Mayem News: भाजीचे मळे फुलणार, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर हसू येणार; मये होणार ‘कृषी’समृद्ध

MLA Premendra Shet: मये मतदारसंघाला कृषी क्षेत्रात समृद्ध करण्याचा संकल्प असून, त्यासाठी प्रत्येक भागातील बांधांचा विकास करण्यात येणार आहे. या संकल्पपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी कृषी लागवडीकडे भर द्यावा, असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले.

डिचोली: मये मतदारसंघाला कृषी क्षेत्रात समृद्ध करण्याचा संकल्प असून, त्यासाठी प्रत्येक भागातील बांधांचा विकास करण्यात येणार आहे. या संकल्पपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी कृषी लागवडीकडे भर द्यावा, असे मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी सांगितले. कृषी खात्यातर्फे मयेतील भावकई खाजन बांध आणि मानसीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. शनिवारी विजयादशमीच्या मुहूर्तावर या कामाचा शुभारंभ केल्यानंतर आमदार शेट बोलत होते.

याप्रसंगी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, मयेच्या सरपंच सीमा आरोंदेकर, दिलीप शेट, विशांत पेडणेकर, वर्षा गडेकर आदी पंचसदस्य जिल्हा पंचायतीच्या माजी अध्यक्ष अंकिता नावेलकर, नार्वेचे सरपंच संदेश पार्सेकर, कृषी खात्याचे अभियंता के. राधेश, भाजप मंडळाचे अध्यक्ष दयानंद कारबोटकर, सरचिटणीस विश्वास चोडणकर, महिला मोर्चाची अध्यक्ष श्रुती जल्मी, माजी सरपंच विजय पोळे, माजी उपसरपंच नरेंद्र मयेकर, खाजन कूळ संघटनेचे अमर गावकर आणि सदस्य तसेच भाजप कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. नामफलकाचे अनावरण आणि नारळ वाढवून आमदारांच्या हस्ते या कामाचा शुभारंभ करण्यात आला.

सरकार उपलब्ध करून देत असलेल्या संधीचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी शेती करण्याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, असे आवाहन शंकर चोडणकर यांनी केले. बांध आणि मानस दुरुस्तीचे काम करण्यात येत असल्याबद्दल अमर गावकर यांनी समाधान व्यक्त केले. सूत्रसंचालन विश्वास चोडणकर यांनी केले. नरेंद्र मयेकर यांनी आभार मानले.

७६ शेतकऱ्यांना होणार फायदा

कृषी खात्याच्या माती संवर्धन विभागातर्फे भावकई खाजन शेतीकडील बांध तसेच मानसीची दुरुस्ती करण्यात येणार आहे. या कामासाठी ६.७५ कोटी मंजूर झाले आहे. पावणेदोन किलोमीटर लांबीचा बांध पक्का झाल्यानंतर जवळपास ३० हेक्टर शेतजमीन लागवडीखाली येऊन ७६ शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे. भरतीच्यावेळी कालवी रस्ता पाण्याखाली येण्याचे प्रकारही टळणार आहेत.

मिरजी-भाजीचे मळे आता फुलणार

भावकई येथील खाजन बांधाला ‘खावटे’ पडून खारे पाणी शेतजमिनीत घुसत असल्याने गेल्या जवळपास चार वर्षांपासून खाजन शेती पडीक ठेवली आहे. मिरजी-भाजीचे मळेही फुलवायला मिळत नाहीत. आता बांध आणि मानसीचे विकसित काम करण्यात येणार असल्याने भावकईतील शेतकऱ्यांसाठी ते वरदान ठरणार आहे.

शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त

भावकई खाजन बांध आणि मानसीची दुरुस्ती करण्यात येणार असल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. बांधाला खावटे पडून नदीचे खारे पाणी शेतजमिनीत घुसत असल्यामुळे शेती नापीक बनली आहे. भातशेती आणि मिरची तसेच भाजी लागवड करण्यापासून शेतकरी वंचित आहेत. आता ही समस्या सुटून शेतकऱ्यांना पुन्हा नव्या जोमाने शेती करणे सोपे होणार असल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com