डिचोली: मये भागात मिरची पिकावर ‘चुरडा मुरडा’ व्हायरसचा प्रादुर्भाव झाला असतानाच, तालुक्यातील कारापूर भागात मात्र शेतकऱ्यांसमोर वेगळेच संकट उभे ठाकले आहे. कारापूरमधील मळ्यांमध्ये पाणी घुसल्याने हे मळे पाण्याखाली आले आहेत.
पाण्यामुळे मिरचीसह भाजी पीक कुजून या पिकाची प्रचंड प्रमाणात नासाडी झाली आहे. यंदा मिरची आणि भाजी पीक मातीमोल झाल्यातच जमा असून, शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ‘तिळारी’च्या कालव्यातील पाणी घुसून पिकाची नासाडी झाली आहे. कारापूरमधील ‘कोनगो’ या नावाने ओळखण्यात येणाऱ्या शेतजमिनीत दरवर्षी स्थानिक शेतकरी ‘पोरसू’ लागवड करतात. यंदाही जवळपास ६० शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात मिरचीसह भाजी लागवड केली आहे. ‘पोरसू’ पीक बहरात येण्याच्या वाटेवर असतानाच, मळ्यांमध्ये पाणी घुसत आहे. सर्वणहून कारापूरपर्यंत पोहोचलेल्या ‘तिळारी’च्या कालव्याला जोडून असलेल्या पाटातून पाणी मळ्यांमध्ये घुसत आहे, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे. या पाण्याचा बंदोबस्त करण्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे नियमितपणे पाणी मळ्यांमध्ये घुसत आहे. यापूर्वी अशी आपत्ती ओढवली नव्हती, असेही शेतकऱ्यांनी सांगितले.
कारापूरमधील बहुतेक महिला शेतकरी बाजारात भाजी आणि मिरची विकून उदरनिर्वाह करतात. पाण्यामुळे यंदा मात्र मळ्यांमध्ये केलेली लागवड पूर्णपणे मातीमोल झाली आहे. यंदा बाजारात सोडाच घरात खायलाही भाजी आणि मिरची मिळणार नाही, अशी कैफियत अशोक कवळेकर आणि रुक्मिणी घाडी या शेतकऱ्यांनी मांडली. तर सरकारने लक्ष घालून आमच्यावरील संकट दूर करावे, अशी मागणी राधा कवळेकर यांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.