Shubman Gill Injury: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेचा चौथा आणि अत्यंत महत्त्वाचा सामना बुधवारी (17 डिसेंबर) उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे खेळवला जात आहे. मात्र, सामना सुरु होण्यापूर्वीच भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली. टीम इंडियाचा उपकर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिल दुखापतीमुळे या महत्त्वाच्या सामन्यातून बाहेर पडला. इकाना स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात आता गिलच्या अनुपस्थितीमुळे भारतीय फलंदाजीच्या फळीत मोठा बदल पाहायला मिळणार आहे.
दरम्यान, लखनौच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियमवर आज हवामानाने खोडा घातला. थंडी आणि वाढत्या 'स्मॉग'मुळे मैदानावरील दृश्यमानता अत्यंत कमी झाली. निर्धारित वेळेनुसार संध्याकाळी 6:30 वाजता टॉस होणे अपेक्षित होते, परंतु दृश्यमानता कमी असल्यामुळे टॉस 20 मिनिटांसाठी पुढे ढकलण्यात आला. मैदानाच्या एका टोकावरुन दुसरे टोक दिसणेही कठीण झाले, ज्यामुळे खेळाडूंच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला.
टॉसला उशीर होत असतानाच भारतीय संघ (Team India) व्यवस्थापनाकडून मोठी अपडेट आली. शुभमन गिलच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तो या सामन्यात खेळण्यासाठी तंदुरुस्त नाही. त्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर बसावे लागले. उपकर्णधार असल्यामुळे गिलचे स्थान संघात निश्चित मानले जात होते, परंतु दुखापतीमुळे भारताला सक्तीने बदल करावा लागला. गिलच्या जागी आता संजू सॅमसंगला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळू शकते.
शुभमन गिल सध्या कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडत असला, तरी टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याची म्हणावी तशी कामगिरी दिसलेली नाही. या मालिकेतील मागील तीन सामन्यांतील त्याची आकडेवारी पाहिली तर तो सातत्याने फ्लॉप ठरत आहे. पहिला सामन्यात त्याने 4 धावा केल्या. दुसऱ्याही सामन्यात तो खातेही उघडू शकला नाही. तर तिसऱ्या सामन्यात तो 28 धावा करुन बाद झाला.
टी-20 क्रिकेटमध्ये सलामीवीराकडून आक्रमक खेळाची अपेक्षा असते, मात्र गिलची संथ फलंदाजी आणि सातत्य नसलेली कामगिरी यामुळे तो आधीच टीकाकारांच्या निशाण्यावर होता. अशातच दुखापतीमुळे बाहेर होणे त्याच्यासाठी आणि संघासाठी चिंतेची बाब आहे.
सध्या ही मालिका अत्यंत अटीतटीच्या वळणावर आहे. आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी भारतीय संघाने दोन सामन्यांत विजय मिळवला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने (South Afirca) एक सामना जिंकला आहे. आजचा चौथा सामना जर भारताने जिंकला तर मालिका भारताच्या खिशात येईल. मात्र, दक्षिण आफ्रिकेने बाजी मारली तर मालिका बरोबरीत सुटेल. गिलच्या अनुपस्थितीत आता भारतीय संघ सलामीला कोणाला संधी देतो आणि ही उणीव कशी भरुन काढतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.