बांगलादेशच्या राजबारी जिल्ह्यात बुधवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. प्रवाशांनी खचाखच भरलेली एक खाजगी बस अनियंत्रित होऊन थेट पद्मा नदीच्या खोल पात्रात कोसळली. या भीषण अपघातात आतापर्यंत २३ प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस राजबारी येथून राजधानी ढाकाकडे जात होती. 'सौहार्दो परिवहन'ची ही बस दौलतदिया फेरी टर्मिनल क्रमांक ३ जवळ पोहोचली तेव्हा ही दुर्घटना घडली. बस फेरीवर चढण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस वेगाने नदीत पडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये ४० ते ५० प्रवासी होते आणि विविध थांब्यांवरून प्रवासी घेतल्यामुळे बस पूर्णपणे भरलेली होती.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल आणि नौदलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संध्याकाळची वेळ असल्याने आणि नदीत अंधार पसरल्याने बचावकार्यात प्रचंड अडचणी आल्या. पोलीस निरीक्षक रसेल मुल्ला यांनी सांगितले की, "रात्रीच्या वेळी दृश्यमानता कमी असल्यामुळे काही काळ काम थांबवावे लागले होते, परंतु पहाटेपासून पुन्हा युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे." 'हमजा' नावाच्या विशेष बचाव जहाजाच्या मदतीने सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर नदीत बुडालेली बस बाहेर काढण्यात प्रशासनाला यश आले.
नदीकिनारी जमलेल्या नातेवाईकांच्या आक्रोशाने परिसर सुन्न झाला होता. या अपघातातून सुदैवाने बचावलेल्या अब्दुल अजीजुल या प्रवाशाने आपली व्यथा मांडताना सांगितले की, तो पोहून किनाऱ्यावर आला, पण डोळ्यादेखत त्याची पत्नी आणि मुलगा लाटांमध्ये गडप झाले. अनेक कुटुंबे आपल्या प्रियजनांच्या प्रतीक्षेत नदीकाठी रात्रभर बसून होती. प्रशासनाकडून अद्याप बेपत्ता लोकांचा शोध घेतला जात असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.