

धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात उघडकीस आलेल्या कथित दूध भेसळ प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. पोलिस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या (FDA) संयुक्त तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांत मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर करून सिंथेटिक दूध तयार करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. तपास यंत्रणांनी जप्त केलेल्या कागदपत्रांमधून लाखो लिटर कृत्रिम दूध तयार करण्यात आल्याचे संकेत मिळाले आहेत.
तपासादरम्यान आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या विक्री नोंदवहीच्या विश्लेषणातून मोठ्या प्रमाणावर निकृष्ट दर्जाच्या दूध पावडरचा वापर झाल्याचे समोर आले. या साहित्याच्या आधारे सुमारे 23 लाख लिटरहून अधिक सिंथेटिक दूध तयार करण्यात आल्याचा अंदाज आहे. याची बाजारातील किंमत तब्बल 9 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे.
याहून गंभीर बाब म्हणजे, प्रत्येक 100 लिटर शुद्ध दुधामध्ये सुमारे 10 लिटर सिंथेटिक दूध मिसळून पुरवठा केला जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या प्रमाणानुसार राज्यभरात 2.3 कोटी लिटरहून अधिक भेसळयुक्त दूध वितरित झाल्याची शक्यता तपास यंत्रणा तपासत आहेत.
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, कृत्रिम दूध नैसर्गिक दिसावे आणि त्यातील फॅटचे प्रमाण टिकवण्यासाठी डिटर्जंट पावडर, पाम तेल आणि निकृष्ट दर्जाची रासायनिक पावडर वापरली जात असल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे ग्राहकांच्या आरोग्याशी गंभीर खेळ झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
अशा रासायनिक मिश्रणाचे दीर्घकाळ सेवन केल्यास यकृत, मूत्रपिंड आणि पचनसंस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात. विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी हे अधिक धोकादायक ठरू शकते.
या प्रकरणात सात जणांविरोधात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून, अद्याप सर्व आरोपी फरार असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले असून, विविध ठिकाणी छापेमारी सुरू आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, कारवाईदरम्यान 61 पोती संशयित भेसळयुक्त दूध पावडर जप्त करण्यात आली. प्राथमिक चौकशीत ही पावडर भूम परिसरातील अनेक डेअरी युनिट्सना पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. तसेच या रॅकेटमध्ये काही दूध संकलन केंद्रांचाही सहभाग असल्याचा संशय तपास यंत्रणा व्यक्त करत आहेत. हा संपूर्ण व्यवसाय जनावरांच्या खाद्याच्या नावाखाली चालवला जात असल्याचीही माहिती तपासात समोर आली आहे.
अन्न सुरक्षा कायद्यानुसार, जीवाला धोका निर्माण करणारी दूध भेसळ सिद्ध झाल्यास संबंधित आरोपींना 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. तपास पूर्ण झाल्यानंतर या प्रकरणातील संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता असून, राज्यभरातील दूध पुरवठा व्यवस्थेवरही यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.