Vijayanagar Empire influence in Goa and Hampi  Dainik Gomantak
गोंयकाराचें मत

Vijayanagara Dynasty: विजयनगरने बहामनी सल्तनतीकडून जिंकलेले गोवा, हंपीतील कृष्णदेवरायाची भव्य दगडी तुलाभार

Vijayanagar Empire influence in Goa and Hampi: राजा कृष्णदेवराय तराजूच्या एका पारड्यात बसे आणि दुसऱ्या पारड्यात मौल्यवान रत्ने आणि सोने घालून तुलाभार केला जात असे.

Sameer Panditrao

सर्वेश बोरकर

विजयनगर साम्राज्याच्या स्थापनेनंतर अवघ्या काही दशकांत जवळजवळ संपूर्ण दक्षिण भारत या साम्राज्याने जिंकला होता. गोव्यात १३८० ते १४७० अशी अनेक दशके विजयनगर साम्राज्याच्या अंतर्गत गोव्याची भरभराट झाली. एवढ्या विशाल साम्राज्याचा महान प्रतापी राजा हरिहर द्वितीय याने १३४४ ते १४०४ या त्याच्या कालावधीच्या अंतर्गत विजयनगर साम्राज्य अनेक प्रांतांमध्ये किंवा राज्यांमध्ये विभागले.

कोकण (कोकण-राज्य), उत्तर कन्नड आणि दक्षिण कन्नड (बाराकुर-राज्य आणि मंगळुरू-राज्य), उत्तर आंध्र (उदयगिरी-राज्य) आणि दक्षिण आंध्र (चंद्रगिरी-राज्य), उत्तर तमिळ (पदैविदु-राज्य), दक्षिण तमिळ (पांडिया-राज्य) आणि पूर्व तमिळ (मुलुवाई-राज्य) अशी विभागणी केली गेली.

प्रांतांचे प्रशासन सुरुवातीला मोठ्या प्रमाणात विकेंद्रित केले गेले होते. जिंकलेल्या क्षेत्रांना स्थानिक सरदारांच्या आधिपत्याखाली सामंत म्हणून राज्य करण्याची परवानगी होती. २९ ऑगस्ट १३८० रोजी हरिहर द्वितीय याच्या आदेशाने बहामनी सल्तनतीकडून गोवा जिंकल्यानंतर लगेचच मल्लप्पा वोडेयर म्हणजेच विरा वसंत-माधव राया (माधव मंत्री) याला कोकण-राज्याच्या महाप्रधानाचा दर्जा देण्यात आला, ज्याची राजधानी गोपकपट्टण किंवा गोवा होती.

माधव मंत्री त्यापूर्वी एकाच वेळी बाराकुर-राज्य(दक्षिण कन्नड) आणि उत्तर कन्नडाचा राज्यपाल म्हणून काम पाहत होते. विजयनगर साम्राज्याचा राजा हरिहर द्वितीयच्या दरबारातील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून त्यांनी संपूर्ण कोकण- कर्नाटक किनारपट्टीवर राज्य केले.

हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी जिथे संगीत, कला आणि शिल्पकला भरभराटीला आली. पर्शियन आणि युरोपियन प्रवाशांच्या, विशेषतः पोर्तुगिजांच्या इतिहासकारांनी असे म्हटले आहे की, हंपी हे तुंगभद्रा नदीजवळील एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते, जिथे असंख्य मंदिरे, शेती आणि व्यापारी बाजारपेठा होत्या.१५६५मध्ये मुस्लीम सल्तनतांच्या युतीने विजयनगर साम्राज्याचा पराभव केला; सहा महिन्यांच्या कालावधीत हंपी लुटण्यात आली आणि नंतर ते सोडून देण्यात आले, त्यानंतर शहर उद्ध्वस्त झाले.

हंपीमधील राजवाडा आणि राजघराण्यातील वापरासाठी सुमारे ४३ इमारती होत्या. आज राजवाड्याच्या पायथ्याशिवाय काहीही दिसत नाही. या संकुलात आपल्याला राजवाडे आणि इतर इमारतींचे अवशेष, पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या आणि कालवे दिसतात. हंपीमधील इमारती आज पूर्णपणे उद्ध्वस्त आहे.

