<div class="paragraphs"><p>Goa AAP political position </p></div>

Goa AAP political position

 

Dainik Gomantak

गोवा निवडणूक

काय झालंय माझ्या ‘आप’ला?

दैनिक गोमन्तक

Goa Politics : एक गोष्ट आधीच स्पष्ट करतो, मी आता आम आदमी पक्षाचा रीतसर सदस्य राहिलेलो नाही.

मात्र त्या पक्षाच्या आदर्शवादी, रॉमॅन्टिक ध्येयधोरणांप्रतीची अनुप्रीती अजूनही हृदयांत आहे. तुम्ही एखाद्या व्यक्तीला ''आप' (Goa AAP) 'पासून अलग करू शकता पण त्याच्या अंतरांत असलेल्या ''आप''ला त्याच्यापासून विलग करू नाही शकत.

आणखीन एक सांगायचे म्हणजे हे लेखन ''आप''वर आसुड ओढण्यासाठी नाहीय. माझ्या जुन्या सहकाऱ्यांवर माझे आताही तितकेच प्रेम आहे. माझ्यावर स्वार झालेल्या एका प्रामाणिक टीकाकाराला वाट मोकळी करून द्यायची आहे, इतकेच.

हो, ''आप'' सध्या काही तडजोडी करतो आहे आणि ठाशीव असे राजकारण करताना दिसतो आहे. पण जेव्हा अन्य पक्ष कमरेचे सोडून भर चौंकात व्यभिचार करण्यास कधीही तयार असतात तेव्हा एकट्या ''आप''ने शुचितेचा दुराग्रह धरून चालणे शक्यच नसते.

तेव्हा लेखनास अनुज्ञा असावी...

तर, गोव्यांत ''आप'' जे करतो आहे त्यातले किती योग्य आहे आणि किती सर्वार्थाने अयोग्य आहे?

आधी आपण काय योग्य आहे ते पाहूया;

1. हिंदू मतदाराशी हृदयसंवाद साधणेः ज्या राज्यांतला 65 टक्के मतदार हिंदू आहे तेथे हे आवश्यकच नाही काय? राजकारणाविषयी गंभीर असलेला कोणताही पक्ष इतक्या मोठ्या मतदार समूहाला गृहित धरू शकत नाही. ह्यात जातीयवाद नाही किंवा ते मृदू हिंदुत्वही नाही. माझ्या आकलनानुसार ते लोकशाही तत्त्वांच्या चौकटींतलेच वर्तन आहे.

आणि जेव्हा आपण एका समाजाशी संवाद साधतो तेव्हा त्या समाजाला कळणाऱ्या भाषेचा, प्रतिकांचा आणि वाक्प्रयोगांचा वापर होणेही स्वाभाविक आहे.

तेव्हा ''आप''नेही हिंदूचे उत्सव आणि धार्मिक प्रतिकांविषयी बोलायला हवे आणि इथल्या आदिवासी कुणबी व वेळिपांच्या प्राचीन परंपरांवरही बोलायला हवे (गोव्यावर सच्चे प्रेम करणारे खरे गोंयकार ते हेच, उरलेले आपण केंवळ तोंडपूजा बांधतो आणि दिल्लीतून येणाऱ्या धनिकाला जमीन विकायला धावतो.

''आप''ने पोर्तुगीजांकडून गोवा परत मिळवू पाहाणाऱ्या शिवाजीमहाराजांच्या पराक्रमाविषयी बोलायला हवे, संभाजीमहाराजांची थोरवी सांगायला हवी. ह्या नायकांची शौर्यगाथा गोमंतकीय हृदयांत कायमचे स्थान मिळवून राहिलीय.

एक लक्षांत घ्या, ''आप''ला रा.स्व. संघाचे अपत्य ठरवण्याचे प्रयत्न होतात खरे पण त्या पक्षाने आजवर कधीच हिंदू धर्माला अन्य अल्पसंख्याकांच्या विरोधांत उठवलेले नाही. ते त्यांच्या गुणसूत्रांतच नाही. ''आप'' तेवढ्याच हिरीरीने मुसलमानांचे उत्सव साजरे करतो व ख्रिस्ती परंपरांचा आदर करतो आणि त्यामागे डाव्या बुद्धिवाद्यानी आपल्याला धर्मनिरपेक्षतेला प्रमाणपत्र द्यावे अशी अपेक्षा नसते.

