Plane Accident Ahmedabad: अहमदाबाद येथे झालेल्या भीषण विमान अपघाताबाबत विमान दुर्घटना तपास ब्युरोने नुकताच आपला प्राथमिक अहवाल जारी केला आहे. या अहवालात फ्यूल कटऑफ हे अपघाताचे संभाव्य कारण असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, या निष्कर्षांमुळे पायलट संघटनांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून, त्यांनी या अहवालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एअरलाईन पायलट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेने या विमान अपघाताच्या चौकशीत आपल्यालाही सामील करून घेण्याची मागणी केली आहे.
भारतीय व्यावसायिक पायलट संघ या संघटनेने, पायलटने विमानाचा इंधन पुरवठा मुद्दाम बंद केला असावा या निष्कर्षाचा तीव्र निषेध केला आहे. तपास पूर्ण होण्याआधीच पायलट्सवर असे आरोप करणे योग्य नाही, असे आयसीपएचे म्हणणे आहे. पायलटने हा प्रसंग मुद्दाम घडवून आणल्याचा हा आरोप पूर्णपणे निराधार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
अपघातानंतर माध्यमांमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये ज्या प्रकारच्या चर्चा सुरू आहेत, त्यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत, असे आयसीपएने म्हटले. पायलटने मुद्दामून हे घडवून आणल्याचा हा आरोप मूर्खपणा आणि निराधार आहे. अशा दाव्यांना कोणताही आधार नाही. प्राथमिक तपास आणि अपूर्ण माहितीच्या आधारे असे आरोप करणे केवळ बेजबाबदारपणाचे नाही, तर त्यांच्या कुटुंबीयांबद्दलही असंवेदनशीलता दर्शवते, असे आयसीपएने स्पष्ट केले आहे.
एअरलाईन पायलट असोसिएशन ऑफ इंडिया या संघटनेनेही विमान अपघाताच्या चौकशीत आपल्याला सहभागी करून घेण्याची मागणी केली आहे. ALPA-India ही ८०० हून अधिक एअरलाईन्स आणि हेलिकॉप्टर कंपन्यांचे प्रतिनिधित्व करते. ही संस्था इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ एअरलाईन पायलट्स असोसिएशनशी संलग्न आहे, ज्यात जगातील १०० देशांमधील १ लाख पायलट सदस्य आहेत.
ALPA-India चे अध्यक्ष सॅम थॉमस यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, "AAIB चा प्राथमिक अहवाल वेबसाइटवर प्रसिद्ध करण्यात आला, परंतु त्यावर कोणाचीही स्वाक्षरी नव्हती. आम्हाला पारदर्शकता हवी आहे. तपास समितीत आमच्या प्रतिनिधीचाही समावेश असावा. अशी आमची मागणी आहे"
१२ जून रोजी अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एअर इंडियाच्या AI171 विमानाने २३० प्रवासी आणि १२ क्रू मेंबर्ससह उड्डाण केले होते. मात्र, काही अंतर कापल्यानंतर विमानाने थ्रस्ट देणे थांबवले आणि ते बी. जे. मेडिकल कॉलेजला धडकले. या दुर्घटनेत २६० लोकांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर एक महिन्याने १२ जुलै रोजी AAIB ने १५ पानांचा प्राथमिक अहवाल जारी केला, ज्यात विमान अपघाताचे कारण फ्यूल कटऑफ असल्याचे म्हटले जात आहे. या निष्कर्षांमुळे आता पायलट संघटना आणि तपास यंत्रणा यांच्यात एक नवा वाद सुरू झाला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.