दशावतार' हा मराठी चित्रपट सध्या सिनेमागृहात फार चांगला व्यवसाय करतो आहे. कोकणातील प्रसिद्ध अशा ‘दशावतार’ या लोकनाट्याचा वापर करून घेत, कोकणातल्या खाण उद्योगातील स्वार्थी प्रवृत्ती आणि त्यातून होणाऱ्या तिथल्या पर्यावरणाच्या ऱ्हासावर बोट दाखवण्याचा प्रयत्न हा चित्रपट करतो.
मात्र केवळ दशावतार आणि पर्यावरणाबद्दलचे लोकांचे प्रेम हे या चित्रपटाच्या यशामागचे कारण आहे असे मात्र म्हणता येणार नाही. हा विषय हाताळण्याच्या निमित्ताने चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ज्याप्रकारे व्यावसायिक खुबींची या चित्रपटात मांडणी केली आहे तीच खरे तर या चित्रपटाच्या यशाचे गमक आहे.
काय नाही या चित्रपटात? त्यात लगे रहो मुन्नाभाईची झलक आहे ('समझो हो ही गया' हे गाणे), सिल्वेस्टर स्टॅलन यांचा थोडासा 'रेम्बो' आहे, कमल हसन यांचा 'इंडियन' आहे, लोकभावनांना चेतावणारी सूडकथा आहे, कोकणात रुजलेले दाट रानावनांमधील देव-देवस्कीचे गूढत्व आहे, दशावतार तर आहेच आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चित्रपटातील साऱ्या अपप्रवृत्तींचे निर्दालन 'कन्व्हिन्सिंग'रित्या करणाऱ्या दिलीप प्रभावळकर या लोकप्रिय अभिनेत्याच्या अभिनयही त्यात आहे.
गुरु ठाकूर यांचे संवाद आणि त्यातील गाणी ही या चित्रपटाची आणखीन एक (सर्वात प्रामाणिक) मोठी ताकद आहे. या सर्व कारणांमुळे लोकांच्या भावनांना हा चित्रपट परिणामकपणे हात घालतो.
मात्र चित्रपटाचा मुख्य विषय असलेला 'तथाकथित विकासामुळे होत असलेली पर्यावरणाची हानी' हा आशय मात्र फारसा चर्चेत न येता, केवळ पार्श्वभूमी म्हणून त्यात येत असलेल्या दशावतार लोकनाट्याचीच अधिक चर्चा सर्वत्र होताना दिसते. हे मात्र या चित्रपटाचे अपयश आहे.
गोवा भाजप मंडळामार्फत आयोजित झालेल्या परवाच्या या चित्रपटाच्या विशेष खेळानंतर, चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी खास उपस्थित असलेले कलाकार आणि राजकारणीही त्यातील दशावतार या भागाबद्दलच अधिक बोलताना दिसून येत होते. चित्रपटाच्या कथेचा महत्त्वाचा भाग असलेला बेकायदेशीर खाण उद्योग आणि त्यातून होणारी पर्यावरणाची हानी याबद्दल मात्र कोणीही चकार शब्द उच्चारला नाही.
दशावतार लोककला हा एक भाग सोडल्यास बाकी या चित्रपटाची कथा गोव्यातील अनेक खाणभागाशी सहज जुळून जाणारी आहे. ज्याप्रमाणे या चित्रपटात लोकांच्या भावनेशी निगडित असणाऱ्या एका धार्मिक स्थानाला धोका निर्माण होतो तसाच धोका गोव्यातील खाण विस्तारीकरणात होत असल्याची उदाहरणे आहेतच. त्यामुळे हा चित्रपट गोव्यातील प्रेक्षकांनाही आपला असा नक्कीच वाटेल. त्यांनी तो अवश्य पाहायला हवा.
हा चित्रपट करताना दोन गोष्टी माझ्या डोक्यात होत्या. त्यातील पहिली म्हणजे दशावतारी लोककला, जी आपल्या कोकणात गेली ८०० वर्षे चालत आली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे, लहानपणापासून कोकणातील जंगले, तिथली जमीन, तिथले पाणी, तिथली टुमदार गावे हे जे मी बघत आलो आहे, ते आता बदलताना दिसते आहे. विकास हा व्हायलाच पाहिजे. त्याला पर्याय नाही पण विकास होत असताना आपण नक्की काय करतोय याचे भान आपल्याला असले पाहिजे आणि निसर्गाचा समतोल राखून विकास कसा साधला जाईल याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.
आपले पूर्वज घरासाठी एखादे झाड तोडत असताना इतर ठिकाणी शंभर झाडे लावत असत. निसर्ग आपल्याला जेवढे देतो तेवढेच आपणही निसर्गाला दिले पाहिजे हे सांगण्याची माझी इच्छा होती व त्यासाठी मी हा चित्रपट केला. मला वाटते जो सजग राजकारणी आहे, ज्याला समाजाची स्पंदने करतात तो या चित्रपटातील संदेश नक्कीच समजून घेईल अशी माझी अपेक्षा आहे.
- सुबोध खानोलकर, दशावतार चित्रपटाचे दिग्दर्शक
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.