Montha Cyclone Latest Update: बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या 'मोन्था' (Montha) चक्रीवादळाने मंगळवारी (28 ऑक्टोबर) सकाळी तीव्र चक्रीवादळाचे रुप धारण केले. या वादळाचा परिणाम ओडिशामध्ये पाहायला मिळाला. ओडिशाच्या दक्षिणेतील आठ जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने (IMD) हे चक्रीवादळ 28 ऑक्टोबरच्या संध्याकाळी ओडिशा आणि आंध्रच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज वर्तवला असून अनेक जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' जारी केला.
मंगळवारी दुपारी 1.30 वाजता 'मोन्था' हे चक्रीवादळ मछलीपट्टणमच्या दक्षिण-आग्नेयेला 100 किमी आणि काकीनाडाच्या दक्षिण-आग्नेयेला 180 किमी अंतरावर होते. हे चक्रीवादळ उत्तर-वायव्य दिशेने पुढे सरकत आहे. हे वादळ काकीनाडाजवळ मछलीपट्टणम आणि कलिंगपट्टणम दरम्यान आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे.
किनारपट्टीवर धडकताना 90 ते 100 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहतील आणि वाऱ्याचा वेग 110 किमी प्रतितास पर्यंत वाढू शकतो. सकाळी 5.30 वाजता हे वादळ 15 किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकले आणि मछलीपट्टणमपासून 190 किमी दूर, तर काकीनाडापासून 270 किमी दूर होते. गोपालपूर (ओडिशा) पासून ते 550 किमी दक्षिण-नैऋत्य दिशेला होते.
हवामान खात्याने मलकानगिरी, कोरापुट, रायगडा, गजपती, आणि गंजम या जिल्ह्यांसाठी अतिवृष्टीचा (20 सेमीपेक्षा जास्त) 'रेड अलर्ट' दिला आहे. ओडिशाचे मुख्यमंत्री मंगळवारी सायंकाळी परिस्थितीचा आढावा घेण्याची शक्यता आहे.
तसेच, 'मोन्था' चक्रीवादळाव्यतिरिक्त पूर्व मध्य अरबी समुद्रात (Arabian Sea) कमी दाबाचा पट्टा (Depression) तयार झाला आहे. मंगळवारी सकाळी 5.30 वाजता हा कमी दाबाचा पट्टा 12 किमी प्रतितास वेगाने ईशान्येकडे सरकला होता. हा कमी दाबाचा पट्टा वेरावळ (गुजरात) पासून 510 किमी दक्षिण-नैऋत्य दिशेला, तर मुंबईपासून 580 किमी पश्चिम-नैऋत्य दिशेला होता.
पुढील 36 तासांत तो पूर्व मध्य अरबी समुद्रातून उत्तर-ईशान्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. या दोन्ही नैसर्गिक बदलांमुळे आंध्र प्रदेश, ओडिशा तसेच महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीवर हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने नागरिकांना सुरक्षित स्थळी थांबण्याचे आणि हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, या मोन्था वादळाने पुन्हा एकदा 1999 मध्ये आलेल्या चक्रीवादळाच्या आठवणी ताज्या झाला आहेत. 1999 मध्ये आलेल्या 'सुपर चक्रीवादळ पारादीप'ने ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांना मोठा तडाखा बसला होता. 29 ऑक्टोबर 1999 रोजी 250 किमी प्रतितास वेगाने आलेल्या या वादळामुळे 10,000 लोकांचा बळी गेला होता, तर बालासोर, भद्रक, पुरी यांसारख्या जिल्ह्यांमध्ये मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. या वादळाच्या इशाऱ्याने 1999 मध्ये आलेल्या 'पारादीप चक्रीवादळाच्या' (Cyclone Paradip) भयानक आठवणी पुन्हा ताज्या झाल्या, ज्यात जवळपास 10,000 लोकांनी आपला जीव गमावला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.