'आम्हा गोवेकरांना दिल्लीने लुबाडले'! उद्योजक तिंबले, दत्ता नायक यांनी मांडली परखड मते

Sadetod Nayak: गोव्याच्या हितासाठी सरकार, मंत्री घाबरतील अशी भूमिका घेत माझे काम मी निर्भयपणे करत राहणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक, विचारवंत दत्ता नायक यांनी केले.

Exclusive Interview with Auduth Timblo & Datta Naik

पणजी: माझ्या आयुष्यातील पुढील १० वर्षांच्या कार्यकाळात मी साहित्यिक कार्य करणार आहे. त्यासोबतच व्यवसायातही मोठ्या प्रमाणात वेळ देणार आहे. मी वानप्रस्थ न स्वीकारता अतिशय स्फूर्ती आणि जोमाने काम करत राहणार आहे. मी गोव्यात घडणाऱ्या परिस्थितींचा मूकप्रेक्षक बनून राहणार नाही. गोव्याच्या हितासाठी सरकार, मंत्री घाबरतील अशी भूमिका घेत माझे काम मी निर्भयपणे करत राहणार असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध उद्योजक, विचारवंत दत्ता नायक यांनी केले.

‘गोमन्तक टीव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या सडेतोड नायक कार्यक्रमात दत्ता नायक यांच्या ७०व्या वाढदिनानिमित्त घेतलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. या मुलाखतीत प्रसिद्ध उद्योजक अवधूत तिंबले यांनीदेखील सहभाग घेतला होता.

माझ्या यशाचे मुख्य रहस्य हे वेळेचे व्यवस्थापन आहे. मी माझी कामे कधीच उद्यावर ढकलत नाही. मी माझी आत्मस्तुती करत नाही. माझ्याकडे ज्ञान, नेतृत्व करण्याची क्षमता आहे; परंतु समाजाने त्याचा योग्यप्रकारे उपयोग करून घेतला नाही, अशी खंत दत्ता नायक यांनी व्यक्त केली.

पूर्वी उद्योगपती म्हणजे एक वेगळी धारणा होती; परंतु आता उद्योगपती म्हणजे प्रदूषण करणारा असे मानले जाते. मोबाईल, काचेचा ग्लास, घरासाठी लागणारे लोखंड व इतर सर्व साहित्य हे खाण व्यवसायातूनच येते. याचा वापर करणारे जर कोणाला तरी दोषी ठरवत असतील, तर ती विसंगती आहे. खाण कंपन्या जेवढा पैसा करू शकल्या असत्या, तेवढा पैसा त्यांनी केलेला नाही. खरे सांगायचे तर, पैसा लोकांनी केला. ७० हजार कुटुंबीयांना हा व्यवसाय मागील तीस वर्षांच्या कालावधीत प्रतिवर्षी ३ हजार कोटी रुपये देत होता. सुमारे दीड लाख कोटी रुपये कराच्या माध्यमातून घेतले. गोव्यात पूर्वी लिस्बन (पोर्तुगीज) राज्य करत होते आता दिल्ली करते. खाण व्यवसायातून आलेला पैसा दिल्लीला घेऊन गेले. आम्हा गोवेकरांना दिल्लीने लुबाडले असल्याचे प्रखर मत उद्योजक अवधूत तिंबले यांनी व्यक्त केले.

गोव्याचे भविष्य भूतकाळापेक्षा चांगले!

माझ्या शेजारी लॅम्बर्ट मास्कारेन्हस हे स्वातंत्र्यसैनिक राहायचे. त्यांच्या ९०व्या वाढदिनाच्या सोहळ्यात मी गेलो असता ते रडत होते आणि सांगत होते की, अशाप्रकारच्या सरकारने आमच्यावर सत्ता गाजवावी यासाठी का आम्ही मुक्तीसाठी प्रयत्न केले होते? मी घटक राज्य संकल्पना मानत नाही. राज्य हे एकाअर्थी केंद्राचे चाकर असे म्हणू शकतो. ज्यावेळी गोवा केंद्रशासित प्रदेश होता त्यावेळी भ्रष्टाचार नव्हता. आता समाजही भ्रष्टाचारात गुरफटला आहे; परंतु आजही गोव्यात पारदर्शकता आहे. गोव्याचे भविष्य हे भूतकाळापेक्षा अधिक चांगले असल्याचे मत तिंबले यांनी व्यक्त केले.

आवाज उठविणे गरजेचे!

आज गोव्यातील राजकारण पाहिले तर राजकारणी निवडणुकीनंतर जाहीरनामे विसरतात, पक्ष विसरतात. आमदार आपल्याला हवे तसे वागतात. मला वाटते की राजकारण आणि प्रशासनात शिस्त आणण्यासाठी पक्षांतर विरोधासंबंधी अतिशय कडक कायदा आणणे गरजेचे आहे. त्यासोबतच प्रशासकीय सेवा ही ग्राहक सेवेप्रमाणे व्हायला हवी. आज रियल इस्टेट व्यवसायात असणाऱ्यांना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला सामोरे जावे लागत आहे. सरपंच, आमदार, अधिकारी सर्वजण पैसे मागतात, याविरुद्ध आपण जोरदार आवाज उठविणे गरजेचे असल्याचे दत्ता नायक यांनी सांगितले.

बदल हा काळानुरूप होत असतो!

पोर्तुगीज राजवटीत आम्हाला मुंबई किंवा भारतात जाण्यासाठी पोर्तुगीज पासपोर्ट निश्‍चित वापरावा लागायचा; परंतु माझी देशभक्ती भारताप्रती होती. पन्नास वर्षांमागे आम्ही जे वृत्तपत्रात वाचायचो ते आज आम्ही प्रत्यक्षात पाहत आहोत. कदाचित ज्यावेळी आम्ही पुढील पन्नास वर्षांनी गोवा पाहू तेव्हा मागील ५० वर्षांतील गोवा चांगला होता, असे म्हणू; परंतु बदल हा काळानुरूप होत असतो. आजचे युग तंत्रज्ञान आणि डिजिटलायजेशनचे आहे. त्यामुळे डिजिटल आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भ्रष्टाचार रोखत पारदर्शकता आणू शकतो, असे उद्योजक अवधूत तिंबले यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com