प्राचीन काळात हंपी कसे दिसत असेल याची आपण फक्त कल्पना करू शकतो. विजया विठ्ठल मंदिर हे हंपीतील सर्वांत भव्य व विजयनगर शैलीतील वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना. त्याच्या स्थापत्यकलेचे आणि अतुलनीय कारागिरीचे वर्णन शब्दांत करता येत नाही. हे मंदिर श्रीकृष्णाचे एक रूप असलेल्या विठ्ठलाला समर्पित आहे .

Shivaji Maharaj statue

पूर्वाभिमुख असलेले हे देऊळ चौकोनी आराखड्याने आणि त्यात दोन बाजूंनी गोपुरे असलेले प्रवेशद्वार गोपुरांनी सुरक्षित केले गेले आहे. मंदिराच्या पूर्वेकडील पायऱ्या हत्तींच्या शिल्पांनी सजवलेल्या आहेत. मंदिराच्या दर्शनी भागावर चाळीस खांब आहेत. या प्रत्येक खांबाची उंची १० फूट आहे. विजया विठ्ठल मंदिरात चार दालने आहेत. दक्षिणेकडील दालनात खांबांचे वर्चस्व आहे ज्यामध्ये काही पौराणिक प्राणी, सिंह, हत्ती आणि घोडा यांची शिल्पे कोरलेली आहेत. या प्रत्येक खांबाच्या प्रमुख भागांवर कमळाच्या कळ्यांनी संपणाऱ्या भव्य अलंकृत शिल्पांचा समावेश आहे.

हम्पी येथील विठ्ठल मंदिराच्या मागील बाजूस दगडात सुंदर कोरलेली एक भव्य चौकट आहे. हंपीतील अवशेषांपैकी अजूनही शाबूत असलेल्या काही वास्तूंपैकी ही एक. ५ मीटर उंच ही रचना दगडाने सुंदर कोरलेल्या कमानीसारखी उभी आहे.

यालाच प्रसिद्ध विजयनगर साम्राज्याचा राजा कृष्णदेवराय यांचा दगडी तुलाभार म्हणून ओळखले जाते. दगडी तुळेच्या खालच्या बाजूला तीन जोडे किंवा हूक्स आहेत. तराजू लटकवण्यासाठी हे वापरले जात असावे. या तराजूचा वापर ‘तुलापुरुष दाना’च्या वेळी केला जात असे. जेव्हा राजा किंवा एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस किंवा सूर्य आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी राजा स्वत:च्या वजनाइतकी रत्ने आणि धातूंसारख्या मौल्यवान वस्तू मंदिरात किंवा लोकांना भेट म्हणून देत असे, ज्याला तुलापुरुष दान म्हणत.

अनेक मंदिरांमध्ये ही प्रथा आहे आणि ती अगदी अजूनही सुरू आहे. खास प्रसंगी, राजा कृष्णदेवराय तराजूच्या एका पारड्यात बसे आणि दुसऱ्या पारड्यात मौल्यवान रत्ने आणि सोने घालून तुलाभार केला जात असे. नंतर ते वाटत असत आणि मंदिरांमध्ये दान देत असत. कधीकधी धान्य, डाळी आणि इतर वस्तूंचे वजन करण्यासाठीही या रचनेचा वापर केला जात असे, ज्या नंतर मंदिरांमध्ये दान देत असत.

हंपीतील अवशेषांपैकी अजूनही शाबूत असलेल्या व दगडात सुंदर कोरलेल्या या भव्य चौकटीची रचना खास आहे. वरच्या बाजूला ठेवलेल्या सुंदर कोरीव दगडाची असलेली ही दोन खांबांची रचना सामान्यतः ‘राजा कृष्णदेवरायचा तराजू’ म्हणून ओळखली जाते. कारण त्याच्या उत्तर दिशेला कृष्णदेवराय आणि त्याच्या पत्नींचे चित्रण आहे. कोपऱ्यात कमानी असलेला उंच खांब तीन साच्यांनी बनलेल्या पायावर उभा आहे. उंच, बारीक खांबांच्या दोन जोड्या कंसांवर आहेत ज्यांच्या खांबांच्या चारही बाजूंना सिंहांनी सजवलेले आहेत. तराजूच्या खाली असलेले तीन लूप कदाचित वजनाचे तराजू लटकवण्यासाठी वापरले जात होते. इथे तुलाभारासाठी वापरलेला तराजू किंवा तुळा मात्र सध्या गायब आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT