लंडन : २०२५ च्या अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी (ATT) मालिकेत भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका २-२ अशा बरोबरीत सुटली. या मालिकेतील भारतीय संघाच्या अप्रतिम कामगिरीबद्दल मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी संघाचे कौतुक केले असून विशेषतः रविंद्र जडेजाच्या योगदानाचा विशेष उल्लेख केला आहे.
तेंडुलकर यांनी रेडिटवरील व्हिडिओ संवादात जडेजाविषयी बोलताना म्हटलं की, "रविंद्र जडेजा हा एक अंडररेटेड खेळाडू आहे. तो जे योगदान देतो, त्यासाठी त्याला पुरेसं श्रेय मिळत नाही. फलंदाज म्हणून त्याने या मालिकेत अप्रतिम खेळ केला आहे."
ते पुढे म्हणाले, "त्याचा खेळाचा आराखडा ठरलेला असतो. त्याला माहीत असतं की कोणते फटके खेळायचे आणि कोणते टाळायचे. विकेट्स दरम्यान धाव घेणं, क्षेत्ररक्षकांकडून होणारे ओव्हरथ्रो यांचा तो चतुराईने उपयोग करतो. मैदानावर तो नेहमी गेममध्ये असतो आणि काहीतरी घडवून दाखवतो."
या मालिकेत जडेजाने १० डावांमध्ये ८५ च्या सरासरीने एकूण ५१६ धावा केल्या. यामध्ये एका शतकासह पाच अर्धशतकांचा समावेश होता. ही इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत सहाव्या किंवा त्यापुढील क्रमांकावर फलंदाजी करताना केलेली दुसरी सर्वोच्च कामगिरी आहे. या आधी अशी सर्वोच्च कामगिरी गॅरी सोबर्स यांनी १९६६ मध्ये केली होती.
जडेजाने केवळ फलंदाजीतच नव्हे तर गोलंदाजीतही चमकदार कामगिरी केली. त्याने एकूण ७ बळी घेतले असून त्यात मँचेस्टरमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीत घेतलेली चार बळींची विशेष कामगिरी होती.
या मालिकेत शुभमनगिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. मोहम्मद सिराजचा आक्रमक स्वभाव आणि ऋषभ पंतच्या अचाट खेळशैलीने इंग्लंड संघाला हैराण केले. मात्र, तेंडुलकर यांच्या मते जडेजाने विरोधी संघाची सर्वाधिक परीक्षा घेतली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.