गावचे गावपण जपलेले आमचे गाव म्हणजे होंडा. सत्तरी तालुक्यातील हे छोटेसे पण महत्त्वाचे गाव. या गावाला मोठा इतिहास नसला, तरी वाळपई–साखळी नंतर वर्दळीचे केंद्र म्हणून होंड्याची ओळख आहे. आकाराने छोटे असले तरी हे गाव मोठ्या जंक्शनचे काम करते. फोंड्याहून साखळी–डिचोलीकडे, पणजीहून वाळपईकडे किंवा केरीमार्गे कर्नाटकात जाणारे प्रवासी आमच्या गावातूनच जातात
या गावात ऐतिहासिक स्थळे नसली, तरी येथून अनेक ऐतिहासिक स्थळांना भेट देता येते. हरवळे येथील श्री रुद्रेश्वर मंदिर किंवा पर्ये येथील आजोबा देवस्थान या ठिकाणी जाण्यासाठी आमचे गाव सोयीचे आहे. आमच्या गावातही आजोबा देवस्थान असून ते गावाचे रक्षण करणारे दैवत आहे. पूर्वी होंडा हे अविकसित गाव होते. मात्र, मायनिंग सुरू झाल्यानंतर येथे लोकवस्ती वाढत गेली. त्यानंतर पिसुर्ले येथील औद्योगिक वसाहतीमुळे आसपासच्या गावांतून अनेकांनी येथे
स्थायिक होण्यास सुरुवात केली. त्यामुळे अनेक निवासी कॉलनी उभ्या राहिल्या; त्यापैकी नारायण नगर ही एक प्रमुख वसाहत आहे. पूर्वी गावचा बाजार लहान व अव्यवस्थित होता. बेळगावचे भाजीवाले रस्त्याच्या कडेला भाजी विकत असत. मात्र, आता ग्रामपंचायतीने सुविधायुक्त बाजार उभारला आहे. रविवार हा बाजाराचा दिवस असतो. या दिवशी ताजी भाजी, फळे, तसेच हंगामी उत्पन्न काण्णा, जांभळे, फणस, भाजीची केळी आणि विविध पालेभाज्या मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात.
इतर बाजारांच्या तुलनेत येथे भाजीपाला व फळे स्वस्त मिळतात. कारण बेळगावहून आलेल्या विक्रेत्यांना संध्याकाळपर्यंत माल विकून परत जायचे असते. त्यामुळे दर परवडणारे असतात. आमचे काही नातेवाईकही येथे येऊन मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. दिवसेंदिव होंडा बाजारातून खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. तुम्हीसुद्धा एकदा जरूर भेट द्या—आमचे होंडा गाव सर्वांचे स्वागत करणारे आहे.
‘मायनिंग’ कमी झाल्यामुळे अनेक जण आपापल्या गावी परतले, तरीही ते अधूनमधून येथे येतात. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे कोणीही परका वाटत नाही. लोकांच्या मोठ्या मनाचे कौतुक ऐकताना मनाला समाधान मिळते. गावातील सण, उत्सव मोठ्या गुण्यागोविंदाने साजरे केले जातात. होंडा गावाने आसपासच्या लोकांच्या उपजीविकेची, शिक्षणाची व आरोग्याची काळजी घेतली आहे.
येथे प्राथमिक उपचाराची साेय असल्यामुळे रुग्णांची थोड्या कारणासाठी धावाधाव होत नाही. येथील लोक शांत, समाधानी आणि कष्टाळू आहेत. हवामानही थंड व आल्हाददायक आहे, कारण वाघेरी डोंगराचे संरक्षण आहे. पूर्वी गावकऱ्यांना साखळी किंवा म्हापसा येथे जावे लागत असे; मात्र आता सर्व सुविधा गावातच उपलब्ध आहेत. सरकारी कार्यालये कमी असली, तरी सरकारी नोकरी करणारे लोक येथे मोठ्या प्रमाणात आहेत. लोक प्रामाणिकपणे कष्ट करून आनंदाने जीवन जगतात. दुसऱ्याचे सुख हिरावून घेण्याची प्रवृत्ती येथे नाही, असे मी अभिमानाने सांगू शकते.
सौ. स्नेहा चैतन्य धाकुरकर
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.