Eden Gardens Pitch Report: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील पहिला आणि महत्त्वाचा सामना कोलकाता येथील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ काही दिवसांपूर्वीच कोलकाता येथे दाखल झाले असून, सध्या जोरदार सराव करत आहेत.
या कोलकाता कसोटी सामन्यात सर्वांचे लक्ष खेळपट्टीच्या स्वरुपावर लागले आहे. सध्या व्यक्त होत असलेल्या अंदाजानुसार, ही खेळपट्टी पहिल्या दिवसापासून फिरकी गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरु शकते. त्यामुळे, दोन्ही संघांनी आपल्या प्लेइंग-11 मध्ये जास्तीत जास्त फिरकीपटूंना संधी देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
ईडन गार्डन्स स्टेडियमच्या खेळपट्टीचा इतिहास पाहिल्यास, ती आतापर्यंत फलंदाजीसाठी चांगली मानली गेली आहे. या खेळपट्टीवर चेंडूला चांगली उसळी मिळते आणि तो बॅटवर सहज येतो, ज्यामुळे फलंदाजांना धावा करणे सोपे जाते. सामन्याच्या पहिल्या दिवसाच्या खेळादरम्यान, सकाळी नवीन चेंडूने जलद गोलंदाजांना थोडी मदत मिळण्याची शक्यता आहे, कारण हवेत आणि खेळपट्टीवर थोडा ओलसरपणा असतो. मात्र, सामना जसजसा पुढे सरकेल, तसतसे खेळपट्टीवरचे तेज कमी होईल आणि चेंडू जुना झाल्यावर तो वळायला सुरुवात करेल. यामुळे, दुसऱ्या-तिसऱ्या दिवसापासून फिरकी गोलंदाज अधिक प्रभावी ठरु शकतात.
कोलकाता कसोटीच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी खेळपट्टी पूर्णपणे फिरकीपटूंसाठी अनुकूल बनण्याची शक्यता आहे. अशावेळी फिरकी गोलंदाजीचा सामना करणे फलंदाजांसाठी अजिबात सोपे राहणार नाही. खेळपट्टीवर पडलेल्या भेगा आणि पडलेले चेंडू फिरु लागल्याने फलंदाजांना फार काळजीपूर्वक खेळावे लागेल. या खेळपट्टीच्या अंदाजामुळे दोन्ही संघांच्या कर्णधारांना आपल्या अंतिम 11 खेळाडूंची निवड करताना खेळपट्टीचा हा बदलता मूड लक्षात घेऊन अधिक फिरकी पर्याय समाविष्ट करावे लागतील.
ईडन गार्डन्स हे भारतीय संघासाठी (Team India) एक महत्त्वाचे मैदान आहे, परंतु येथील कसोटीतील आकडेवारी थोडी मिश्रित राहिली आहे. भारतीय संघाने आतापर्यंत या मैदानावर एकूण 42 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 13 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर 9 सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. 20 सामने अनिर्णित राहिले आहेत.
या मैदानावर कसोटी सामन्यांमध्ये चौथ्या डावात फलंदाजी करणे एक मोठे आव्हान असते. ईडन गार्डन्स स्टेडियमवर आजवर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये केवळ 5 वेळा असे घडले आहे, जेव्हा एखाद्या संघाने चौथ्या डावात लक्ष्याचा पाठलाग यशस्वीपणे केला आहे. हा कमी आकडा स्पष्टपणे दर्शवतो की, खेळपट्टीवर चेंडू फिरु लागल्यावर धावा करणे आणि सामना जिंकणे किती कठीण होते. त्यामुळे नाणेफेकीचा कौल आणि पहिल्यांदा फलंदाजी घेणे महत्त्वाचे ठरु शकते.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावरील भारताचा (India) रेकॉर्ड खूपच जबरदस्त राहिला आहे, ज्यामुळे भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असेल. भारतीय संघाने आपल्या मायदेशात आफ्रिकन संघाविरुद्ध एकूण 19 कसोटी सामने खेळले आहेत. यापैकी भारताने 11 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. फक्त 5 सामन्यांमध्ये भारताला हार पत्करावी लागली आहे. 3 सामने ड्रॉ झाले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, भारतीय संघाने घरच्या मैदानात गेल्या 15 वर्षांपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकाही कसोटी सामन्यात पराभव पत्करलेला नाही. हा विक्रम भारताला मोठी मानसिक आघाडी देऊ शकतो.
या सर्व आकडेवारी आणि खेळपट्टीच्या अंदाजामुळे, कोलकाता कसोटी एक रोमांचक आणि फिरकी गोलंदाजीवर आधारित सामना असण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.