शत्रू अवतरला आहे Dainik Gomantak
ब्लॉग

शत्रू अवतरला आहे

बॅनरचे एकदा काम आटोपले की त्यांचे काय होते या प्रश्नाचे उत्तर शोधायला जावे तर जीव घुस्मटल्याचा अनुभव येईल.

दैनिक गोमन्तक

पुर्वी गोव्यात जत्रा-फेस्त-उत्सवाच्या निमित्ताने गावातल्या रस्त्यांवरून, गावच्या आनंदाची दवंडी पिटत जाणाऱ्या पुरंगीबेरंगी पताका दिसायच्या. गावात उत्सवासाठी येणाऱ्यांचे स्वागत त्या उत्साहशील पताकांनी व्हायचे. छान वाटायचे. पण आता रस्त्यावरच्या पताकांचे स्वरूप बदलले आहे. एक कुरूप आणि ओंगळ रूप घेऊन कुणीतरी रस्त्याच्या कडेने आपल्याबरोबर चालते आहे असे वाटते. या ओंगळपणाला रोखणारे कोणीच नाही. ज्यांच्या हाती जबाबदारीच्या साऱ्या चाव्या सोपवल्या आहेत ते देखील या ओंगळवाण्या धुळवडीत सामील आहेत. अशी लक्तरलेली जाहिरातबाजी करून कुठे नेणार आहेत हे सारे आपल्या निसर्गसुंदर गोव्याला?

गोव्याच्या निसर्गसौंदर्याला एक छान क्षितिज देखील आहे. दूर डोंगरावर किंवा अफाट पसरलेल्या समुद्रावर पसरलेले हे क्षितिज डोळ्यांना सुख देते. अपरंपार आनंद देते. पण त्या क्षितिजेरेषेपर्यंत जाणारे रस्ते आपल्याला काय ओलांडायला लावतात, तर ही विद्रूप राजकीय चिन्हे! या विद्रूपीकरणात दुर्दैवाने आज सारेच सामील झाले आहेत. नवे नवे पक्ष गोव्याच्या भूमीवर पाय ठेवत आहेत. त्यात चुकीचे काहीच नाही. लोकशाहीने त्यांना दिलेला तो मजबूत हक्क आहे, पण या लोकशाहीत स्थानिक सौंदर्यावर अशी बळजबरी करणे, स्थानिक साधन-सुविधांवर आक्रमण करणे यांचा हक्क साऱ्या राजकीय पक्षांना कसा काय बिनदिक्कतपणे मिळतो ही आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे. आणि ही बॅनरबाजी शांत स्वरूपाची नाही. त्यात एक धुमसणारे सुप्त युद्ध आहे. या युद्धाचे हिडीस रूप बॅनरवरील काळे फासलेल्या चेहऱ्यांमधून आपल्याला रस्तोरस्ती भिववत असते. एक अनाम भेसूर राक्षस आपल्याला कोंडीत पकडत चालला आहे अशी दहशती जाणीव रस्त्यावरून चालताना, गाडीत बसून जाताना सतत छातीवर ओझे ठेवत असते.

आपल्या साऱ्या सौंदर्यशास्त्राला हिणवणारे हे रस्त्यावरचे बॅनर्स मुळातच पीव्हीसी पदार्थ वापरून तयार झालेले आहेत. ते वजनाने हलके असले तरी बऱ्यापैकी टिकावू असतात आणि त्यामुळे त्यांना सहजपणे कुठेही टांगणे शक्य होते. राजकीय नेत्यांना आणि पक्षांना तर हे साहित्य एका वरदानासारखे लाभले आहे. तुलनेने स्वस्त असल्याने नवशिक्या, होतकरू राजकारण्यालादेखील त्याच्या महत्त्वाकांक्षा सणासुदीच्या किंवा वाढदिवसाच्या निमित्ताने, रस्त्यावर कोठेही लोकांच्या नजरांना दटावणी देत टांगता येतात.

बॅनरचे एकदा काम आटोपले की त्यांचे काय होते या प्रश्नाचे उत्तर शोधायला जावे तर जीव घुस्मटल्याचा अनुभव येईल. त्यात वापरलेल्या पीव्हीसी घटकांमुळे मानवाच्या शरीरावर विपरीत परिणाम तर होतोच पण पृथ्वीचेही दीर्घकालीन नुकसान होते. या बॅनरच्या बाबतीत ‘रिसायकल’ हा शब्दही फसवा आहे. त्याचे ‘रिसायकल’ होणेही कितीतरी प्रमाणात प्रदूषण निर्माण करते. गोव्यात निवडणुकीला अजून काही महिने बाकी आहेत तोवर दाराशी आलेल्या या युद्धात आपल्या अनेक संवेदनांचा बळी जाणे अपरिहार्य आहे. घराच्या दाराबाहेर पडताच डोळ्यांना खुपणाऱ्या त्या राजकीय पताका आणि बॅनर हे या युद्धातले अग्रगण्य कवचधारी सैनिक आहेत. हल्ल्याला सुरुवात तर झालीच आहे. सर्वात आधी आपली ‘नजर’ मरण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Island: मांडवीच्या गळ्यातील 'ते' 8 हिरे! परकीय राजवटींनी तोडली मंदिरे, पण संस्कृती बुडवू शकले नाहीत; वाचा गोव्याचा अद्भूत इतिहास

Harshan Yog June 2026: लव्ह लाईफमध्ये प्रेमाचा गुलमोहर बहरणार! 'हर्षण योग' ठरणार 5 राशींसाठी वरदान; धावपळीच्या आयुष्यातून मिळणार सुखाचा विसावा

Viral Video: वय वाढलं पण समजूतदारपणा कुठे गेला? चालत्या लोकलमध्ये आंटीचा हायव्होल्टेज स्टंट; व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांचा संताप

Vaibhav Sooryavanshi: 15 वर्षांचा वैभव रचणार इतिहास! क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मोडणार रेकॉर्ड, भारताचा बनणार नवा 'युवातारा'

Goa Irrigation: तिलारी कालवा कोरडा! शेतकरी चिंतेत; मिरची, भाजीपाला व हिरवा चारा करपण्याची भीती,पाणीपुरवठ्याची मागणी

SCROLL FOR NEXT