गोव्यातील सर्वांत प्रसिद्ध आणि प्रख्यात जत्रांपैकी एक म्हणजे फातर्प्यातील श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीची जत्रा. ही जत्रा संपूर्ण गोव्यातील लोकांसाठी खास आकर्षण असते. असा एकही गोमंतकीय सापडणार नाही, ज्याने या जत्रेस कधीच हजेरी लावलेली नाही. मागणी प्रथेने प्रसिद्ध असलेली ही जत्रा पौष शुद्ध पंचमीपासून पौष शुद्ध दशमीपर्यंत म्हणजेच सलग पाच दिवस साजरी केली जाते. या काळात चार रथोत्सव होतात. सांस्कृतिक महत्त्वाबरोबरच या जत्रेला ऐतिहासिक महत्त्वही आहे आणि जत्रेच्या पहिल्या दिवशी म्हणजेच पौष शुद्ध पंचमीला होणार्या ‘नेम’ या प्रथेमागील इतिहास विशेष रोचक आहे.
‘नेम’ हा विधी म्हणजे जत्रेची सुरुवात. पौष शुद्ध पंचमीच्या रात्री कुंकळ्ळी गावातील १२ क्षत्रिय ‘वांगडी’ देवीचा आशीर्वाद घेऊन देवळाच्या प्रथम मंडपात आपल्या क्रमानुसार स्थान घेतात. यानंतर जल्मी (विधी सुरू करणारा प्रमुख) १२ वांगड्यांना हात देऊन ‘नेमाक बसया’ असे म्हणतो. त्यानंतर तो पाचव्या वांगडी(सोंबरो), वाजंत्री व इतर सेवाकऱ्यांसह फातर्प्यातील श्रीभूमिपुरुष सप्तकोटेश्वर शांतादुर्गा (फातर्पेकरीण) यांच्या मंदिरात जातो, देवीचे दर्शन घेतो आणि श्रीभूमिपुरुषाच्या मठासमोर फातर्प्याच्या नाईक देसाईंना फेटा बांधतो. यानंतर त्यांना मानपान देऊन सन्मानाने वाजतगाजत श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीच्या मंदिरात आणले जाते. येथे १२ ‘वांगड्यां’पैकी पहिल्या स्थानावर त्यांना बसवून पुढील विधींना सुरुवात होते.
सिद्धाचा गोसावी सर्वांना विभूती लावतो आणि या विधीने जत्रेच्या ‘नेमा’ला सुरुवात होते. या ‘नेमा’ला बसणाऱ्या ‘वांगड्यां’ना पुढील पाच दिवस काही बंधने असतात. जसे की देवळाचा परिसर सोडून अन्य ठिकाणी न जाणे, बाहेर शिजवलेले कुठलेही अन्न न खाणे, शेवटच्या महारथापर्यंत हा ‘नेम’ पाळला जातो. पंचमीला आलेला फातर्प्याचा हा देसाई पुढील पाच दिवस कुंकळ्ळीच्या १२ ‘वांगड्यां’सोबत जत्रेच्या सर्व विधींना उपस्थित राहतो.
या परंपरेचा उगम १५८३ च्या ऐतिहासिक घटनेत आहे. श्रीशांतादुर्गा कुंकळ्ळीकरीणीचे मूळ मंदिर कुंकळ्ळी गावात होते. जेव्हा पोर्तुगिजांनी साष्टी महाल ताब्यात घेतला, तेव्हा त्यांनी या परिसरातील सर्व मंदिरांचा विध्वंस केला व जबरदस्तीने ख्रिस्तीकरण केले. या अन्यायाविरोधात कुंकळ्ळीच्या क्षत्रियांनी पोर्तुगिजांविरोधात (Portuguese) लढा दिला. या लढ्यात अनेक युद्धे झाली आणि कुंकळ्ळीतील १६ महानायकांचा बलिदानाचा इतिहास आजही प्रसिद्ध आहे.
या कालावधीत पोर्तुगिजांच्या हल्ल्यांपासून देवीचा विग्रह वाचवण्यासाठी कुंकळ्ळीतील नाईक देसाई यांनी तो फातर्प्याला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फातर्पा हा बाळ्ळी महालाचा भाग असल्याने पोर्तुगिजांच्या हद्दीबाहेर होता. फातर्प्याच्या नाईक देसाई घराण्याने विग्रह ठेवण्यासाठी जागा दिली व पुढे मंदिर उभारण्यासाठीही सहकार्य केले. युद्धकाळातील या मदतीचे महत्त्व कुंकळ्ळीचे नाईक देसाई कधीही विसरले नाहीत. म्हणूनच जत्रेच्या पहिल्या दिवशी फातर्प्यातील श्रीभूमिपुरुष सप्तकोटेश्वर शांतादुर्गा (फातर्पेकरीण) देवीला व फातर्प्याच्या नाईक देसाई घराण्याला मान देण्यात येतो.
४००हून अधिक वर्षांपासून चालत आलेली ही परंपरा आजही अभंग आहे. या प्रथेशिवाय जत्रेला सुरुवात होऊ शकत नाही. ‘नेम’ ही प्रथा म्हणजे कुंकळ्ळी व फातर्पा या दोन गावांतील मैत्रीचे अद्वितीय प्रतीक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.