2. ''आप''ची दुसरी जमेची बाजू आहे दिल्लीत यशस्वीपणे राबवल्या जात असलेल्या योजनांची हमी गोमंतकीयाना देणे. या योजनांचे अनुकरण अन्य कितीतरी पक्षांनी आपापली सत्ता असलेल्या राज्यांत केले आहे.

3. तिसरी जमेची बाजू आहे पक्षाने उभी केलेली निष्ठावान कार्यकर्त्यांची केडर. अथक परिश्रमांची तयारी असलेले हे कार्यकर्ते, जनतेचा विस्वास जोडून कार्यरत आहेत. आपची ही छुपी अमानत म्हणता येईल.

आता अयोग्य काय, याची चर्चा आपण करुया,

1. प्रत्येक पक्षाचा आपला असा एक वैचारिक गाभा असतो ज्याच्याबाबतीत तडजोड कधीच केली जात नाही. हा गाभाच त्या पक्षाचे वेगळेपण अधोरेखित करतो.

गांधी घराण्याच्या दोषांविषयी, त्रुटींविषयी सगळेच बोलतात, मात्र त्यानी आपल्या नियंत्रणाखालील कॉंग्रेस पक्षाने बहुविधता आणि उदारमतवादाशी कधीच तडजोड केलेली नाही.

तद्वतच नरेंद्र मोदी- अमित शहा आपल्या हिंदुत्ववादापासून ढळल्याचे उदाहरण नाही.

''आप''च्या विचारधारणेचा गाभा आहे भ्रष्टाचाराचा तिटकारा! म्हणूनच आता जेव्हा हा पक्ष भ्रष्टाचाराचे किटाळ अंगावर उसळलेल्याना पावन करून घेतो तेव्हा ते दुर्दैवी पाऊल वाटते. आताही आपमध्ये कोणतेच बालंट नसलेले मूल्यनिष्ठ, चारित्र्यवान व स्वच्छ नेते आहेत. त्यानाच अग्रभागी ठेवून कलंकिताना मागे ढकलणे आवश्यक आहे.

2. ''आप'' मनोहर पर्रीकरांसारख्या सर्वार्थाने भाजपाच्या मूल्यांची परंपरा पाळलेल्या माणसाचा एवढा उदोउदो का करतो हे मला कळत नाही. पर्रीकर ''आप''चे ''आयकॉन'' कसे होऊ शकतात? अरे, पर्रीकरांच्या गोव्याकडे पाहाण्याच्या दृष्टिकोनाशीच तर आम्ही हयातभर भांडत आलो! विरोधी पक्षनेता म्हणून त्यानी ज्या ज्या मुद्द्यांवर रण माजवले त्या सर्वच मुद्द्यांवर सत्तेत येताच घूमजाव केले. त्यांचा हा दुतोंडीपणा आम्हीच नाही का प्रकाशांत आणला! गोव्याला कॉंक्रिटच्या जंगलांत परावर्तीत करण्याचे त्यांचे स्वप्न आपल्याला आज आकर्षक का वाटते आहे?

पर्रीकरांच्या अंगी विलोभनीय असे नेतृत्वगुण होते हे मान्य. पण गोव्याला पर्यावरणीयदृष्ट्या स्वयंपोषक राज्य बनवण्यात त्याना अपयश आले, हेही खरेच. त्याना उचलून धरत असाल तर गोव्याची त्यांच्यापेक्षा अधिक चांगली सेवा करणाऱ्या प्रतापसिंह राणेंचा उदोउदो का करत नाही? त्या कळपांतून ''आप''ला एकही मत मिळण्याची शक्यता नाही म्हणून? हा तद्दन निराशावाद झाला!

