पणजी: उपेंद्र गावकर यांच्या अध्यक्षतेखाली गोमंतक भंडारी समाज संघटनेची केंद्रीय समिती जाहीर करण्यात आली. ही समिती राज्यभरात सदस्यत्व मोहीम राबवून साडेतीन लाख सदस्य नोंद करणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.
समाजात फूट पडावी, यासाठी काही राजकीय पक्ष आणि नेते कार्यरत आहेत. त्यांचा डाव साध्य होऊ नये, यासाठी ही समिती निवडण्यात आल्याचे यावेळी नमूद करण्यात आले. सध्या देवानंद नाईक यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत असलेल्या केंद्रीय समितीवर समाजाचा विश्वास नाही. त्यांच्या समितीला संस्था निबंधकांकडे आव्हान दिले आहे. त्यांची निवड रद्द झाली, की नव्याने निवडणूक घेण्यात येईल. तेव्हा आज निवडण्यात आलेली समिती बरखास्त केली जाईल, असेही जाहीर करण्यात आले आहे.
या समितीची घोषणा करण्यासाठी येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी समितीत समावेश असलेले तिघेजण वगळता इतर सर्व उपस्थित होते. संजीव नाईक म्हणाले, इतर मागासवर्गीयांना असलेल्या २७ टक्के आरक्षणापैकी २० टक्के आरक्षण एकट्या भंडारी समाजासाठी हवे. यासाठी समाजाची जनगणना केली जावी, अशी मागणी आहे. १५ लाख लोकसंख्येच्या गोव्यात ५ लाख भंडारी आहेत. मात्र, त्यांना प्रत्यक्षात १.४ टक्केच आरक्षण वाट्याला येते.
कोणाचे आरक्षण कमी करा अशी आमची मागणी नाही, असे नमूद करून नाईक यांनी सांगितले, की तमीळनाडूत ६९ टक्के, गुजरातमध्ये ५१ टक्के, कर्नाटकात ५१ टक्के तर गोव्यात केवळ ४१ टक्के आरक्षण आहे. याचा अर्थ वाढीव आरक्षण देण्यासाठी जागा आहे. गोमेकॉतील २०० जागांपैकी इतर मागासवर्गीयांना ५४ जागा मिळतात. मात्र, ओबीसींत १९ समाज असल्याने भंडारी समाजाला केवळ तीनच जागा मिळतील. राज्याच्या सकल उत्पादनात भंडारी समाजाचा ३३ टक्के वाटा आहे. त्या तुलनेत सरकारकडून परतावा मिळत नाही. गोमेकॉत पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात अचिकीत्सिय पदे ओबीसींसाठी राखीव आहेत, तर चिकीत्सिय पदे राखीव हवीत, अशी मागणी आहे. यावेळी त्यांनी सरकारच्या दबावामुळे समाजाचे नेते न्याय्य मागण्या मांडण्यासाठी पुढे येत नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.
समांतर समिती अशी...
अध्यक्ष - उपेंद्र गावकर, उपाध्यक्ष - विनय ऊर्फ अविनाश शिरोडकर, संदीप वेर्णेकर. महासचिव - हनुमंत नाईक, सचिव - विष्णू ऊर्फ आकाश गावणेकर, उमेश नाईक. खजिनदार - दिलीप नाईक, सहखजिनदार - विनोद नाईक, कार्यकारिणी सदस्य - उमेश तळवणेकर, शरद चोपडेकर, गोरखनाथ केरकर, प्रभाकर मांद्रेकर, शिवदास माडकर, दामोदर नाईक (सांगे) आणि व्यंकटराय नाईक.
पॅटर्न जुना; सदस्य नवे
२०१२ ते २०१८ पर्यंत भंडारी समाजाच्या अशाच दोन समित्या अस्तित्वात होत्या. त्यामुळे त्यात नवे काही नाही. तालुका, ग्राम समित्या निवडल्या जातील. महिला व युवा समिती निवडली जाईल. याशिवाय डॉक्टर, अभियंता, अधिकारी, शिक्षक यांचे विभाग स्थापन केले जातील, असे उपेंद्र गावकर यांनी सांगितले.
नव्या समितीचे उद्दिष्ट
उपेंद्र गावकर यांनी सांगितले, की २०२७ ची विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून समिती काम करेल.
या निवडणुकीत जास्तीत जास्त भंडारी समाजाचे आमदार निवडून आणले जातील.
रोहिदास नाईक, अनिल होबळे, अशा सर्वांना सोबत घेतले जाईल.
समाजात झांटये, वेळीप, जोशी आडनावाचे लोक आहेत. सर्वांना एकत्र केले जाईल.
समाजात जन्माला आलेली व्यक्ती ही समाजाची सदस्य, अशी मोहीम राबवली जाईल.
नवी समिती समाज सदस्यांना जात प्रमाणपत्र घेण्यासाठी आवश्यक ते दाखले जारी करणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.