नवी दिल्ली: जून २०२५ मध्ये अहमदाबादमध्ये लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा अपघात झाला होता. या दुर्घटनेत पायलटसह अनेक जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात विमानाच्या पायलटला जबाबदार धरता येणार नाही, असा महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची यांच्या खंडपीठासमोर या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पायलट सुमित सभरवाल यांचे वडील पुष्कर राज सभरवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या याचिकेत या घटनेची स्वतंत्र न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
याचिकाकर्त्यांचे वकील गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयात असा युक्तिवाद केला की एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) द्वारे सुरू असलेली चौकशी स्वतंत्र नाही. त्यांनी न्यायालयाला सांगितले की याचिकाकर्ता हा मृत पायलटचा ९१ वर्षीय वडील आहे आणि ही चौकशी निष्पक्ष असायला हवी होती. त्यांनी विमान अपघात आणि घटनांच्या चौकशी नियम १२ अंतर्गत न्यायालयीन देखरेखीखाली तपासाची मागणी केली.
सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १० नोव्हेंबर रोजी संबंधित दुसऱ्या प्रकरणासह होणार आहे.
तोंडी टिप्पणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत म्हणाले, “हा अपघात अत्यंत दुर्दैवी होता. परंतु तुमच्या मुलावर दोषारोप लावला जाऊ नये. कोणीही त्यांना जबाबदार धरू नये.” न्यायमूर्ती बागची यांनीही स्पष्ट केले की एएआयबीच्या प्राथमिक अहवालात पायलटवर कोणताही दोषारोप नाही.
त्यांनी सांगितले की अहवालात एका पायलटने इंधन कट-ऑफ सक्रिय केल्याचा उल्लेख आहे, तर दुसऱ्याने त्यास नकार दिला आहे. मात्र, या अहवालात पायलटची चूक असल्याचे कुठेही नमूद नाही.
वकील शंकरनारायणन यांनी बोईंग विमानांबाबत जगभरात असलेल्या सुरक्षा चिंतांचा उल्लेख करताना म्हटले की अहमदाबाद अपघात ही त्या व्यापक समस्येचीच एक झलक आहे. यावर न्यायमूर्ती बागची म्हणाले, “जर तपास प्रक्रियेलाच आव्हान दिलं जात असेल, तर तो संपूर्ण कायदेशीर व्यवस्थेलाच आव्हान आहे.”
याचिकाकर्त्यांनी न्यायालयाचे लक्ष वॉल स्ट्रीट जर्नलमधील एका लेखाकडेही वेधले, ज्यात अज्ञात सरकारी स्रोतांच्या आधारे पायलटची चूक असल्याचे म्हटले होते. मात्र, न्यायालयाने स्पष्ट केलं की परदेशी माध्यमांच्या अहवालांचा भारतीय न्यायिक प्रक्रियेवर कोणताही प्रभाव पडत नाही.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दात सांगितले, “हे वृत्त अत्यंत दिशाभूल करणारे आहे. भारतात कोणीही असे मानत नाही की पायलट अपघातासाठी जबाबदार होता.”
दरम्यान, कमांडर सुमित सभरवाल यांचे वडील आणि भारतीय पायलट महासंघाने या अपघाताची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील स्वतंत्र विमान वाहतूक तज्ञ समितीकडून करण्याची मागणी केली आहे.
त्यांनी एएआयबीकडून सुरू असलेला तपास थांबवण्याचीही मागणी केली आहे, कारण त्या तपास पथकात डीजीसीए आणि राज्य विमान वाहतूक अधिकाऱ्यांचा समावेश असून त्यांच्या निष्पक्षतेवरही प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. याचिकाकर्त्यांचा आरोप आहे की एएआयबीचा प्राथमिक अहवाल पायलटविरोधी आणि पक्षपाती आहे, कारण त्यात तांत्रिक कारणांकडे दुर्लक्ष करून पायलटच्या चुकीला जबाबदार धरले गेले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.