Tatkal Ticket Booking Rules: जर तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल किंवा करणार असाल आणि विशेषतः तात्काळ तिकीट बुकिंगचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वे मंत्रालयाने तात्काळ तिकीट बुकिंगशी संबंधित नवीन नियम जाहीर केले असून हे नियम १ जुलै २०२५ पासून लागू होणार आहेत. या बदलांमधून बनावट एजंटांकडून होणारा गैरवापर थांबवणे आणि सामान्य प्रवाशांना अधिक सुविधा देणे हा मुख्य उद्देशअसणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी १० जून २०२५ रोजी सोशल मीडियावर एका फोटोद्वारे या नियमांची माहिती दिली.
१ जुलै २०२५ पासून, IRCTC च्या वेबसाइट किंवा ॲपवरून तात्काळ तिकीट बुक करण्यासाठी तुमच्या IRCTC खात्याला आधार क्रमांक लिंक करणे आणि त्याची पडताळणी करणे बंधनकारक असेल. आधार पडताळणीशिवाय तुम्हाला ऑनलाइन तात्काळ तिकीट बुक करता येणार नाही.
याव्यतिरिक्त, १५ जुलै २०२५ पासून आणखी एक सुरक्षा वैशिष्ट्य लागू होईल, ते म्हणजे ओटीपी-आधारित आधार पडताळणी. याचा अर्थ असा की, तिकीट बुकिंग पूर्ण करण्यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी (OTP) येईल आणि तो प्रविष्ट केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण होणार नाही.
ज्या प्रवाशांनी आधारची पडताळणी केली नाही किंवा ज्यांच्याकडे आधार नाही, त्यांना तात्काळ तिकिटे केवळ पीआरएस (Passenger Reservation System) काउंटर किंवा वायटीएसके (यात्री तिकीट सुविधा केंद्र) सारख्या अधिकृत एजंटकडूनच मिळवता येतील.
मात्र, १५ जुलै २०२५ पासून या ठिकाणीही ओटीपी पडताळणी अनिवार्य असेल, म्हणजेच तिकीट बुक करताना तुमच्या मोबाईलवर आलेला ओटीपी सांगावा लागेल.
या नियमांमधील एक महत्त्वाचा बदल म्हणजे, आता कोणताही अधिकृत एजंट तात्काळ बुकिंग सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या ३० मिनिटांत तिकीट बुक करू शकणार नाही. याचा सरळ फायदा सामान्य प्रवाशांना होणार आहे, कारण सुरुवातीची ही ३० मिनिटे केवळ त्यांच्यासाठीच राखीव असतील.
एसी क्लाससाठी: तात्काळ बुकिंग सकाळी १०:०० वाजता सुरू होईल, तर एजंट सकाळी १०:३० नंतरच तिकीट बुक करू शकतील.
नॉन-एसी क्लाससाठी: तात्काळ बुकिंग सकाळी ११:०० वाजता सुरू होईल, तर एजंट सकाळी ११:३० नंतरच तिकीट बुक करू शकतील.
गेल्या काही काळापासून असे निदर्शनास आले होते की, अनेक एजंट पडताळणी न करता मोठ्या प्रमाणात तात्काळ तिकिटे बुक करत होते. यामुळे सामान्य प्रवाशांना तात्काळ तिकिटे मिळण्यास अडचणी येत होत्या आणि त्यांना जास्त पैसे मोजावे लागत होते.
ही संपूर्ण प्रणाली अधिक पारदर्शक बनवण्यासाठी आणि खऱ्या प्रवाशांना प्राधान्य देण्यासाठीच हे नवीन नियम तयार करण्यात आले आहेत. दलाल आणि एजंटांच्या मनमानीला आळा बसावा आणि गरजू प्रवाशांना सहज तिकीट मिळावे, हा या सर्व बदलांचा मुख्य उद्देश आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.