Child Dainik Gomantak
ब्लॉग

लहानपणीच्या गोष्टी

गोष्टी ऐकण्याची आवड आजच्याही मुलांकडे असेलच. पण गोष्टी सांगणारे कमी होत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

प्रा. विनय ल. बापट

लहापणीन कुडुमऽऽ कुडुमऽऽ कसला आवाज येतो म्हणून बघितलंन बघते तर कायऽऽ? कावळा तिची अंडी खातोये, तिला आला राग, तिने चुलीतली कोलती काढलीन आणि कावळ्याच्या ***÷÷÷ लावलीन त्याबरोबर कावळा कावऽऽ कावऽऽ कावऽऽ करीत पळून गेला.

इटुकली मिटुकली गोष्ट सरो तुमचे आमचे पोट भरो..’ बाबा ही गोष्ट अगदी रंगवून सांगायचे. त्यामुळे तीच तीच गोष्टसुद्धा त्यांच्याकडून पुन्हा ऐकायला मजा यायची.

एरवी गोष्ट म्हटली की सहज आजी-आजोबा आठवतात पण आमच्या नशिबात आजी- आजोबा नव्हतेच! एवढेच नव्हे आमच्या जवळपास कोणाचे घरही नव्हते त्यामुळे आई-बाबा सोडून आम्हांला गोष्टी सांगणारे तसे कोणीच नव्हते.

आम्ही लहान असताना, आई बरीच व्रतवैकल्ये करायची आणि त्या व्रतांची कहाणी असायची. आई पूजा झाली की कहाणी वाचायची. ‘आटपाट नगर होतं तिथे एक दरिद्री ब्राह्मण राहत होता..’ या कथा मला ऐकायला खूप आवडायच्या.

कदाचित माझ्या मनात साहित्याची आवड या कथांनीच निर्माण केली असावी. आई नागपंचमीची कथा वाचायची तेव्हा ती सळसळत जाणारी नागीण मला माझ्या डोळ्यांसमोर दिसायची. ‘कधी सगळेजण शंकराचा दुधाने अभिषेक करतायेत पण गाभारा दुधाने भरत नाही.

एक म्हातारी येते देवाची प्रार्थना करते आणि वाटीतून आणलेलं दूध पिंडीवर ओतते गाभारा भरून वाहू लागतो..’ लहानपणी नकळतपणे आमच्यावर संस्कार करण्याचे काम कहाण्यांनी केले. एका कहाणीत उंदरांनी तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणावर टाकली म्हणून तिला घरातून बाहेर काढली असे सांगितले होते. हे असे का? हे मला अजिबात कळत नसे आणि विचारले तर आई अजिबात काही सांगत नसे.

आई गोष्टी पण खूप चांगल्या सांगत असे डुब्याची गोष्ट ऐकताना आता त्याला आणि त्याच्या आईला वाघ खाणार म्हणून डोळ्यात पाणी येत असे. पण त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो आणि वाघ म्हणजे कृष्णच असतो हे समजे तेव्हा आनंदाला पारावार राहत नसे. आ

वडत्या आणि नावडत्या राणीची गोष्ट तर खूपच आवडीची. ‘बाईऽऽ बाईऽऽ कुठे चाललीस मला थोडं पाणी घाल’ म्हणणारे ते झाड त्याला पाणी घालणारी ती नावडती राणी आणि तळ्यात तीनदा डुबकी मारून सौंदर्यवती होऊन ती परत येताना तिला दागिने देणारी तुळस आणि आपणाला मोडून टाकणारी आणि विद्रूप होऊन परत येणाऱ्या त्या दुसऱ्या राणीला आपल्या काठीने मारणारे गुलाबाचे झाड डोळ्यासमोर उभे राही.

आई कणकीच्या बावल्याची एक गोष्ट सांगत असे. त्यातील ते तांबड्या तोंडाचे माकड अगदी डोळ्यासमोर नाचत असे. आत्ते कधी आली की, उंदीरलीची गोष्ट सांगत असे. उंदराची उंदिरली तेलातुपात पडून मरून गेली आणि तो पाट त्याच्या पार्श्वभागाला चिकटायचा. तसेच उंदराच्या टोपीची मांजराच्या खीर खाण्याची.

आणि ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक’ म्हणणारी ती म्हातारी. या गोष्टी कोणी ना कोणी सांगतच असे. रामायण महाभारतातील अनेक गोष्टी अशाच कोणाच्या तरी तोंडूनच ऐकल्या. त्यातील कायम लक्षात राहिलेल्या गोष्टी म्हणजे बकासुराची आणि मारुती शेपटी उचलायला लावून भीमाची फजिती करतो ती.

