Ishan Kishan Fastest Hundred Record : भारतीय संघाचा धडाकेबाज यष्टिरक्षक-फलंदाज ईशान किशन सध्या ज्या फॉर्ममध्ये आहे, ते पाहता गोलंदाजांसाठी तो एक दहशत बनला आहे. प्रदीर्घ काळ भारतीय संघातून बाहेर राहिल्यानंतर ईशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा काही धावा कुटल्या की निवडकर्त्यांना त्याला पुन्हा सन्मानाने संघात बोलवावे लागले. न्यूझीलंडविरुद्धची टी-20 मालिका आणि टी-20 वर्ल्ड कप 2026 साठी भारतीय संघात निवड होताच, ईशानने आपल्या बॅटचा तडाखा दाखवत अवघ्या 33 चेंडूंत शतक ठोकले.
दरम्यान, 24 डिसेंबरपासून बीसीसीआयची (BCCI) महत्त्वाची मानली जाणारी 'विजय हजारे ट्रॉफी 2025-26' ही स्पर्धा सुरु झाली आहे. झारखंडकडून खेळताना ईशान किशनने पहिल्याच सामन्यात कर्नाटकसारख्या तगड्या संघाविरुद्ध मैदानाच्या चहुबाजूला फटकेबाजी केली. ईशानने पहिल्या 20 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. पण खरा खेळ त्यानंतर सुरु झाला. पुढच्या केवळ 13 चेंडूंत त्याने 50 धावा कुटून अवघ्या 33 चेंडूंत शतकाचा टप्पा गाठला.
या खेळीदरम्यान ईशानने 39 चेंडूंचा सामना करताना 125 धावा केल्या. यात त्याने 7 चौकार आणि तब्बल 14 गगनभेदी षटकार लगावले. त्याच्या या खेळीने केवळ झारखंडला भक्कम स्थितीत नेले नाही, तर जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांचे रेकॉर्ड्स मोडीत काढले.
ईशान किशनने (Ishan Kishan) 33 चेंडूंत ठोकलेले हे शतक 'लिस्ट-ए' क्रिकेटमधील जगातील चौथे सर्वात वेगवान शतक ठरले. याआधी जेक फ्रेझर-मैकगर्क (29 चेंडू), एबी डिविलियर्स (31 चेंडू) आणि साकिबुल गनी (32 चेंडू) यांनी हा पराक्रम केला होता. भारतातून लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या खेळाडूंमध्ये ईशान आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला. त्याने अनमोलप्रीत सिंह (35 चेंडू) आणि वैभव सूर्यवंशी (36 चेंडू) यांच्यासारख्या युवा खेळाडूंना मागे टाकले.
ईशान किशनच्या या यशाची नांदी 18 डिसेंबर रोजीच झाली होती. पुण्यात खेळल्या गेलेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 च्या अंतिम सामन्यात त्याने हरियाणाविरुद्ध 49 चेंडूंत 101 धावांची खेळी खेळून झारखंडला चॅम्पियन बनवले होते. त्या ऐतिहासिक विजयानंतर अवघ्या सात दिवसांत ईशानने पुन्हा एकदा शतकी खेळी खेळून आपण टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनसाठी पूर्णपणे तयार असल्याचे सिद्ध केले.
यंदाची विजय हजारे ट्रॉफी अत्यंत खास आहे, कारण बीसीसीआयने वरिष्ठ खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे निर्देश दिले आहेत. या स्पर्धेत विराट कोहली, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांसारखे मोठे स्टार्स खेळत आहेत. अशा दिग्गज खेळाडूंच्या उपस्थितीत ईशान किशनने जे वादळ निर्माण केले आहे, त्यावरुन 2026 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये तो सलामीवीर म्हणून टीम इंडियाची पहिली पसंती असेल, यात शंका नाही. झारखंडच्या या युवा खेळाडूने दाखवून दिले की, जिद्द आणि मेहनत असेल तर पुनरागमन केवळ शक्य नाही, तर ते ऐतिहासिकही असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.