मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातून एक अत्यंत भावनिक करणारी घटना समोर आली आहे. १७ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या तरुण अखेर त्याच्या पालकांना भेटल्याची घटना समोर आलीय. दीर्घकाळाच्या प्रतिक्षेनंतर आपल्या एकुलत्या एक मुलाला पाहून पालकांनी अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी त्याला मिठी मारली आणि मध्य प्रदेश पोलिसांचे मनापासून आभार मानले.
ही घटना छतरपूर जिल्ह्यातील हरपालपूर येथील आहे. येथील हरदयाल शाळेत शिकणारा विनीत तिवारी ४ सप्टेंबर २००८ रोजी रहस्यमय परिस्थितीत बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी हरपालपूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अनेक वर्षे विविध ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली, मात्र त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता. काळ जसजसा पुढे गेला तसतशी आशा मावळत चालली होती.
मध्य प्रदेश पोलिसांच्या ‘मुस्कान मोहिमे’अंतर्गत पुन्हा एकदा या प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला. हरपालपूर पोलिस स्टेशनचे प्रमुख आणि त्यांच्या पथकाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अथक परिश्रमानंतर पंजाबमधील लुधियाना जिल्ह्यातील दुगरी परिसरातून विनीतला सुरक्षितपणे शोधून काढले. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले, जिथे त्याने स्वतःहून आपल्या पालकांसोबत जाण्याची इच्छा व्यक्त केली.
न्यायालयाने विनीतला त्याचे वडील रामकुमार तिवारी यांच्या ताब्यात दिले. हा क्षण आई-वडिलांसाठी अविस्मरणीय ठरला. आई भावूक होत म्हणाली, “१७ वर्षांच्या तपश्चर्येनंतर देवाने माझी इच्छा पूर्ण केली. माझा मुलगा पुन्हा घरी परतला.” तर वडिलांनी सांगितले की, त्यांनी कधीही आशा सोडली नव्हती, जरी अनेकांनी तो जिवंत आहे की नाही असा प्रश्न उपस्थित केला होता.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षकांनी तपास पथकाचे विशेष कौतुक केले असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना १०,००० रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाचा आनंद नाही तर समाजासाठीही आशेचा किरण ठरली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.