Asia Cup 2025: भारतीय संघाने T20 आशिया कप 2025 मध्ये आपल्या मोहिमेची शानदार सुरुवात केली. स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिलाच सामना संयुक्त अरब अमिराती (UAE) विरुद्ध खेळत असून या सामन्यात भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधाराने अष्टपैलू खेळाडूंवर अधिक विश्वास दाखवला आणि गोलंदाजांनीही त्याचा निर्णय योग्य ठरवत कमाल केली. या सामन्यात भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू कुलदीप यादवने आपल्या फिरकीच्या जादुई कामगिरीने यूएईच्या फलंदाजांना मैदानावर टिकूच दिले नाही. कुलदीपने एकाच षटकात तीन महत्त्वाचे बळी घेत विरोधी संघाची कंबर मोडली.
युएई संघाची फलंदाजी सुरु असताना कुलदीप यादव 9वे षटक टाकण्यासाठी आला. त्याने येताच आपली जादू दाखवायला सुरुवात केली. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर त्याने राहुल चोप्राला माघारी धाडले. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर फलंदाजाने एक धाव काढली आणि तिसरा चेंडू निर्धाव (Dot) गेला.
पण, कुलदीप शांत बसला नाही. चौथ्या चेंडूवर त्याने यूएईचा कर्णधार मुहम्मद वसीमला एलबीडब्ल्यू (LBW) आउट केले. मुहम्मद वसीम बराच वेळ क्रीजवर जमून खेळत होता, पण कुलदीपच्या फिरकीपुढे तो टिकू शकला नाही. पाचव्या चेंडूवर दोन धावा काढण्यात आला. त्यानंतर षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुलदीपने हर्षित कौशिशलाही बाद करुन एकाच षटकात तीन विकेट्स घेण्याची किमया साधली. तो सलग तीन चेंडूंवर तीन विकेट्स घेऊ शकला नाही, त्यामुळे त्याची हॅटट्रिक हुकली, पण त्याचे हे षटक सामन्यातील टर्निंग पॉइंट ठरले.
कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) भारतीय संघासाठी 2017 मध्ये T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तेव्हापासून त्याने 41 T20I सामन्यांमध्ये एकूण 72 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने दोन वेळा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला.
दरम्यान, या सामन्यात यूएईचे (UAE) फलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. त्यांच्याकडून अलीशान शराफूने सर्वाधिक 22 धावा केल्या, पण इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे संपूर्ण यूएईचा संघ केवळ 57 धावांतच गारद झाला.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमध्ये कुलदीप यादवने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याशिवाय शिवम दुबेच्या नावावर 3 विकेट्स आहेत. तर, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. भारताची गोलंदाजी इतकी प्रभावी झाली की, त्यांनी यूएईला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले, ज्यामुळे भारतासाठी (India) हा सामना जिंकणे आता सोपे झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.