Abhishek Sharma Record: भारतीय क्रिकेटमध्ये गेल्या काही वर्षांत युवा फलंदाजांनी टी-20 (T-20) फॉरमॅटमध्ये आपली एक खास ओळख निर्माण केली आहे. याच फलंदाजांपैकी एक असलेला अभिषेक शर्मा हा सध्या भारताच्या टी-20 संघाचा महत्त्वाचा भाग बनला आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीमुळे अल्पावधीतच त्याने मोठी लोकप्रियता मिळवली.
वर्ष 2025 मध्ये अभिषेक शर्माने टी-20 क्रिकेटमध्ये धावांचा पाऊस पाडला आहे. सध्या तो दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु असलेल्या 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करत आहे. या मालिकेतील उर्वरित तीन सामन्यांमध्ये जर अभिषेकने चांगली कामगिरी केली, तर त्याला भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याचा एक मोठा विक्रम मोडण्याची संधी आहे.
एका कॅलेंडर वर्षात टी-20 फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीने 2016 या वर्षात 31 टी-20 सामन्यांमध्ये तब्बल 1614 धावा करुन हा विक्रम प्रस्थापित केला होता. आता अभिषेक शर्मा विराट कोहलीचा हा 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ पोहोचला आहे. अभिषेक शर्माने 2025 या वर्षात आतापर्यंत एकूण 39 टी-20 सामन्यांमध्ये 1533 धावा जमा केल्या आहेत. यात त्याने 3 शतके आणि 9 अर्धशतके ठोकली आहेत. अभिषेकला विराट कोहलीचा 1614 धावांचा विक्रम मोडण्यासाठी आता केवळ 82 धावांची गरज आहे.
या यादीत अभिषेकने यापूर्वीच 'स्काय' म्हणजेच सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. सूर्यकुमार यादवने 2022 मध्ये 1503 धावा केल्या होत्या. त्यामुळे आता अभिषेकच्या निशाण्यावर थेट विराट कोहलीचा मोठा विक्रम आहे.
अभिषेक शर्माने या वर्षात आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये (T20 International) भारतासाठी खेळताना 790 धावांची भर घातली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका आणि वर्षातील उर्वरित सामने पाहता, तो फक्त टी-20 फॉरमॅटमधील नाही, तर आंतरराष्ट्रीय टी-20 मधील धावांमध्येही मोठी वाढ करु शकतो.
भारत (India) आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा टी-20 सामना आज, 14 डिसेंबर रोजी धर्मशाळा येथे खेळला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा असून या सामन्यात विजय मिळवून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल.
दक्षिण आफ्रिका मालिकेतील अभिषेक शर्माचे प्रदर्शन संमिश्र राहिले आहे. कटक येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात तो स्वस्तात बाद झाला होता. तो सामना भारताने 101 धावांच्या मोठ्या फरकाने जिंकला होता. न्यू चंदीगढ येथे झालेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यातही अभिषेक शर्माने डावाची सुरुवात केली, पण त्याला 8 चेंडूंमध्ये फक्त 17 धावा करता आल्या. या खेळीत त्याने दोन उत्तुंग षटकार लगावले. याच खेळीदरम्यान, तो एका कॅलेंडर वर्षात टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 षटकार पूर्ण करणाऱ्या भारतीय 'पॉवर हिटर्स'च्या विशेष यादीत सामील झाला. या सामन्यात मात्र भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
आता तिसऱ्या आणि निर्णायक टी-20 सामन्यात अभिषेक शर्मा विराट कोहलीचा (Virat Kohli) 9 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्यासाठी सज्ज आहे. त्याच्यावर केवळ संघाला विजय मिळवून देण्याचीच नाही, तर वैयक्तिक विक्रम नोंदवण्याचीही जबाबदारी असेल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.