एक शुल्लक गोष्ट देखील मनुष्याच्या आयुष्यात महाभारत घडवू शकते. एका न्यायामूर्तींनी बेरोजगार तरुणांना अभावितपणे झुरळाची उपमा दिली आणि बेरोजगार तरुणांचे माथे भडकले. आधीच बेरोजगारीने त्रस्त झालेले हे तरुण झुरळ अर्थात ‘कॉक्रोच’ या एका शब्दाने इतके आक्रमक झाले की, बघता बघता त्या शब्दाचे वादळात रूपांतर झाले. महाराष्ट्रातून अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी गेलेल्या अभिजित दीपके याने तर या शब्दाला धरून ‘कॉक्रोच जनता पार्टी’ची घोषणा केली.
त्याच्या समर्थनार्थ लाखो लोक पुढे सरसावले. त्यात ‘नीट’चा झालेला घोटाळा, सीबीएससी परीक्षेत गोंधळ, शालांत परीक्षेतील गडबड यांची भर पडली आणि या सगळ्या परीक्षा गोंधळाला केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना जबाबदार धरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. परंतु नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा देण्यासाठी ते लाल बहादूर शास्त्री थोडेच होते. महत् कष्टाने मिळालेले मंत्रिपद कोण सहजासहजी सोडेल?
‘नीट’ परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटली आणि परीक्षा रद्द झाली. यामुळे भविष्यात डॉक्टर होण्याची स्वप्न पाहणारे विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांच्या मनावर आघात होणे अपरिहार्य होते. कारण त्या परीक्षेच्या तयारीसाठी मुले शहराच्या ठिकाणी राहून, कष्ट सोसून आणि रात्रंदिवस अभ्यास करून स्वप्न पूर्तीची वाट पहात असतात. अशावेळी अचानक परीक्षा रद्द होणे हा त्यांच्यासाठी मोठा आघात असतो. गरीब पालकांनी कर्ज काढून आपल्या मुलांना शहरात पाठविलेले असते. परीक्षा रद्द झाली की, पुन्हा तयारी, पुन्हा खर्च या सगळ्यांचा ताण मुलांवर येतो आणि मुले हताश-निराश होतात. गरिबांची मुले तर व्याकुळ होतात कारण आपल्या पालकांनी किती कष्टाने पैसे जमा केलेले असतात, याची जाणीव त्यांना असते.
आपल्या बापाला पुन्हा कर्जाच्या खाईत ढकलायची त्यांची इच्छा नसते. मानसिक ताण वाढला की, ती कोवळी मुले आत्महत्येकडे वळतात. ‘नीट’ परीक्षा रद्द झाल्याने सुमारे २२ ते २३ लाख मुलांचे कष्ट वाया गेले. मनावर आलेल्या ताण-तणावामुळे यातील अनेक मुलांनी आत्महत्या केल्या. यातील एका मुलीने आत्महत्या करण्यापूर्वी तर चिठ्ठीच लिहून ठेवली की, पुन्हा परीक्षेला बसण्याची तिची आता हिंमत उरलेली नाही. कारण ‘नीट’च्या तयारीसाठी तिच्या शेतकरी वडिलांनी साडेतीन लाखांचे कर्ज घेतले होते. घरची गरिबी असतानाही तिच्या वडिलांनी मुलीच्या स्वप्नपूर्तीसाठी हे कर्ज काढले होते, ते सगळे व्यर्थ गेले.
पुन्हा तिला आपल्या वडिलांना कर्जात ढकलायचे नव्हते आणि म्हणून तिने आत्महत्या केली. खरे तर शिक्षण व्यवस्थेने केलेला हा खून आहे. परीक्षा नियंत्रण करणारे सगळे सत्ताधारी पक्षाचे समर्थक आहेत, असे कळते. यामुळे त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता कमीच. सीबीएससी आणि दहावीच्या परीक्षेतील गोंधळामुळे साधारणपणे ३० ते ३५ लाख मुलांचे जीव टांगणीला लागले आहेत. मात्र, याविरुद्ध आवाज उठविणाराच अपराधी ठरतो, अशी आज स्थिती होऊन बसली आहे.
दरम्यानच्या काळात कॉक्रोच जनता पार्टीचा जनक अभिजित दीपके अमेरिकेतून माघारी आला आणि त्याने दिल्लीच्या जंतर मंतर मैदानावर जंगी आंदोलन उभे केले. लाखो तरुण यात सहभागी झाले. हे आंदोलन शांतीपूर्ण होते. पण याचा धसका केंद्र सरकारने घेतला. एखादे प्रकरण अंगाशी येते असे दिसले की, त्या विषयाला कलाटणी देण्यासाठी सरकारकडून भलताच मुद्दा बाहेर काढला जातो. काही सोशल मीडियावर (Social Media) आरूढ झालेले अंधभक्त हे कामाला लागतात. परीक्षेच्या घोटाळ्याच्या बाबतीत हीच रणनीती वापरली गेली.
एका खाजगी वृत्त वाहिनीच्या महिला पत्रकाराला खाजगी कोचिंग वर्ग घेणाऱ्या शिक्षकांना डिवचण्याचे कंत्राट दिले असे म्हणतात. तिने ते इमाने इतबारे पार पाडले. त्याला प्रत्युत्तर म्हणून बिहारमधील एका प्रामाणिक शिक्षकाने त्या महिला पत्रकाराची औकात दाखवून दिली. याचा राग येऊन तिने या शिक्षकाविरुद्ध दोन कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा ठोकला. आजवर लाखो मुलांना कमीत कमी फी घेऊन आणि गरीब मुलांना मोफत शिकवणी देणाऱ्या या शिक्षकाला खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. त्याच्या कोचिंग केंद्रावर हल्ला केला. आपल्या मिळकतीतून गरिबांना उत्तम उपचार मिळावेत म्हणून पाटणा येथे त्यांनी सुसज्ज इस्पितळ सुरू केले त्याच्यावर टाच आणण्याचा प्रयत्न झाला. वातावरण आणखीनच पेटले. म्हणजे परीक्षेतील घोटाळ्याचे प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा हा मुद्दा अपेक्षेप्रमाणे मागे पडला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.