Oscar Rebello : सर्वसमावेशक विचारसरणी संकुचित करण्याचा प्रयत्न! गोव्याच्या विकासाचा विचार ही काळाची गरज; डॉ. ऑस्कर रिबेलो

Subhash Velingkar Controversy About St Francis Xavier Relics DNA: धार्मिक ऐक्य अबाधित राखून गोव्याच्या विकासाचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी मांडले

Subhas Velingkar Statement on SFX

पणजी: आपण आपला इतिहास जाणून घेतला पाहिजे, त्याच्याबाबत विचार केला पाहिजे. भूतकाळात अडकून राहता कामा नये. मागील विषय उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. धार्मिक ऐक्य अबाधित राखून गोव्याच्या विकासाचा विचार करणे ही काळाची गरज आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी मांडले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात संपादक-संचालक राजू नायक यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विश्‍व हिंदु परिषदेचे गोवा प्रांतप्रमुख मोहन आमशेकर यांनीही या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. रिबेलो म्हणाले, सुभाष वेलिंगकर जो इतिहास उकरून काढत आहेत, तो विचार गोव्याच्या भविष्याच्या अनुषंगाने योग्य नाही. ते ज्या पद्धतीने भाषण करून ख्रिस्ती समाजाला चिथावण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे आपसांतील दरी वाढत जाणार आहे.

‘विहिंप’चे संस्कारांना प्राधान्य

आजही समाजात अशा अनेक गोष्टी घडतात, ज्या योग्य नाहीत. या देशातील प्रत्येकजण, मग तो हिंदू असो, ख्रिस्ती असो वा अन्य धर्मीय, आम्ही एक आहोत. आमचे पूर्वज एक आहेत, याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रमुख मोहन भागवत यांनीही भाष्य केले आहे. आम्ही आमची संस्कृती अबाधित राखली पाहिजे, असे विश्‍व हिंदु परिषदेचे गोवा प्रांतप्रमुख मोहन आमशेकर यांनी सांगितले. प्रत्येकाच्या धर्माचा आदर करणे गरजेचे आहे. विश्‍व हिंदु परिषद ही संस्कारांचा विचार करणारी संघटना आहे. त्यामुळे विश्‍व हिंदु परिषद नेहमी चांगल्याच गोष्टींना तसेच कामांना समर्थन देत असल्याचे आमशेकर यांनी यावेळी सांगितले.

गोमंतकीयांनो, शांतता राखा!

हिंदू समाज सहिष्णु आहे; परंतु आम्ही आमचा इतिहास जाणून घेतला पाहिजे. जो आपला इतिहास विसरतो, त्यांचा भूगोल बदलतो. इतिहासात घडलेल्या चुका पुन्हा घडू नयेत, यासाठी तो जाणून घेणे गरजेचे असते. परंतु, गोव्यात धार्मिक विधानांवरून ज्या प्रकारचे वातावरण निर्माण झाले आहे, ते पाहता गोवेकरांनी रस्त्यावर उतरण्याऐवजी शांतता राखणे गरजेचे आहे, असे मोहन आमशेकर म्हणाले.

क्लॉड-ऑस्कर यांची भूमिका स्तुत्य

हा काळ रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा नाही. जे काही प्रश्‍न असतील, ते न्यायालयीन पद्धतीने सोडविणे आवश्‍यक आहे. ख्रिस्ती समाज रस्त्यावर उतरल्यावर ॲड. क्लॉड आल्वारिस आणि डॉ. ऑस्कर रिबेलो यांनी जी भूमिका घेत नागरिकांना शांततेचे आवाहन केले, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो, असेही आमशेकर यांनी सांगितले.

ऑस्कर उवाच...

मुक्तीनंतर भाऊसाहेब बांदोडकर आणि जॅक सिक्वेरा यांनी गोवा घडविला.

प्रतापसिंह राणे, सिक्वेरा आदींनी तो सांभाळला; परंतु वर्तमान स्थितीत कोणत्याही राजकीय नेत्यांवर आम्हाला विश्‍वास ठेवता येणार नाही.

हिंदू समाजाची जी सर्वसमावेशक, स्वतंत्र विचारसरणी होती, ती आता संकुचित करण्याचा प्रयत्न केला जातोय.

ख्रिस्ती समाजाने देखील इन्क्विझिशन भयावह होते, हे मान्य करायला काय हरकत आहे?

गोव्याच्या विकासाला दिशा द्यायची असेल, तर हिंदु, मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्मीयांच्या धर्माचार्यांनी एकत्र येऊन वाटचाल ठरविल्यास ते जगापुढे उत्तम उदाहरण ठरेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com