India Afghanistan Relations: अफगाणिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी यांनी भारतीयांना त्यांच्या देशात आमंत्रित केले. अफगाणिस्तानमध्ये रुग्णालये, वीज आणि खाण क्षेत्रांमध्ये काम करण्याची मोठी क्षमता (Scope) असून भारतीयांनी आपल्या देशात यावे आणि काम करावे, त्यांचे स्वागत केले जाईल, असे मुत्ताकी यांनी म्हटले. शुक्रवारी (10 ऑक्टोबर) नवी दिल्ली येथे पत्रकारांशी बोलताना मुत्ताकी यांनी भारत आणि अफगाणिस्तानमध्ये व्यापार समिती स्थापन करण्यावरही एकमत झाल्याची माहिती दिली.
मुत्ताकी यांनी सांगितले की, "आमची इच्छा आहे की भारतीय कंपन्या आणि नागरिकांनी अफगाणिस्तानमध्ये यावे आणि काम करावे. आमच्याकडे रुग्णालयांमध्ये डॉक्टर्स, खाणींमध्ये टेक्नीकल एक्सपर्ट (Technical Experts) आणि वीज क्षेत्रात कुशल अभियंत्यांची मोठी गरज आहे. अफगाणिस्तान त्यांच्यासाठी एक सुरक्षित ठिकाण आहे."
भारताच्या (India) परराष्ट्र मंत्र्यांसोबत झालेल्या भेटीदरम्यान अफगाणिस्तान आपले राजनयिक नवी दिल्लीला पाठवू शकतो आणि भारतदेखील काबूलमध्ये आपले राजनयिक पुन्हा पाठवण्याचा विचार करत आहे, असे आश्वासन मिळाल्याचे त्यांनी सांगितले. "गेल्या चार वर्षांत आमचे संबंध सुधारले आहेत आणि ही भारत भेट त्या दिशेने एक नवीन सुरुवात आहे," असे मतही त्यांनी व्यक्त केले.
मुत्ताकी यांनी देवबंद (Deoband) बद्दल बोलताना एक महत्त्वाची गोष्ट सांगितली. "देवबंद हे इस्लामी जगाचे मोठे केंद्र आहे आणि अफगाणिस्तानचे त्याच्याशी जुने नाते आहे. आमचे विद्यार्थी येथे येऊन शिक्षण घेऊ शकतील यासाठी मी तेथील उलेमांना भेटायला जात आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे पाकिस्तानमधील दहशतवादाच्या (Terrorism) प्रश्नावर मुत्ताकी यांनी स्पष्ट भूमिका घेतली. "अफगाणिस्तानची जमीन कोणत्याही देशाविरुद्ध वापरली जाणार नाही. आमच्या देशावर आता फक्त अफगाण लोकांचे शासन आहे आणि आम्ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाला परवानगी देणार नाही," असे त्यांनी ठणकावून सांगितले.
मुत्ताकी यांनी यावेळी अफगाणिस्तानची सुरक्षा परिस्थिती पूर्णपणे सुधारल्याचा दावा केला. ते म्हणाले, "मागील चार वर्षांत सर्व विदेशी शक्तींना हटवण्यात आले. आमच्या देशाच्या एका इंच जमिनीवरही कोणाचा कब्जा नाही. गेल्या आठ महिन्यांत हिंसेची कोणतीही मोठी घटना घडलेली नाही. जर प्रत्येक देशाला शांतता हवी असेल, तर त्यांनी अफगाणिस्तानसारखा मार्ग स्वीकारला पाहिजे."
चाबहार बंदर प्रश्नावर ते म्हणाले की, भारत आणि अफगाणिस्तानने व्यापाराचे मार्ग खुले ठेवले पाहिजेत. "अमेरिकेच्या निर्बंधांचा सामना करत असतानाही दोन्ही देशांमधील व्यापार थांबू नये यासाठी आपण एकत्रितपणे तोडगा काढला पाहिजे," असे मुत्ताकी यांनी जोर देऊन सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.