पणजी: राज्यात विद्यमान सरकारविरोधात असंतोष आहे. योग्य प्रशासन देण्यात हे सरकार कमी पडले आहे. काँग्रेसचे तीन आमदार आहेत. ते सोडून जर काँग्रेसने चारित्र्यवान, कोणताही डाग नसलेले ३७ नवे उमेदवार दिले, योग्य नियोजन केले, तर गोव्यात निश्चितपणे परिवर्तन घडू शकते; मात्र विविध पक्षांत फिरून आणलेले उमेदवार दिल्यास पुन्हा काँग्रेसला गळती लागायला वेळ लागणार नाही. आपण मतदारांना कधीच गृहीत धरू शकत नाही, असे मत राजकीय विश्लेषक राधाराव ग्रासियस यांनी व्यक्त केले.
गोमंतक टीव्हीवरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात ते बोलत होते. या चर्चेत भाजप प्रवक्ते सिद्धार्थ कुंकळकर व विशाल पै काकोडे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी बोलताना कुंकळकर म्हणाले की, काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर तिकीटविक्रीचा आरोप तामिळनाडू निवडणुकीच्या वेळी करण्यात आला आहे. तसेच त्यांच्या माजी आमदारांनीही त्यांच्यावर आरोप केले आहेत. सद्यस्थितीत काँग्रेसने विश्वासार्हता गमावली असून भाजप निश्चितपणे पुन्हा निवडणूक जिंकेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. येथे प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान केला जातो. कार्यकर्त्यांमुळेच आज पक्ष इतका मोठा झाला आहे. धर्मनिरपेक्ष मतदार हे भाजपलाही मतदान करतात असे मत कुंकळकर यांनी व्यक्त केले.
चाळीसही मतदारसंघांत भाजप सक्षम
गिरीश चोडणकर यांनी “शंभर कोटी रुपये अल्पसंख्याकांची मते मिळविण्यासाठी भाजपने तयार ठेवले आहेत” असे वक्तव्य करून स्वतःच्या मतदारांचा अपमान केला आहे. भाजप “सबका साथ, सबका विश्वास” या तत्त्वावर चालणारा पक्ष असून जात-धर्म न पाहता कोणत्याही योजना राबवल्या जात नाहीत. सर्व योजना गोमंतकीयांसाठी आहेत. आज भाजप राज्यातील चाळीसही मतदारसंघांत सक्षम असल्याचे मत सिद्धार्थ कुंकळकर यांनी व्यक्त केले.
कोणीही जनतेला गृहीत धरू नये
भाजप एखादा निर्णय घेतो, त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताची खबर उजव्या हाताला नसते. आणि जर चोडणकर म्हणत असतील की अल्पसंख्याक मतांसाठी १०० कोटी रुपये भाजपने ठेवले आहेत, तर ही माहिती त्यांना कोणत्या भाजपवाल्याने दिली याचा विचार व्हावा. आज ख्रिश्चन समाज पूर्णपणे काँग्रेससोबत आहे, असे म्हणता येणार नाही. राजकारणात सदोदित समीकरणे बदलत असतात. त्यामुळे कोणीही जनतेला गृहीत धरून मतदानाला सामोरे जाणे चुकीचे ठरेल, असे ग्रासियस यांनी सांगितले.
काँग्रेसने आत्मपरीक्षण करावे
काँग्रेसने स्वतःची रणनीती ठरविली पाहिजे. तळागाळात काम केले पाहिजे. आपल्या कॅडरमधून कार्यकर्ते घडवून त्यांना मोठे व्यासपीठ देणे, उमेदवारी देणे गरजेचे आहे. ही गोष्ट मी मागील चार वर्षांपासून सांगत आहे. प्रत्येक पक्षाला आपले विचार जनतेसमोर मांडण्याचा अधिकार आहे. समोरचा पक्ष किती बलवान आहे, यापेक्षा आपण विजय कसा मिळवू शकतो, याला प्राधान्य देत काँग्रेसने काम केले पाहिजे. काँग्रेसने आत्मपरीक्षण करण्याची हीच वेळ आहे, असे विशाल पै काकोडे यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.