LIC Scheme: देशातील लोक वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. काही लोक एसआयपी (SIP) द्वारे म्युच्युअल फंडात, तर काही इक्विटीमध्ये किंवा गोल्ड ईटीएफमध्ये पैसे गुंतवतात. याव्यतिरिक्त, सरकारी योजनांमध्ये एलआयसी (LIC) पासून ते पीपीएफ आणि सुकन्या समृद्धी योजनेसारख्या पर्यायांमध्येही चांगला परतावा मिळतो. आजही एलआयसीच्या काही योजना चांगला परतावा देत आहेत.
याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) दोन नवीन विमा योजना सुरु करण्याची घोषणा केली. एलआयसीच्या या दोन्ही नवीन योजना उद्या, म्हणजेच 15 ऑक्टोबरपासून ग्राहकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. या योजनांची नावे 'एलआयसी जन सुरक्षा' (LIC Jan Suraksha) आणि 'एलआयसी बीमा लक्ष्मी' (LIC Bima Lakshmi) अशी आहेत. या दोन्ही योजना वेगवेगळ्या गरजा असलेल्या लोकांसाठी सुरु करण्यात आल्या आहेत.
'एलआयसी जन सुरक्षा' योजना विशेषतः गरीब आणि कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी एक स्वस्त विमा योजना आहे. हा एक 'नॉन-पार्टिसिपेटिंग' आणि 'नॉन-लिंक्ड' प्लान आहे. याचा अर्थ, या योजनेच्या परताव्यावर बाजारातील चढ-उतार किंवा कंपनीच्या बोनसचा कोणताही परिणाम होत नाही. हा एक मायक्रो-इन्शुरन्स प्लान असून तो आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकातील लोकांसाठी तयार करण्यात आला आहे. या योजनेचा हप्ता कमी ठेवण्यात आला असून तो भरण्यासाठी सोपे पर्याय उपलब्ध आहेत. या योजनेत गुंतवणूक केल्यास गरीब कुटुंबांना कमी खर्चात आर्थिक सुरक्षा मिळणार आहे.
'एलआयसी बीमा लक्ष्मी' योजना एक नवीन आयुर्विमा (Life Insurance) आणि बचत (Saving) योजना आहे. हा देखील 'नॉन-पार्टिसिपेटिंग' आणि 'नॉन-लिंक्ड' प्लान असल्याने याचा परतावा शेअर बाजारावर (Stock Market) अवलंबून नाही. या योजनेत ग्राहकाला आयुर्विमा संरक्षणासोबतच मॅच्युरिटीवर एकरकमी रक्कम मिळेल. ही पॉलिसी वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी लाँच केली जात आहे. यामुळे लोकांना बचत आणि आर्थिक सुरक्षा या दोन्हीचा फायदा मिळेल. मध्यमवर्गीय लोकांसाठी ही एक चांगली गुंतवणूक मानली जात आहे.
या दोन नवीन योजनांच्या घोषणेनंतर एलआयसीच्या शेअरच्या दरात थोडी वाढ दिसून आली. बाजारात थोडी कमजोरी असूनही एलआयसीचा शेअर 893.45 च्या नीचांकी पातळीवरुन 904.15 पर्यंत पोहोचला.
एलआयसी या दोन्ही योजनांच्या माध्यमातून विमा संरक्षण सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे. 'जन सुरक्षा' योजनेद्वारे गरीब लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे तर 'बीमा लक्ष्मी' योजनेद्वारे बचतीला प्रोत्साहन देण्याचे ध्येय आहे. दिवाळीपूर्वी, या दोन योजना बाजारात आणल्यामुळे लोकांचा बचतीकडे कल वाढेल, अशी आशा आहे. या दोन्ही योजनांचा हप्ता कमी ठेवून एलआयसीने जास्तीत जास्त लोकांना विमा कवच देण्याचा प्रयत्न केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.