कौस्तुभ नाईक
बदल रातोरात झालेला नसून सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानातील बदलांमुळे आणि नव्या पिढीच्या भाषिक व सांस्कृतिक जाणिवेमुळे शक्य झाला आहे. आजची पिढी ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत शिकणारी पिढी नाही. ती ‘रील्स’च्या युगात वावरणारी पिढी आहे. आणि इथेच सत्ताधाऱ्यांची आयटी सेल फिकी पडली.
सोशल मीडियात २०१२ सालच्या दरम्यान हळूहळू बदल जाणवू लागला. भाजपच्या, मोदींच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना शिवीगाळ करण्यापासून ह्याची सुरुवात झाली. नंतर भाजपविरोधी असलेल्या लोकांचे पत्ते, फोन नंबर सार्वजनिक करून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देणे, आई-बहिणीवरून शिव्या देणे सुरू झाले. तुम्ही जर स्त्री असाल तर तुमचे अश्लील फोटोज बनवणे, चारित्र्यहनन करणे वगैरे सर्रास चालू होते.
कालांतराने कळले की, हे सर्व एका व्यवस्थेचा भाग होते ज्याला आपण आज ‘आयटी सेल’ म्हणतो. भाजपविरोधी बोलणाऱ्यांचे आवाज सोशल मीडियावरून गडप करणे हे त्यांचे मुख्य ध्येय होते. अनेकांनी नाईलाजाने अशा माध्यमातून काढता पाय घेतला व त्यापासून दूर राहणे पसंत केले. अशा प्रकारे लोकांना, खास करून स्त्रियांना गलिच्छ भाषेत ट्रोल करणाऱ्या काही अकाउंट्सना स्वतः पंतप्रधान फॉलो करत असत.
ह्याविषयी कित्येक लोकांना आवाज उठवूनही त्यांना फॉलो करणे पंतप्रधानांनी सोडले नाही. गेल्या दशकात हे एकदम नॉर्मल बनवले आहे आणि त्यामुळेच आपल्या राजकीय संवादात शालीनता राहिली नाही. ह्याचाच भाग म्हणून कदाचित महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भर विधानसभेत ‘भाडे के टट्टे’ सारखा शब्दप्रयोग करतात किंवा भाजप खासदार मुस्लिम खासदारांना संसदेत उग्रवादी आणि इतर अपमानजनक शब्द वापरतात.
इतकेच कशाला, ‘नीम का पत्ता कडवा है’ सारख्या घोषणा गोव्यात भाजपतर्फे दिल्या गेल्या आणि त्याचे समर्थन करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्षांना पत्रकार परिषदेत त्याचा अर्थ जाहीररीत्या सांगता आला नाही. राजकीय संवादात भाषेचे ताळतंत्र सुटण्याची कितीतरी उदाहरणे देता येतील. आयटीसेल कडून सुरू झालेले ट्रोलिंग विधानसभेत, संसदेत, पक्ष कार्यालयात पोचले आणि ज्यांची प्रतिमा उंचाविण्यासाठी हा सगळा अट्टाहास करण्यात आला ते पंतप्रधान नरेंद्र मोदी परवा मध्यरात्री इंस्टाग्रामवर येऊन ‘जेन-झी’ने त्यांना शिव्या देऊ नये म्हणून मागणी करत होते.
सोनिया गांधींना काँग्रेसची विधवा म्हणणारे, एखाद्या स्त्रीची छेड काढणाऱ्या पुरुषाप्रमाणे ‘दीदी, ओ दीदी’ म्हणून ममता बॅनर्जींना ललकारणाऱ्या मोदींवर आज तरुण पिढीने ही आत्मपरीक्षणाची वेळ आणली आहे, हेही नसे थोडके. सगळे हिशेब एकाच जन्मात चुकते करावे लागतात, अगदी तुम्ही नॉन बायोलॉजिकल असला तरीही.
गेल्या आठवड्याभरात हे जेन-झी नेमके काय प्रकरण आहे असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. एरवी चकार शब्दही न काढणाऱ्या पिढीने जगातील एका बलाढ्य सत्ताधारी पक्षाला आपल्यापुढे नमते केले, हे इतिहासात लिहिले जाईल. दहाबारा वर्षातील सत्ताधारी पक्षाची जी काही दहशत होती, तिला झटक्यात नाहीशी करून अनेकांची मग्रुरी वठणीवर आणली. हा बदल रातोरात झालेला नसून सोशल मीडियाच्या तंत्रज्ञानातील बदलांमुळे आणि नव्या पिढीच्या भाषिक व सांस्कृतिक जाणिवेमुळे शक्य झाला आहे.
आजची पिढी ही व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत शिकणारी पिढी नाही. ती ‘रील्स’च्या युगात वावरणारी पिढी आहे. आणि इथेच सत्ताधाऱ्यांची आयटी सेल फिकी पडली. इन्स्टाग्रामचा अल्गोरिदम केवळ तुमच्या फॉलोअर्सच्या आकड्यांवर चालत नाही, तर तो युझरच्या सहभागावर आणि कंटेंटच्या अस्सलतेवर काम करतो. व्हॉट्सॲपवर कोट्यवधी रुपये खर्चून पसरवलेली जुमलेबाजी वा ट्रोलिंग इथे अपयशी ठरते, कारण नव्या प्लॅटफॉर्मवर औपचारिक भाषणे वा द्वेष पसरवणारे व्हिडिओ लोक पहिल्या दोन सेकंदातच स्क्रोल करून निघून जातात.
त्याहून महत्त्वाचे म्हणजे, ‘जेन-झी’चे राजकीय विरोधाचे स्वरूप पूर्णपणे वेगळे आहे. त्यांनी समोरच्याच्या द्वेषाला द्वेषाने उत्तर दिले नाही, त्यांची विनोदबुद्धी हि उपरोध, आणि मीम्सचा वापर ह्यावर पोसलेली आहे. एका बाजूला पक्षाची प्रचंड खर्चिक, कॉर्पोरेट छापाची प्रचारयंत्रणा आणि दुसऱ्या बाजूला मोबाईलवरून उपरोधिक रील्स बनवणारे तरुण या लढाईत सत्तेचा फुगा फुटला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.