Jasprit Bumrah Controversial Statement: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर सुरु आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी, पहिल्या सत्रात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने घातक गोलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले, मात्र त्याचवेळी त्याने टेंबा बावुमावर केलेली एक वादग्रस्त टिप्पणी चर्चेचा विषय ठरली. लंच ब्रेकपर्यंत दक्षिण आफ्रिकेने 3 विकेट्स गमावून 105 धावा केल्या होत्या. पहिल्या सत्रात बुमराहने भेदक मारा करत दोन महत्त्वाचे बळी घेतले.
पहिल्या सत्रात बुमराहच्या गोलंदाजीची जादू चांगलीच चालली. त्याने आपल्या 7 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 9 धावा देत दोन महत्त्वपूर्ण विकेट्स घेतल्या. जस्सीने एडन मार्करम आणि रियान रिकेल्टन यांच्यात झालेली अर्धशतकी भागीदारी मोडत संघाला पहिले यश मिळवून दिले. रिकेल्टनला (23 धावा) त्याने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर, क्रीझवर स्थिरावलेला एडन मार्करम यालाही त्याने 31 धावांवर बाद करत दक्षिण आफ्रिकेच्या मधल्या फळीला धक्का दिला.
पहिल्या सत्रात बुमराहने जबरदस्त स्पेल टाकून संघाला यश मिळवून दिले असले तरी, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा याच्याबद्दल केलेल्या एका टिप्पणीमुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला. झाले असे की, बुमराहचा एक चेंडू टेंबा बावुमाच्या पॅडवर लागला. बुमराहने जोरदार अपील केली, पण पंचांनी बावुमाला 'नॉटआउट' (Not Out) दिले. यानंतर भारतीय खेळाडूंनी त्वरित रिव्ह्यू (Review) घेण्यावर विचार सुरु केला.
यष्टीरक्षक ऋषभ पंत हा बावुमाच्या पॅडवर चेंडू लागल्याबद्दल काहीतरी बोलत असतानाच, बुमराहने मध्येच बोलत हस्तक्षेप केला आणि हिंदीमध्ये वादग्रस्त कमेंट केली. बुमराह म्हणाला, “बौना भी तो है यह.” (म्हणजेच, तो ठेंगणा/बुटका आहे.)
बुमराहची ही संपूर्ण कमेंट स्टंप माईकमध्ये स्पष्टपणे कैद झाली. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. बुमराहच्या या टिप्पणीवरुन नेटिझन्समध्ये संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जण याला 'विनोद' म्हणत असले तरी, अनेकांनी बुमराहची ही कमेंट खेळाडूच्या उंचीवर आधारित असल्याने विवादास्पद आणि अनादरणीय असल्याचे म्हटले.
बुमराहच्या या कमेंटनंतर टेंबा बावुमा फलंदाजीत मात्र फारसा कमाल दाखवू शकला नाही. त्याने 11 चेंडूंचा सामना केला, पण केवळ 3 धावा करुन तो पॅव्हेलियनमध्ये परतला.
या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ व्यवस्थापनाने मोठा निर्णय घेतला. संघ चार स्पिनर्स सोबत मैदानात उतरला आहे. साई सुदर्शनला संघातून वगळून, वॉशिंग्टन सुंदरला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. एकंदरीत, पहिल्या सत्रात बुमराहच्या भेदक गोलंदाजीमुळे भारताने सामन्यावर नियंत्रण मिळवले असले तरी, त्याच्या एका टिप्पणीमुळे सामना आणि खेळाडू चर्चेत आले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.