मामाचा बंडूभाऊ कधीतरी यायचा आणि तो आम्हांला देवचाराची गोष्ट सांगायचा. ती बहीण भावाची गोष्ट ऐकताना आणि तो भाऊ देवचाराला घाबरवून आपल्या बहिणीची त्याच्या तावडीतून कशी सुटका करून आणतो, हे ऐकायला खूप मजा यायची.

गोष्ट सांगायचा कंटाळा असला की कापूस कांद्याची आणि एक चिमणी आली आणि एक दाणा घेऊन गेली ही गोष्ट सुरू व्हायची. आमच्या वैभवला न संपणारी गोष्ट हवी असायची आणि मग बाबांच्या कल्पनेला पंख फुटायचे. मग माणसे उडू लागायची आणि ती उडणारी, एका घरावरून दुसऱ्या घरावर बसणारी माणसे घरातीलच असायची. त्यामुळे आम्हांला खूप हसू यायचे.

या गोष्टी सांगण्यामध्ये आणखी दोन माणसांचा उल्लेख केलाच पाहिजे त्यातील पहिला मावश्या आणि दुसरा दादू. मावश्या वयाने सत्तरीच्या पुढचा. तो काही वर्षे आमच्याकडे राहायला होता. त्याच्याकडे लोककथांचा खजिना होता. ‘एक आसलो कोलो. त्याच्या भोकाक लागलो गेळयेचो काटो.

थय जालो मातेर...’ मग त्याने कुंभाराकडून मडया घेऊन येणे, तो पू त्यात भरणे, तो तूप म्हणून विकणे.. असे खूप काही असायचे. दादूसारखा गोष्टी सांगणारा मी दुसरा कोणीच बघितला नाही. गोष्ट रंगवून सांगावी तर त्यानेच आणि सगळ्या गोष्टी प्रत्यक्षातल्या.

त्याच्या अनुभवाच्या. जास्तीशा शिकारीच्या, पाखल्यांच्या आणि खापरींच्या. ‘आवय***** उकलली आनि लागले पेटोंवपाक...’ ऐकता ऐकता आम्ही एका वेगळ्याच विश्वात जायचो. दादू क्वचित कधीतरी रात्री राहायला असायचा आणि त्याच्या गोष्टी ऐकताना मध्यरात्र कधी झाली ते कळत नसे.

ऐकण्याची प्रचंड उत्सुकता पण तेवढेच भय वाटत असे त्या भुतांच्या गोष्टी ऐकताना. बाबांकडे या भुतांच्या गोष्टींचा बराच स्टॉक होता त्यांचे स्वतःचे काही अनुभव होते. रात्री भुतांच्या गोष्टी ऐकल्या तर झोपताना मी बाबांच्या जानव्यात हात घालून झोपत असे.

कारण, ‘गळ्यात जानवे असले की भूत येत नाही’, असे सांगितलेले असे. ओठात मारुती स्तोत्र नाही तर रामरक्षा असे.. आणि तरीही रात्री लघवीची भावना झालीच तरी उठून बाहेर जाण्याची हिंमत होत नसे.

आज माध्यमे बदलली आहेत. गोष्टी ऐकण्याची आवड आजच्याही मुलांकडे असेलच. पण गोष्टी सांगणारे कमी होत आहेत. आधुनिक गॅजेट्स ही उणीव भरून काढतील का, हा माझ्यासमोरचा प्रश्न आहे!

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

शनिदेवाची वक्रदृष्टी संपली, आता सुरु होणार सुखाचे दिवस! 'या' दोन राशींचे भाग्य अचानक चमकणार; डिसेंबरपर्यंतचा काळ ठरणार खास

Cricketer Passes Away: क्रिडाविश्वात शोककळा! माजी क्रिकेटपटूचे वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी निधन; दिल्लीत सुरू होते उपचार

Stray Dogs Virus: भटक्या कुत्र्यांना 'व्हायरस'ची लागण? कुत्र्यांच्या मृत्यूच्या घटनांत वाढ, डिचोलीत चिंता

Syria Bomb Blast: सीरियात हॉटेलबाहेर भीषण स्फोट! फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष थोडक्यात बचावले, 6 जणांचा मृत्यू VIDEO

Pandharpur Wari: वारकऱ्यांना सरकारकडून 5 लाखांपर्यंत आर्थिक मदत; प्लास्टिकमुक्त वारीला द्या प्राधान्य- मुख्यमंत्री डॉ. सावंत

SCROLL FOR NEXT