आज आपल्याकडे नाट्यचळवळ कायम राहावी म्हणून सरकारी यंत्रणा कार्यरत असताना दिसते खरी, पण त्यात भविष्याचा विचार कुठेच दिसत नाही. ‘नाटकांच्या स्पर्धा भरवणे’ हे एकमेव ध्येय असूच शकत नाही. आणि जेव्हा आपण स्पर्धा म्हणतो, तेव्हा त्या स्पर्धामध्ये आपलं नाटक पहिलं यावं यासाठी केलेला अट्टाहास दिसतो- नाटक दिसतच नाही. आजच्या काळात समयोचित संहिता निवडून नाटक करणं गरजेचं आहे. त्यातल्या त्यात परदेशी नाटकं (संहिता) आपल्या भूमीवर करायची आज एक वेगळाच ट्रेण्ड येताना दिसतो, ज्याचा बघणाऱ्याचा तिळमात्र फायदा होत नाही.
नाटक किंवा रंगभूमी ही गोष्ट नुसती ‘मनोरंजन’ म्हणूनच असणे खूप धोक्याचेही आहे. नाटक हे एक माध्यम आहे आणि ते माध्यम माणसाच्या जीवनाशी खूपच निगडित आहे, जे एखाद्याचं आयुष्यही बदलू शकतं. मी परदेशी नाटकाच्या विरुद्ध नाही, परंतु आपल्याकडे मासेमारी समाज, आदिवासी समाज इत्यादी बरेच समाज आहेत, त्यांचे वेगवेगळ्या प्रकारे जगणे आहे, त्यांचे वेगळे प्रश्न आहेत. हे प्रश्न कुठल्याच नाटकामध्ये दिसत नाहीत. कमीअधिक प्रमाणात ‘चित्रकला’ माध्यमात गोव्यात ते दिसतं, पण नाटकात नाही. जोपर्यंत हे प्रश्न नाटक हाताळणार नाही, तोपर्यंत इथले प्रश्न आणि त्यांचं गांभीर्य व्यवस्थेला कळणे कठीणच आहे.
नाट्यविषयक शक्यता जिथे दिसतात त्या जागा ढुंडाळायला हव्यात. त्या जागा आम्हाला आशय, संवाद प्रदान करतील. शहरी स्थापत्याला आशयाची ‘नाट्यमयता’ मांडणे कसे शक्य आहे? सरळ सांगायचं झाल्यास गोमंतकातील बऱ्याच नाटकांमध्ये विषय दिसतो, विचार दिसत नाही. त्यातल्या त्यात नाटक माहीत असणारा कलाकार ‘मेथड’, ‘फॉर्म’, यामध्येच अडकलेला दिसतो. कुठल्यातरी विख्यात नाटककाराने, नाटकाबद्दल अमुक अमुक विचार सांगितलेला आहे किंवा फॉर्म मांडलेला आहे हे कळल्याबरोबर, तो फॉर्म बाणवण्याचा प्रयत्न आपला दिग्दर्शक करतो. पण मला वाटतं की आपण जे जगतो त्यातही काहीतरी आतमध्ये दडलेलं असते. ते शोधण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही. उदा: बर्तोल्ट ब्रेस्टने एलिएनेशन सिद्धांत नाटकात आणला, तर तो कुठून आला, का आला, केव्हा आला ह्याबद्दल आपल्याला प्रश्न पडत नाही. मुळात ब्रेख्तने ‘एलिएनेशन’चा (परकेपणाचा) वापर केवळ एक विशिष्ट सौंदर्यवादी संकल्पना म्हणून नव्हे तर थिएटरचे राजकीय अंग म्हणून मांडला आणि त्यावरही कार्ल मार्क्सच्या सिद्धांताचा प्रभाव होता
सांगण्याचा मुद्दा हाच की, त्या त्या वेळचे त्या त्या समाजातले काही प्रश्न असतात. ते कलाकार अभिव्यक्त करू शकतो, जेणेकरून त्या प्रश्नांचा आवाज अख्ख्या जगाला ऐकू जाईल. गोव्याच्या रंगभूमीवर ते होताना दिसत नाही. त्यातल्या त्यात काही नाट्यप्रेमी ते करतात हा तेवढाच एक आनंद. ग्रोटोव्स्की म्हणतो, अभिनेत्याने शरीराबरोबर ‘विचारांवर’ही भर दिला पाहिजे. किंबहुना, अभिनेत्यांनी नाट्यरचनेत एकदा स्वत:च्या कृती निश्चित केल्यानंतर मंचावर जे काही घडेल त्याबद्दल इतरांशी सहमत होणे आवश्यक असले पाहिजे असे काही नाही.
- केतन जाधव
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.