
सिंधुदुर्ग: मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून अखेर केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी गंभीर भूमिका घेतली आहे. महामार्गावरील वाढत्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढत असून, नागरिकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या परिस्थितीकडे गांभीर्याने पाहत राणेंनी महामार्गाबाबत ठोस सूचना दिल्या आहेत.
राणेंनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. यामुळे अपघात वाढले असून, काही ठिकाणी मृत्यूदेखील झाले आहेत. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या ठेकेदारांवर कडक कारवाई करा. दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घ्या आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी महामार्ग सुरळीत करा."
बैठकीत राणेंनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हा प्रशासनाला खड्डे दुरुस्तीच्या कामाला तातडीने सुरुवात करण्याचे आदेश दिले. त्यांनी पुढे सांगितले की, केवळ तात्पुरते काम न करता दर्जेदार व टिकाऊ काम व्हावे, याची जबाबदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी. महामार्गावर वाहतूक सुरळीत राहणे आणि नागरिकांचा जीव वाचणे याला प्राधान्य द्यावे, अशी सूचना त्यांनी केली.
या बैठकीला रत्नागिरी जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे तसेच सार्वजनिक बांधकाम महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कोकणात गणेशोत्सव हा सर्वात मोठा आणि भावनिक सण. या काळात लाखो चाकरमानी आपल्या गावी येतात. पण महामार्गावरची ही दयनीय अवस्था पाहता प्रवास म्हणजे संकट वाटू लागलंय. वाहनांची लांबच लांब रांग, वेळेत पोहोचण्याचा तणाव आणि जीव धोक्यात घालून प्रवास करणं हे चाकरमान्यांचं दरवर्षीचं वास्तव बनलं आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.