Novel | Book
Novel | Book Dainik Gomantak
ब्लॉग

Novel: कथा एका जिद्दीची - ''ही वाट दूर जाते''

दैनिक गोमन्तक

Novel: सध्या निम्मे जग तरी कार्पोरेट विश्र्वाच्या धुंदीत आहे. कार्पोरेट विश्र्व आहेच तसं. अत्यंत गरजेचं बुद्धिमत्तेला सढळ हस्ते दान देणारं, कमाल परिश्रमांची अपेक्षा ठेवणारं व थोड्याश्याही चुकीकरता हद्दपार करणारं.

अशाच कार्पोरट जगाची पार्श्‍वभूमीला घेणारी, मोहना कारखानीस यांची पहिलीच कादंबरी ‘ही वाट दूर जाते’. डिंपल प्रकाशनने प्रकाशित केलेली प्रख्यात लेखिका माधवी कुंटे यांची प्रस्तावना ह्या कादंबरीला लाभली आहे.

कौटुंबीक जग व कॉर्पोरेट जग अशा दोन स्तरांवर ही कादंबरी पुढे-पुढे जात राहते नायिका आदिती, तिचे आई-वडिल, भाऊ, आजी-आजोबा, आत्या वगैरे. अन् मग ती काम करत असलेल्या जागेवरचे तमाम सहकारी, बॉस, मैत्रिणी, कंपनीची मालकीण वगैरे सर्व. लहानपणापासूनच भरपूर शिकायचं व चिक्कार पुढे यायचं अशी महत्त्वाकांक्षा असलेली आदिती मॅनेजमेंटची पदव्युत्तर डिग्री घेते.

नोकरी करतच. अन् मग केवळ स्काय इज द लिमिटची जीवघेणी स्पर्धा सुरू होते. आधीच या जगात दिवसाच्या चोवीस तासांपैकी पंचवीस तास जरी काम केले तरी कोणी नको म्हणत नाही. त्यात कुटुंबात प्रेमाचे घट्ट मर्मबंध असल्यामुळे तिच्यावर उत्तम व कडवे संस्कार झालेले आहेत.

उथळपणा व दांभिकता यांना तिच्या राज्यात प्रवेश नाही. तोच तिच्यातील मजबूत आत्मविश्वासाचा पाया आहे. पण हळूहळू आयुष्य मार्गी लागत असताना औद्योगिक जगात संघर्ष निर्माण होतो. सहकाऱ्यांची खरी रूपं नजरेसमोर येऊ लागतात. तिचा बॉस विनय अरोरा यांच्याशी ती आंतरजातीय विवाह करते.

सुदैवाने तो तिला कायम समजून घेणारा व आधार देणारा निघतो. या सर्वांतून उत्कर्षाचा व सफलतेचा गड सर करताना मनस्ताप, दुःख, सहकाऱ्यांना वाटलेला मत्सर, हेवा-दावा, कट कारस्थाने, स्पर्धा, मैत्री ह्या सर्व पायऱ्या चढतचढत जावे लागते. यात तिला अर्थातच तिच्या विचारांना मानणाऱ्या तत्त्वांना समजून घेणाऱ्या व भरभक्कमपणे साथ देणाऱ्या सहचराची सोबत असतेच.

या सर्व प्रवासात अनेक गुंतागुंतीचे, बरे कधी रोमहर्षक वाटणारे प्रसंग उद्‍भवतच असतात. ते सगळे वाचताना आपोआपच कथेला विलक्षण गती मिळते व कोणताही प्रसंग कंटाळवाणा न करता लेखिका, वाचकांना कुठेही रेंगाळू न देता पुढे पुढे नेत रहाते. कामाशिवायसुद्धा ऑफिसात चाललेल्या स्पर्धा, तडजोडी, स्वार्थ, मर्जर्स-टेकओव्हर, वरिष्ठांची मदत वा आडकाठी, धमक्या, अनावश्यक मागण्या, याही उत्तमपणे व वेगवानपणे चित्रित केल्या आहेत.

माझं-तुझं, अहंकार, स्पर्धा यांची चांगली व वाईट दोन्ही रूपं दाखवण्यात लेखिका यशस्वी झालेली आहे. आधीच आपल्या पिढीला हे जग परकं उरलेलं नाही. त्यामुळे तिथले फायदे, तिथल्या अडचणी, मनावरचे ताण, कामाची व्याप्ती व कामाचे तास या सर्वांशी आपली केवळ तोंडओळख उरलेली नसून घट्ट नातेबंध विणला गेला आहे.

