पणजीतील मळा तलावानंतर आता कांपाल तलावातील माशांचा मृत्यू ही केवळ एक स्वतंत्र घटना नाही. ती गोव्याच्या जलसंपत्तीवर ओढवलेल्या गंभीर संकटाची धोक्याची घंटा आहे. राज्यात जलप्रदूषण, जलाशयांची उपेक्षा आणि पाणीस्रोतांचे होत असलेले अवमूल्यन या विषयांवर चर्चा होते; परंतु प्रत्यक्ष कृती मात्र दिसत नाही. परिणामी, एकेकाळी जलसमृद्ध म्हणून ओळखला जाणारा गोवा आज स्वतःच्या जलस्रोतांच्या अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहे.
पूर्वी गोव्यात जवळपास प्रत्येक घराला विहीर होती. गावागावांत तलाव, तळी, झरे आणि ओढे हे केवळ पाण्याचे स्रोत नव्हते, तर सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचे केंद्र होते. शेती, जनावरे, घरगुती वापर आणि भूजल पुनर्भरण यासाठी हे स्रोत महत्त्वाचे होते. मात्र, नळपाणी योजना आल्या आणि लोकांचा स्थानिक जलस्रोतांशी असलेला संबंध तुटू लागला. विहिरी दुर्लक्षित झाल्या, तलाव गाळाने भरले आणि झरे कचऱ्याचे ठिकाण बनले.
आज अनेक गावांतील जुने तलाव नकाशावर आहेत; प्रत्यक्षात मात्र त्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.गोव्यातील अनेक जलाशय वापरातून गेले आहेत. काही ठिकाणी त्यांच्यावर अतिक्रमणे झाली, तर काही ठिकाणी त्यांची देखभालच बंद झाली. शासनाच्या विविध खात्यांमध्ये जबाबदारीची स्पष्ट विभागणी नसल्याने जलाशयांचे व्यवस्थापन नेमके कोण करणार, हा प्रश्न कायम राहिला आहे.
परिणामी, एखादी दुर्घटना घडली की चौकशीचे आदेश दिले जातात; पण मूळ प्रश्न मात्र कायम राहतो. जलप्रदूषणाचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनियंत्रित बांधकामे आणि सांडपाण्याचा विसर्ग. शहरी भागातील नाले, हॉटेल्स, व्यापारी आस्थापने आणि वाढती वसाहती यांमधून बाहेर पडणारे सांडपाणी अनेकदा जलाशयांत मिसळते. यामुळे पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण घटते आणि मासे मृत्युमुखी पडतात.
तलावातील माशांचा मृत्यू हा केवळ पर्यावरणीय प्रश्न नसून जलस्रोत आजारी पडल्याचा इशारा आहे. दुर्दैवाने हा इशारा गांभीर्याने घेतला जात नाही. आज पावसाळ्यात पाणी भरपूर दिसते म्हणून गोव्याला जलसंकट नाही, असा समज करून घेणे धोकादायक ठरेल. जलाशय नष्ट होत राहिले, भूजल पुनर्भरण कमी होत गेले आणि प्रदूषण वाढत राहिले, तर भविष्यातील पाणीटंचाई अटळ आहे. पर्यटन, उद्योग आणि वाढती लोकसंख्या यांचा ताण आधीच पाणीस्रोतांवर आहे.
माशांच्या मृत्यूच्या घटना हे केवळ वृत्तपत्रातील मथळे नाहीत; त्या गोव्याच्या जलव्यवस्थापनातील अपयशाचे जिवंत पुरावे आहेत. आजही तलाव, विहिरी आणि झरे वाचवण्यासाठी व्यापक मोहीम उभी राहिली नाही, तर उद्या गोव्याला पाणी असेल; पण शुद्ध पाणी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल. प्रश्न फक्त जलप्रदूषणाचा नाही, तर गोव्याच्या जलभवितव्याचा आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.