पुणे: भारतातील मध्यमवर्ग 2030 पर्यंत एकूण लोकसंख्येच्या निम्म्याहून अधिक बनलेला असेल यामुळे लोकांचा खरेदीचा दृष्टिकोन गरजेवर आधारित न राहता अनुभवांवर केंद्रित होईल, असे 'फोक फ्रिक्वेन्सी' या संस्थेच्या अहवालात सांगण्यात आले आहे. नुकताच संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
अहवालानुसार, हा मध्यमवर्ग पिढ्यानपिढ्या गरिबीत खितपत पडलेला नवा एक गट असणार आहे. विशेष म्हणजे, त्यांची ही पहिली पिढी आहे जी शिक्षण घेत आहे. ही घरगुती किंवा असंघटित क्षेत्राबाहेर आपल्या कौशल्यांच्या आधारे लवकर नोकरी मिळवत आहे.
अहवालात पुढे सांगण्यात आले की, भारतातील 57 टक्के इंटरनेट वापरकर्ते ग्रामीण आणि टायर-2 शहरांमधील आहेत. मात्र जाहिरात लक्ष्यीकरण आणि सामग्री निर्मिती अजूनही मेट्रो शहरे आणि इंग्रजी बोलणाऱ्यांभोवती केंद्रित झालेली आहे. एवढचं नाहीतर कृत्रिम बुद्धिमत्तेतील (AI) प्रादेशिक भाषांबद्दलच्या पूर्वग्रहदूषित दृष्टिकोनामुळेही लक्ष्यीकरणाचा मोठा भाग वाया जात असल्याचे देखील अहवालातून नमूद करण्यात आले.
अहवालात नमूद करण्यात आले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 नुसार भारतातील उच्च शिक्षण क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. NEP चे मुख्य उद्दिष्ट वर्ष 2025 पर्यंत स्थूल पट नोंदणी गुणोत्तर (GER) 50 टक्क्यांपर्यंत पोहोचवणे असे आहे, जे 2018 मध्ये नोंदलेल्या 26.3 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
दुसरीकडे, देशातील साक्षरता दरही झपाट्याने वाढत आहे, ज्यामुळे 2011 मधील 22.5 टक्के असलेली गरिबी 2019 मध्ये 10.2 टक्क्यांवर येऊन पोहोचली. सुधारलेली साक्षरता केवळ आर्थिक उन्नतीच नव्हे, तर लोकांच्या विचारसरणीतही बदल घडवत आहे. तसेच, ग्राहकांना अधिक आर्थिकदृष्ट्या जागरुक, ब्रँड-सजग आणि विपणन दाव्यांबद्दल अधिक चिकित्सक बनवत आहे.
अहवालातील आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे देशातील मेडिकल विद्यार्थ्यांपैकी निम्म्याहून अधिक महिला असून ही सकारात्मक बाब आहे. विशेष म्हणजे तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, तब्बल 14 टक्के महिला मेडिकल क्षेत्रात नेतृत्व करत आहेत. याशिवाय, अहावालात देशातील लक्झरी मार्केटमधील महिलांच्या वाढत्या सहभागावरही प्रकाश टाकण्यात आला आहे. सिंगल माल्टच्या विक्रीतील 64 टक्के वाढ महिलांमुळे झाल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. महिलांसाठी तयार केलेली उत्पादने ग्राहकांना आकर्षित करतात.
अहवालात पुढे असेही सांगण्यात आले की, जवळपास 93 टक्के भारतीय जनरेशन झेड (Gen Z) आणि अल्फा पिढी असून कौटुंबिक महत्त्वाचे निर्णय घेणार आहे. विशेष म्हणजे, ही पीढी मूल्ये, सर्वसमावेशकता यांना धरुन चालण्याचा प्रयत्न करेल. दरम्यान, गेल्या काही वर्षात खासकरुन तरुण भारतीय शिक्षण आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून मोठ्या प्रमाणात पाश्चात्त्य संस्कृतीच्या संपर्कात येत आहेत. ही पिढी भारतीय इतिहासाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहत आहे.
फोक फ्रिक्वेन्सीच्या संस्थापिका आणि स्वतंत्र मानववंशशास्त्रज्ञ गायत्री सप्रू यांनी सांगितले की, "संस्कृती, डेटा आणि व्यवसाय धोरण यांच्यातील मोठी दरी मी प्रत्यक्ष पाहिली आहे. आजचे बरेच विश्लेषण उथळ आणि निष्काळजीपणामुळे सामान्य ज्ञानाचे पुनरुच्चारण करत आहेत. त्यामुळे हा अहवाल वेगळा ठरतो. एवढचं नाहीतर विकसित होत असलेल्या गरजा, ओळख आणि स्थानाबद्दल अचूक संकेतही हा अहवाल देतो, ज्यामुळे ब्रँड्सना त्यांची प्रासंगिकता भविष्यातही टिकवून ठेवण्यास मदत करतो."
दुसरीकडे, हा अहवाल भारतीय बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण बदलांवरही प्रकाश टाकतो. व्यवसाय तसेच विपणन धोरणे ठरवणाऱ्यांसाठी नवीन दिशा आणि संधी दर्शवतो, त्यामुळे मध्यमवर्गाची वाढती क्रयशक्ती आणि बदललेली मानसिकता लक्षात घेऊन, कंपन्यांना त्यांच्या उत्पादनांमध्ये आणि विपणन धोरणांमध्ये बदल करण्याचे सूचित करतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.