गोव्याच्या रक्षणासाठी एकजुटीने पेटून उठणे गरजेचे! 'सडेतोड नायक' कार्यक्रमातील सूर : राजकारण्यांचे भवितव्य जनतेच्या हातात

Save Goa movement: आज राज्यातील समुद्रकिनारे, येथील उद्योग गोमंतकीयांच्या हातात राहिलेले नाहीत. आपला निसर्गसंपन्न, शांत, सुशेगाद गोवा आता कुठेतरी हरवत चालला आहे

पणजी: आज राज्यातील समुद्रकिनारे, येथील उद्योग गोमंतकीयांच्या हातात राहिलेले नाहीत. आपला निसर्गसंपन्न, शांत, सुशेगाद गोवा आता कुठेतरी हरवत चालला आहे; परंतु हा शांत गोवा जर आम्हाला सांभाळायचा असेल आणि त्याचे रक्षण करायचे असेल तर आम्ही गोमंतकीयांनी एकजुटीने पेटून उठले पाहिजे. आम्ही गोवा विकायला काढलेला नाही, हा स्पष्ट संदेश परप्रांतीय आणि दिल्लीकरांना कणखरपणे देणे गरजेचे असल्याचे मत ॲड. रविराज चोडणकर यांनी व्यक्त केले.

‘गोमन्तक टिव्ही’वरील संपादक-संचालक राजू नायक यांच्या ‘सडेतोड नायक’ कार्यक्रमात चोडणकर बोलत होते. या कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्ते रोशन माथियास, सावियो रॉड्रिग्स आणि रवी हरमलकर हे सहभागी झाले होते.

गावांमध्ये उभारले जाणारे हजारो फ्लॅट कोणासाठी?

गोव्याची लोकसंख्या ही १७ लाख आहे; परंतु गोव्यात पर्यटनासाठी येणाऱ्यांची संख्या याहून तीनपट अधिक आहे, ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. आज गावांमध्ये हजारो फ्लॅट उभारले जात आहेत ते कोणासाठी? या हजारो फ्लॅटमध्ये राहणाऱ्या लोकांसाठी आवश्‍यक असणारे पाणी, वीज व इतर साधनसुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत का? ३० वर्षांपूर्वी जे मुंबईत घडत होते ते आज गोव्यात घडत आहे. या सर्व प्रकारांना आळा घालायचा असेल तर गोव्यातील जनतेने जागृत व्हायला हवे. या प्रकारांविरुद्ध एकजुटीने लढा द्यायला हवा. केवळ आपल्या मतदारसंघापुरते लढे उभारून काही होणार नाही, तर संपूर्ण गोव्याच्या संरक्षणासाठी लढा उभारणे गरजेचे असल्याचे मत सावियो रॉड्रिग्स यांनी व्यक्त केले.

‘किनारी’ पंचायतींकडे अफाट पैसा!

हडफडे-नागवा पंचायतीची वहन क्षमता वाढल्याचे आमदार मायकल लोबो सांगत आहेत, ही विधानसभा निवडणूक जवळ आल्याची चिन्हे आहेत. ज्यावेळी एखादा स्थानिक व्यावसायिक परवाने आणि इतर बाबींसाठी पंचायतीमध्ये जातो त्यावेळी त्याला कोणताही परवाना मिळत नाही; परंतु त्याच ठिकाणी जर एखादा परप्रांतीय जात असेल तर त्याला तत्काळ परवाने दिले जातात. किनारी पंचायतींकडे अफाट पैसा आहे. जमीन रूपांतरे मोठ्या प्रमाणात होत आहेत, याला जर आळा घालायचा असेल तर वारंवार निवडून येणाऱ्या नेत्यांचा पाडाव करणे गरजेचे असल्याचे मत रवी हरमलकर यांनी व्यक्त केले.

भव्य इमारती; साधनसुविधा नाहीत!

माझ्या गावात भव्य इमारत उभारली आहे; परंतु साधनसुविधेच्या नावावर ३ मीटर रस्ता समोरून जात आहे. मायकल लोबो यांचे डोळे आता निवडणूक जवळ आल्याने उघडले आहेत. गोवेकर जमीन विकतात; कारण राज्यात बेरोजगारी वाढली आहे. लोकांना नोकरी मिळणे कठीण होत आहे. कुटुंब चालवायचे कसे? या प्रकारांविरोधात आपल्याविरोधात गेल्यास धमकावणे आदी त्रासांना सामोरे जावे लागते. त्यामुळे जनतेने जागरूक होऊन निवडणुकीच्या माध्यमातून गोव्याच्या हितासाठी चांगले काम करणाऱ्यांना निवडून देणे गरजेचे असल्याचे मत रोशन माथियास यांनी व्यक्त केले.

ठोस भूमिका घ्यावीच लागेल!

ॲड. रविराज चोडणकर म्हणाले, ज्यावेळी चिंबल आणि कारापूरवासीय एकजुटीने प्रकल्पांच्या विरोधात उभे राहिले त्यावेळी ते प्रकल्प रद्द करण्यात आले. आज गोव्यातील उद्योगांमध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय आहेत. परप्रांतीय कामगार येतो त्यावेळी तो आपल्या कुटुंबाला घेऊन येतो, त्यामुळे आम्हाला जर गोव्याची वहन क्षमता कमी करायची असेल तर काही ठोस भूमिका घ्यावीच लागेल. प्रत्येकवेळी राजकारण्यांना दोष देता येणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com