त्यामुळे आपोआपच कथेविषयी अत्यंत जिव्हाळा निर्माण होऊन त्यातले सर्वच प्रसंग आपले वाटू लागतात. हेच प्रसंग, याच घटना, कादंबरीला चैतन्य प्राप्त करून देतात. नायिकेच्या किशोर अवस्थेपासून ते थेट वार्धक्याकडे झुकणाऱ्या प्रौढ वयापर्यंत ही कथा आहे. 393 पानात सामावलेली. ह्या कालखंडातल्या तीन पिढ्यांचे सम्यक दर्शन वाचकांना होते.

जीवनाची बदलत जाणारी मूल्य, नात्यातल्या बदलत जाणाऱ्या जाणिवा, शिक्षणाचे बदलत जाणारे ग्राफ व पैसा व यशाचे बदलते आलेख वाचकांना ओळखीचे असूनही स्तिमीत करत जातात. पैसा माणसाला कसा जोडतो, कसं उभं करतो व कसं नासवतो, याचे विलक्षण रुप घटना घटनांतून सामोरं येत जातं.

मुंबई व बंगळूर या दोन ठिकाणी घडणारी ही कादंबरी, दोन्ही जागांच्या सांस्कृतिक पर्यावरणाला, जीवनाला, निसर्गाला योग्य न्याय देते. यशाच्या शेवटच्या शिखरापर्यंत स्वतःचा आत्मा स्फटिकासारखा निर्मळ व शुद्ध ठेवणाऱ्या नायिकेचे कांदबरीत खूप उत्तम चित्रण केले गेले आहे.

ह्या जगात केवळ तफावतीच्या पायघड्या घातलेल्या असतात. गैरसमज व बेईमानीची मखरे सजवलेली असतात, मत्सर, स्पर्धा व ‘हाणून पाडणे’ वृत्तीच्या पताका फडफडत असतात. पण त्यातूनही तावून सुलाखून निघत स्वतःला बावनकशी सिद्ध करणाऱ्या नायिकेची ही कादंबरी यथोचित वर्णने, वेधक संवाद, सुंदर संवाद, वेगवान घडामोडींनी बहरलेली राहते.

लेखिकेची ही पहिलीच कादंबरी. परंतु पहिल्याच कादंबरीत त्यांनी एखाद्या सराईत लेखकाप्रमाणे लिखाण केले आहे. ‘दिसते तसे नसते’ ह्या उक्तीला विशद करणारी ही कादंबरी केवळ स्त्रीवादी नाही. समाजाच्या स्त्री-पुरुष ह्या दोघांना भेदाने वागवण्याच्या वृत्तीवर प्रहार करताना दुसरीकडे पुरुषांनाही कोणत्या वेगळ्या परिस्थितीतून-समस्यांमधून मार्ग काढावा लागतो हे चित्रित केले आहे.

‘स्वप्नांमागे, उर फुटेस्तोवर धावणारी’ असे रूप नायिकेला बहाल न करता, विवेकाने, संयमाने दोन्ही बाजूंचा विचार करत पुढे वाटचाल करणाऱ्या, खऱ्या अर्थाने सुशिक्षित, मध्यमवर्गीय स्त्रीचे सगळे स्वभाव, कंगोरे लेखिकेने यशस्वीपणे ह्या कादंबरीत मांडले आहेत. एकूणच पहिली असूनही उत्तम जमलेली कादंबरी असे ह्या पुस्तकाला म्हणता येईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Vardhan Kamat Interview: इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स नसल्यामुळे अ‍ॅड हातून निसटली; वर्धन कामत यांची दिलखुलास मुलाखत

Lok Sabha Election 2024: शहजाद्यानं राजा महाराजांचा अपमान केला, पण नवाबांच्या अत्याचारावर मौन बाळगलं, PM मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल

Loksabha Election 2024 : सासष्‍टीत ‘आरजी’ला मिळतोय वाढता प्रतिसाद ; एसटीबहुल परिसरावर पगडा

Vasco News : कोरोनाने नव्‍हे, कोळशाने घेतले बळी; वास्‍कोत कॅप्‍टन कडाडले

Ponda News : फोंड्यातील सुपष चोडणकर ‘जेईई‘मध्ये राज्यात प्रथम

SCROLL FOR NEXT