पणजी: गोव्यातील १६,००० लिटर मोफत पाणी योजना जी अलीकडेच बंद करण्यात आली आहे, ती पुन्हा सुरू करण्यात यावी, अशी ठाम मागणी ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केली आहे. उलट ज्या अधिकाऱ्याने एक व्यक्तीला दोन नळ जोडणीचे मीटर दिले, त्याच्यावर कारवाई करा, या मागणीसाठी ‘आप’ने बुधवारी भाजप कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडले.
पालेकर यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले, मुख्यमंत्री जर पाणी चोरले जाते, असे म्हणत असतील, तर ज्यांनी चोरले त्यांच्यावर कारवाई करावी. दोन पाण्याचे मीटर कसे दिले गेले, याचा तपास करावा आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. काहीजण योजनेचा गैरवापर करतात म्हणून संपूर्ण गोमंतकीय जनतेला चोर ठरवणे हा अपमान आहे.
पालेकर म्हणाले की, मुख्यमंत्री योजना बंद करत आहेत, पण चुकीचे मीटर लावण्यास परवानगी देणाऱ्यांवर मात्र कारवाई करत नाहीत. ही योजना जनतेच्या हिताची होती, ती पुन्हा सुरू करणे आवश्यक आहे.
केवळ मागणी नव्हे, तर क्रांती!
आप आमदार व्हेन्झि व्हिएगस यांनी सांगितले की, ही योजना बंद करणे म्हणजे गोमंतकीय जनतेवर अन्याय आहे. आमचे आंदोलन केवळ मोफत पाण्यासाठी नाही, तर या भ्रष्ट भाजप सरकारविरोधात सुरू झालेली क्रांती आहे. ही क्रांती ते सरकार बदलल्याशिवाय थांबणार नाही.
सरकार गोमंतकीयांविरोधी!
आमदार क्रुझ सिल्वा यांनीही सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, हे भाजप सरकार लोकविरोधी धोरणे आणते. त्यांनी आमची जमीन बाहेरच्यांच्या घशात घातली आहे. त्यांनी गोमंतकीय ओळख उद्ध्वस्त केली आहे. आता वेळ आली आहे की आपण सर्वजण ठाम निर्धार करून हे सरकार घरी पाठवूया, असे त्यांनी आंदोलनात ठणकावून सांगितले.
भाजप कार्यालयाबाहेर पोलिस बंदोबस्त
आपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पणजीतील भाजप कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जमाव नियंत्रित ठेवण्यासाठी पोलिसांची उपस्थिती ठिकठिकाणी होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.