मडगाव: जी भाषा राज्यात सर्वांत अधिक प्रमाणात बोलली जाते तीच भाषा त्या राज्याची राजभाषा करण्याची स्पष्ट तरतूद राज्यघटनेत असताना मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्या, अशी जी मागणी होत आहे, तीच मुळात असंविधानिक आहे, असा दावा करून कोंकणी चळवळीतील ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार उदय भेंब्रे यांनी ही मागणी मान्य झाल्यास गोवा हे द्विभाषिक राज्य होईल आणि ते गोव्याच्या फायद्याचे नसेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. आज मराठीची जे मागणी करताहेत, त्यांना गोव्याला नुकसानीच्या खाईत लोटायचे आहे का? असा सवालही त्यांनी केला.
‘गोमन्तक टीव्ही’च्या ‘साश्टीकार’ या लोकप्रिय कार्यक्रमात भेंब्रे यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली. द्विभाषिक राज्ये कशी हानिकारक आहेत, हे यापूर्वी महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेश या राज्यातील अनुभवावरून दिसून आले आहे. महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य व्हावे यासाठी १०६ जणांना आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली होती, हे आता मराठी राजभाषा करा, अशी मागणी करणारे गोव्यातील मराठीप्रेमी विसरले आहेत का? असा सवाल भेंब्रे यांनी केला. भेंब्रे यांची मुलाखत ‘गोमन्तक’चे ब्युरो चीफ सुशांत कुंकळयेकर यांनी घेतली आहे.
मराठीलाही राजभाषेचा दर्जा द्या, अशी जे मागणी करतात त्यांना कायद्याची काहीच माहिती नाही, अज्ञानातून ही मागणी केली जात आहे. सरकारला गरज भासल्यास एका किंवा सर्व कामांसाठी मराठीचा वापर केला जाऊ शकतो, अशी तरतूद आहे. याचाच अर्थ मराठीलाही समान दर्जा असा जो दावा गोव्यात काही जणांकडून केला जात आहे, तो पूर्णत: चुकीचा असून मराठी जर सहभाषा असती तर तिला राजभाषा करावे, अशी मागणीच करण्याची पाळी का आली असती? असा सवाल भेंब्रे यांनी केला. वास्तविक गोव्यातील राजभाषा कायद्यात मराठीला जे स्थान दिले आहे ते भरपूर आहे. त्यामुळे त्यातच समाधान मानणे हे मराठीप्रेमींसाठी योग्य ठरेल, असे ते म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.