पणजी: प्रियोळचे आमदार गोविंद गावडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्यानंतर अजून काही मंत्र्यांना खुर्ची रिकामी करावी लागेल, अशी चर्चा होऊ लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर 'आमचे मंत्रिपद अबाधित; 'त्या' केवळ वावड्या', अशा शब्दांत मंत्री फळदेसाई व मंत्री हळर्णकर यांनी शक्यता फेटाळल्या आहेत.
काही पत्रकारांनी शुक्रवारी (२० जून) प्रश्न केला असता फळदेसाई म्हणाले, "माझ्या बाबतीत ज्या चर्चा सुरू आहेत, त्या कोणत्या आधारावर ते मला ठाऊक नाही. परंतु इतके नक्की की त्या चुकीच्या आहेत. मी काल रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांना जे भेटलो ते खात्याशी निगडित कामांबाबत चर्चा करण्यासाठी! तसेच काही नागरिक मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते. "
"मंत्रिमंडळातील फेरबदल किंवा इतर बाबींवर कोणतीच चर्चा नव्हती. किंबहुना त्यासंबंधीचा प्रश्नच उद्भवत नाही. माझ्याकडे जे समाजकल्याण खाते आहे किंवा दिव्यांग खाते आहे, त्यात यापूर्वी जी प्रगती झाली नव्हती ती आता होत आहे. वारसा धोरण अंमलबजावणी, पर्पल फेस्तचे यशस्वी आयोजन होत आहे."
समाज कल्याण खात्याद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचे मानधन वेळेवर देण्यात येत आहे. त्यामुळे मला मंत्रिमंडळातून काढण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे फळदेसाई यांनी ठासून सांगितले. दरम्यान, मंत्रिमंडळ पुनर्रचने संदर्भात लोकांमध्ये उत्सुकता आहे. त्यासंदर्भात राजभवनाकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
मत्स्योद्योग मंत्री हळर्णकर म्हणाले, "भाजप पक्ष हा केडर बेस, विचारवंतांचा पक्ष आहे. जर कुणाला मंत्रिपदावरून काढायचे असेल तर विचार करून, चर्चा करून नंतर निर्णय घेतला जातो. मी मंत्री झाल्याच्या तिसऱ्या महिन्यापासून मला मंत्रिमंडळातून काढण्यात येणार आहे, अशा वावड्या उठत आहेत. त्यात तथ्य नाही. १९८८ साली सरपंच म्हणून निवडून आलो, तेव्हाचा नीळकंठ आजही तोच आहे."
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.