Cauvery Water Disputes: कावेरी नदीच्या पाण्यावरुन कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये सुरु असलेल्या वादावर आता कावेरी जल नियमन समितीचे (CWRC) एक महत्त्वाचे विधान समोर आले आहे.
समितीने कर्नाटक सरकारला पुढील 15 दिवस (15 नोव्हेंबरपर्यंत) दररोज 2,600 क्युसेक पाणी तामिळनाडूकडे सोडण्याचे निर्देश दिले आहेत. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीत कर्नाटकला बिलीगुंडलूमधील पाण्याचा प्रवाह पुढील 15 दिवसांपर्यंत 2600 क्युसेकवर ठेवण्यास सांगण्यात आले.
दरम्यान, बैठकीत तामिळनाडू (Tamil Nadu) सरकारने कर्नाटक सरकारकडे पुढील 15 दिवस दररोज 13,000 क्युसेक पाणी देण्याची मागणी केली होती. कर्नाटक गेल्या 15 दिवसांपासून दररोज केवळ 3 हजार क्युसेक पाणी सोडत आहे.
तामिळनाडू विधानसभेने 9 ऑक्टोबर रोजी केंद्र सरकारला कावेरी जल व्यवस्थापन प्राधिकरणाच्या आदेशानुसार कर्नाटकला कावेरीचे पाणी सोडण्याचे निर्देश देण्याचे आवाहन केले होते.
तामिळनाडूला पाणी देण्यास नकार दिल्यानंतर कर्नाटक सरकारने आपल्या राज्यातील काही भागात भीषण दुष्काळाचे कारण दिले आहे. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी 5 ऑक्टोबर रोजी कर्नाटकच्या (Karnataka) कावेरी खोऱ्यातील जलाशयांमधील पाण्याचा संचयी प्रवाह कमी होत असल्याचे सांगितले होते. कर्नाटक सरकारने समितीला सांगितले की, राज्यातील चार जलाशयांमध्ये जवळपास शून्य साठा आहे.
कावेरी नदीचे उगमस्थान कर्नाटकात आहे. ही नदी तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमधून जाते. कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये नदीच्या पाण्याच्या वाटपावरुन बराच काळ वाद सुरु आहे. हा वाद सोडवण्यासाठी केंद्र सरकारने 1990 मध्ये कावेरी जल विवाद न्यायाधिकरण (CWDT) स्थापन केले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.