Goa water shortage problem
डिचोली: बार्देश तालुक्यात निर्माण झालेली पाणीबाणी ही भविष्यातील धोक्याची चाहूल आहे. मानवनिर्मित आघात, त्यातच संवर्धन करण्याकडे झालेले दुर्लक्ष यांमुळे नद्यांसह जलस्रोतांचे अस्तित्व पूर्णत: संकटात आले असून, भविष्यात डिचोलीसह उत्तर गोव्यावर जलसंकटाची मोठी आपत्ती ओढवण्याचा धोका असल्याची भीती पर्यावरण अभ्यासक राजेंद्र केरकर यांनी व्यक्त केली.
डिचोलीची जीवनदायिनी असलेल्या नदीची तर अक्षरशः गटारगंगा झाल्यागत स्थिती झाली असून, अस्तित्वासाठी या नदीचा संघर्ष सुरू आहे, असे मत प्रा. केरकर यांनी व्यक्त केले.
तिळारी कालव्याला भगदाड पडल्यानंतर बार्देश तालुक्यात पाणीबाणी निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. ३१) डिचोलीत पत्रकारांशी संवाद साधताना प्रा. राजेंद्र केरकर यांनी नद्यांसह आमठाणे जलाशयाच्या अस्तित्वाबद्धल खंत व्यक्त केली. गोवा मुक्तीनंतर नद्यांसह जलस्रोतांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने सरकारकडून आवश्यक ती कोणतीही उपाययोजना केलेली नाही. त्यामुळे जलस्रोतांचे अस्तित्व पूर्णत: धोक्यात आले आहे, अशी खंत प्रा. केरकर यांनी व्यक्त केली. कर्नाटकसह महाराष्ट्र सरकारकडूनही गोव्याचे पाणी वळविण्याचे प्रयत्न होत आहेत. हा प्रकार वेळीच रोखला नाही तर भविष्यात जनतेवर पाण्यासाठी अश्रू गाळण्याची वेळ येणार आहे, अशी भीती प्रा. केरकर यांनी व्यक्त केली आहे.
०.७ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ असलेल्या आणि उत्तर गोव्याची तहान भागविणाऱ्या आमठाणे जलाशयाची स्थितीही अत्यंत चिंताजनक बनली आहे. भविष्याची गरज ओळखून या जलाशयाची क्षमता वाढविण्याची गरज आहे. जलाशयाच्या देखभालीकडे कसे दुर्लक्ष झाले आहे, त्याचे ज्वलंत उदाहरण गेट उघडताना स्पष्ट झाले. या जलाशय परिसरातील पाणलोट क्षेत्राचे संवर्धन करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. बेसुमार वृक्ष संहारामुळे जलधारण क्षमता कमी होत चालली आहे. त्यामुळे भविष्यात जलाशयातील पाणी पुरवठ्यावर मोठी समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला असल्याची भीतीही प्रा. केरकर यांनी व्यक्त केली आहे.
महाराष्ट्रातील तळेखोल भागातून उगम झालेली आणि मांडवी नदीला मिळालेली डिचोलीतील नदी एकेकाळी जलमार्गाचे प्रभावी साधन होते. मात्र, आता या नदीवर मानवनिर्मित आघात झाला आहे. या नदीचे उगमस्रोत नष्ट झाले आहे. खनिज गाळ आदी कचरा साचल्याने या नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. चोर्ला घाटातून उगम झालेल्या आणि २१.५ किलोमीटर अंतर असलेल्या वाळवंटी नदीचेही अस्तित्व संकटात आहे. या नदीवर दोन पाणी प्रकल्प अवलंबून आहेत. वाळवंटी नदी ही प्रामुख्याने सत्तरीसह डिचोली तालुक्याची जीवनदायिनी आहे. मात्र, या नदीचे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे भविष्यात जलसंकट निर्माण होण्याची भीती आहे, असे मत प्रा. केरकर यांनी व्यक्त केले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.