Goa News: शिवकाळात ‘राजद्रोह’ आणि ‘फंदफितुरी’ हा सर्वांत मोठा आणि अतिशय गंभीर गुन्हा समजला जात असे. असे कृत्य करणाऱ्यांना शिक्षा इतक्या कठोर होत की, त्यांच्या अनेक पिढ्यांच्या त्या लक्षात राहतील. मुधोळचे बाजी घोरपडे असोत, जावळीचे मोरे असोत वा अनाजी पंत. त्यांनी केलेले गुन्हे व त्यांच्या शिक्षा अनेकांसाठी जरब ठरली असावी.
आमच्या राज्यकर्त्यांनाही शिवरायांची आठवण येते, शिवजयंती दिनी. उत्सवापुरते शिवराय आठवतात, फेटे परिधान करून भाषणे होतात. परंतु दैनंदिन कारभारात तसूभरही अनुकरण दिसत नाही. ज्यांच्याकडे राज्य रक्षणाचे दायित्व येते, असे पोलिस दल भ्रष्टाचाराच्या वाळवीने पोखरले जावे हे सुराज्याचे लक्षण नव्हे.
लोकांच्या जमिनी हडपणाऱ्या टोळीचा म्होरक्या सिद्दीकीसमोर इमान विकणाऱ्या अमित नाईक पाठोपाठ पोलिस निरीक्षकाचे कॉल डिटेल्स गुन्हेगाराला देणारा उपनिरीक्षक आदित्य वेळीप निलंबित झाला. खाकी वर्दी अंगावर घातलेली माणसे भ्रष्टासुर बनल्याने सामान्यांना स्वत:च्या सुरक्षेस समर्थ बनावे लागणार आहे. भूबळकाव प्रकरणातील मुख्य संशयित सुलेमान याच्या कथित व्हिडिओमध्ये जे दावे केले आहेत ते धक्कादायक आहेत. सरकारला (Government) त्यावर खुलासा करून सत्य समोर आणावेच लागेल. सुलेमान याने राजकीय नेते, पोलिस अधिकाऱ्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत.
गोव्यात अर्थार्जनाच्या अयोग्य पंधरा मार्गांचा झपाट्याने स्वीकार होत आहे व या मार्गास राजाश्रय मिळत आहे हे भयावह आहे. अयोग्य मार्गाने मिळणारा पैसा आणि त्याचे परिणाम श्रीमद् भगवतगीतेतही सांगितले आहेत. तुमचे कर्म हे तुमच्या अस्तित्वाचे प्रमाण आहे. आम्ही गोव्यात जन्माला आलो म्हणून मूळ गोमंतकीय ठरत नाही. गोवा मुक्त होण्यास प्राणांची आहुती देणाऱ्या पन्नालाल यादव सारख्यांची आठवण याचसाठी येते. सिद्दीकीला तुरुंगातून सहीसलामत बाहेर काढणाऱ्या अमित नाईकने भ्रष्टाचार करून नोकरी मिळवली होती का, हेही तपासावे लागेल. यापुढे भ्रष्टाचारात सापडणाऱ्यांच्या पुढील पिढ्यांना सरकारी नोकऱ्या मिळणार नाहीत, अशी तरतूद करावी, तरच कारभार स्वच्छ राहील.
अमितसारखे पोलिस कर्मचारी राजद्रोह, मातीशी गद्दारी करत आहेत. राष्ट्रवादासाठी झटणाऱ्या संघटनांनी पुढे येऊन सरकारला जाब विचारायला हवा. ‘सुलेमान’सारख्या अट्टल गुन्हेगारांना पोलिस साथ देतात हे सहन होण्यापलीकडे आहे. पोलिसांना भविष्यात अनेक प्रलोभने येतच राहतील. ते सावध व समाधानी राहण्यासाठी जरब हवी. त्यासाठी शिवराय आज नाहीत. शिवरायांच्या अस्मितेचा वापर द्वेष पसरवण्यासाठी, राजकारण करण्यासाठी केला जातो. प्रशासकीय सेवेतील लोकांवर त्याचा यत्किंचितही परिणाम दिसत नाही.
लोकांनी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे कायम लोकांशी प्रामाणिक असावे लागतात व प्रशासकीय अधिकारी त्यांनी घेतलेल्या शपथेशी. जिथे वर्दीच पैसे देऊन मिळते तिथे त्या दिलेल्या पैशांची वसुली करणेही क्रमप्राप्तच असते. त्यातून ही भ्रष्टाचाराची (Corruption) न संपणारी साखळी सुरू होते. त्या साखळीच्या आधारे गुन्हेगारांना राजकारणी पोसतात आणि राजकारण्यांना गुन्हेगार. आज जाब विचारला नाही, तर उद्या पुन्हा दुसरा कुठला तरी सुलेमान हातावर तुरी देऊन निसटेल. कुठेतरी हे थांबले पाहिजे. लोकांनी, विचारवंतांनी याचा जाब विचारला पाहिजे. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे ‘अखंड सावध’ राहणे गरजेचे आहे. सावध जनताच समाधानी असते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.