॉंग्रेसने स्वीकारली पाहिजे. या माध्यमातून कॉंग्रेस फुटीचे विचार देशात पेरत आहेत. कॉंग्रेसचे कॅप्टन विरियातो यांचे ‘राज्यघटना गोमंतकीयांवर लादली’ हे वक्तव्यही याच सदरात मोडणारे आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.