संजय वालावलकर
गोव्याचे माजी मुख्यमंत्री तथा देशाचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांची आज पुण्यतिथी. २०१९ साली आजच्याच दिवशी वयाच्या ६३ वर्षी पर्रीकरांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर, सामान्यांमधील असामान्य नेतृत्व गमावल्याची भावना गोमंतकीयांसह देशवासीयांनी व्यक्त केली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोवा सदस्य संजय वालावलकर यांचे पर्रीकरांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते. पर्रीकरांच्या पुण्यतिथीनिमित्त ‘गोमन्तक’ने वालावलकर यांच्याशी खास संवाद साधला.
पर्रीकरांना जाऊन सहा वर्षे उलटली. मागे वळून पाहताना काय वाटते?
मनोहर हा माझा जवळचा मित्र. त्यांना जाऊन सहा वर्षे उलटली असली तरी आजही लोक त्यांची आठवण काढतात. केवळ गोव्यातच नव्हे तर राष्ट्रीय पातळीवर, देशाबाहेरही पर्रीकरांची आठवण काढली जाते. यातूनच पर्रीकरांनी काय कमावले आहे, याची प्रचिती येते. ते महान व दुर्मिळातील दुर्मीळ राजकारणी होते. त्यामुळे आजच्या राजकारण्यांनी याचा शोध घेतला पाहिजे की, पर्रीकरांना लोक आजही का ‘मिस’ करतात! कोरोनाच्या काळात अनेकांना पर्रीकरांची खूप आठवण झाली. मलाही याचे आश्चर्य वाटते अन् मी देखील याचा शोध घेत आहे. पर्रीकरांची उणीव आजही बारीक-सारीक गोष्टीत भासते. गोव्यातील कित्येक लोक पर्रीकरांना वैयक्तिकरीत्या भेटले नसतील. पण त्यांच्याही मनात पर्रीकरांविषयी आदर व प्रेम आहे. पर्रीकर हे त्यांच्या राजकीय प्रवासाबरोबरच, साधेपणासाठी ओळखले जायचे.
पर्रीकर आज असते तर काय फरक पडला असता? सध्या जे राजकारण चालले आहे, त्यात त्यांनी स्वतःला ‘अॅडजस्ट’ केले असते का ?
पर्रीकरांची संवाद साधण्याची पद्धत इतरांपेक्षा खूप वेगळी होती. ते नेहमीच ‘आऊट ऑफ बॉक्स’ विचार करायचे. त्यांची जीवनशैली खडतर होती. ते बुद्धिमान व हुशार व्यक्तिमत्त्व होते. नेहमीच ते मला बोलताना सांगायचे की, राजकारणातून मी लवकरच निवृत्ती घेईन व नंतर आम्ही शेती किंवा इतर व्यवसाय करू. लोकांनी सांगेपर्यंत ते कधीच राजकारणात राहिले नसते. कठोरपणे ते निर्णयांची अंमलबजावणी करायचे किंबहुना ते आपल्या भूमिकेवर ठाम असायचे. यातूनच पर्रीकरांचा गुण लक्षात येतो.
उत्पल पर्रीकर यांनी राजकारणात यावे असे वाटते का?
पर्रीकर कुटुंबीयांशी माझे चांगले व घरचे संबंध आहेत. उत्पल हा मला माझ्या मुलासारखाच. त्याला सक्रिय राजकारणात उतरायचे असेल तर खूप कष्ट घ्यावे लागतील. सध्याच्या बदलत्या राजकारणात परिश्रमाची आवश्यकता आहे. मनोहर पर्रीकरांनी सुरुवातीच्या काळात खूप मेहनत घेतली. आधी पर्रीकरांना कुणी जास्त महत्त्व देत नव्हते. मात्र, त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर व विश्वासावर लोकांची मने जिंकली. त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. शिवाय राजकारणात आकड्यांचे गणित चालते. त्यामुळे लोकांचे बहुमत असले पाहिजे व ही वस्तुस्थिती आहे.
राज्याच्या भविष्याबद्दल काय वाटते? पूर्वीचा आणि आत्ताचा भाजप यात काय फरक आहे?
तुम्ही मला चुकीचा प्रश्न विचारत आहात. मी यावर भाष्य करू शकत नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनाच हा प्रश्न विचारा. मला भाजपविषयी बोलण्याचा अधिकार नाही. मी संघाचा कार्यकर्ता आहे. काहीजण संघाचा सरकारमध्ये हस्तक्षेप होतो असे बोलतात. मात्र, त्यात तथ्य नाही. अनेक संघाचे स्वयंसेवक असतात, जे आज उच्चपदावर विराजमान आहेत. अशा वेळी आमच्या गाठीभेटी या स्वयंसेवक किंवा मित्र म्हणूनच होतात. सरकारच्या कारभारात आमचा हस्तक्षेप किंवा ढवळाढवळ नसते. अनेकदा पर्रीकर मला भेटायचे किंवा घरी यायचे तेव्हा कित्येकांना वाटायचे की पर्रीकरांना मी मार्गदर्शन करतो. या गोष्टी मला व पर्रीकरांना देखील हास्यास्पद वाटायच्या. त्याकडे आम्ही दोघेही मनोरंजन म्हणून बघायचो. लोकांना बाहेरून अनेक गोष्टी वाटतात, परंतु तर्क लावणे आणि सत्यता यात जमीन-आसमानाचा फरक असतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.