3. मी चर्चा केलेल्या अनेक राजकीय विश्लेषकांचेमत आहे की ''आप'' भाजपा व कॉंग्रेसचीच खेळी खेळतो आहे आणि तिही त्याला नीट जमत नाहीय! तोच पैशांचा शिसारी आणणारा वापर, व्यक्तिकेंद्रित राजकारणाचा सोस, लंबीचवडी आश्वासने, तीच ती दांडगाई...

पण हे मुलतः त्या पक्षाच्या रक्तातच नाही. रजनीकांत आणि रणबीर कपूरचे मुष्टियुद्ध खेळण्यासारखेच आहे ते, शेवटी रजनीकांतच जिंकणार, हे ठरलेले!

मला माहीत आहे, सक्रिय कार्यापासून दूर असलेल्या मला हे लिहिण्याचा नैतिक अधिकार नाही. पण तरीही मी लिहितोय कारण, मला वाटते, या निवडणुकीत मांडवी पेटवण्याचे ''आप''चे मनसुबे अयशस्वी ठरले तरी 2022 नंतरही पक्षाला आपले नीतीधैर्य कायम ठेवायचे आहे.

त्यांच्या कडे निरपेक्ष वृत्तीने काम करणारे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे अथक जिद्द आहे. त्यांच्याकडे सेवाभाव आहे- जो कोविडकाळात प्रकर्षाने दिसून आला. आणि आरजी प्रमाणे त्यांच्यापाशी रस्त्यावर येऊन झुंजण्याची तयारी ठेवलेली केडरही आहे.

येत्या निवडणुकीबाबत माझे भाकीत सांगतो, गोमंतकीय मतदार घाण थोडीशी इकडची तिकडे करण्यापलिकडे जाणार नाही. तात्पर्य कॉंग्रेस किंवा भाजपा, किंवा तृणमूल वा मगो किंचित वेगळ्या अवतारात आपल्याला नाडण्याचे, पिळण्याचे काम इमाने इतबारे पुढे नेणार आहे. तीच लूट, तीच फसवणूक, तोच संहार आणि तीच नाटके आपल्या वाट्याला येतील.

एक छोटासा पर्याय आपल्यापाशी आहे, पण त्याकडे वळणारे अवघेच असतील, हे मी जाणतो.

प्रत्येक गोमंतकीय मतदाराने आपली पक्षनिष्ठा काहीकाळ बाजूस ठेवून सर्वार्थाने नवा उमेदवार निवडून देण्याचा प्रण करायला हवा, सध्याच्या आणि माजी आमदाराना नाकारायला हवे. म्हणजे नवख्या, छक्केपंजे माहीत नसलेल्या आमदारांवर नियंत्रण ठेवून त्यांच्यावर राज्याच्या हिताचे कायदे करण्यासाठी दबाव आणता येईल.

पण जर आपण नव्या बाटलीला भुलून जुनीच दारू परत आणली तर आपला कपाळमोक्ष ठरलेलाच

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa Goa: गोव्यात गृहमंत्री अमित शहांच्या सभास्थळी हृदयविकाराच्या झटक्याने वृद्धाचा मृत्यू

Loksabha Election 2024: दोन वर्षात मायनिंग सुरुळीत होणार, जाहीरनाम्यात मच्छिमार बांधवासाठी अनेक योजना; शाह गोव्यात काय म्हणाले?

Loksabha Election 2024: म्हापसामधून अमित शाह यांचा हल्लाबोल; ''भ्रष्टाचाराने लिप्त इंडिया आघाडी...’’

Loksabha Election 2024: ‘’भ्रष्टाचार, वॉशिंग मशिनचे राजकारण थांबवण्यासाठी अन्...’’; गोव्यातून शशी थरुर यांचा भाजपवर हल्लाबोल

VIDEO: ‘’नोव्हेंबर 2026 मध्ये भारताचे इतके तुकडे होतील...’’, पाकिस्तानी सिनेटरच्या वक्तव्याने वादंग

SCROLL FOR NEXT