
कोकण म्हणजे निसर्गाची खाण, यो कोकणच्या कुशीत समुद्रकिनारे, डोंगररांगा, गर्द झाडं, ओहळ, झरे, आणि डोंगर उतारांवर अनेक छोटी गावं वसलेली आहेत. निसर्गसंपन्नतेच्या या प्रदेशात शेती हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आणि या शेतीचा खरा उत्सव असतो तो म्हणजे भात लावणीचा हंगाम. कोकणातील लोकजीवन, संस्कृती आणि नातेसंबंध यांचं हे अनोखं प्रतीक आहे.
पहिल्या पावसाच्या सरी कोकणात बरसल्या की मातीचं मन खुलतं. शेतकरी सज्ज होतो भात लावणीसाठी. माती ओली होते, काळीशार शेती पुन्हा जिवंत होते. जुन्या काळी बैलजोडीच्या मदतीने नांगरणी केली जात असे, माळातून बैल हाकत शेतकऱ्याचं आणि बैलांचं अतूट नातं दिसत असे. आज काळानुसार ट्रॅक्टर आले, आधुनिक यंत्रे आली, तरी मातीशी असलेलं नातं मात्र तसंच राहिलं आहे.
नांगरणीनंतर पेरलेलं भाताचं बी अंकुरतं, आणि शेतकऱ्याच्या डोळ्यात आशेची पालवी फुलते. पेरणीच्या काही दिवसांनी भात रोपं उगम पावतात. लहानशी ही रोपं वाऱ्यावर डुलत असतात आणि मग सुरु होते खरी धामधूम भात लावणीची!
भात लावणी म्हणजे केवळ शेती नव्हे, तर गावकुसातील साऱ्या माणसांचा सोहळा असतो. शेतकरी, घरची माणसं, शेजारी, मित्र-मैत्रिणी, अगदी वडीलधारी मंडळीही या कामात सामील होतात. सकाळी लवकर शेतात पोहोचणं, अंगाला माती आणि चिखल लागणं, थेट मातीत पाय रुतवून उभं राहणं. या साऱ्यात एक वेगळीच मजा आहे.
कोणीतरी भात रोपं ओढून देतो, कोणी त्या रोपांची मोळी बांधतो, आणि मग लावणीकरीण त्या मृदू मातीमध्ये प्रेमाने ती रोपं लावतात. महिला मंडळ गाणी म्हणत लावणी करतात, लावा लावा भात रोपं असं म्हणताना त्यांच्या सुरांत श्रमाचं आणि आनंदाचं नातं उमटतं. तर पुरुष मंडळी गप्पा मारत, हसतखेळत, एकमेकांना मदत करत लावणीचं काम करतात.
या काळात गावातले वाद, भांडणं विसरली जातात. एकोप्याचं, मैत्रीचं, आणि आपुलकीचं नातं फुलतं. कोकणातील माणसाच्या हृदयातली ही माणुसकीचं झाड फुलताना लावणीच्या माळावर दिसतं.भात लावणीचं काम हे शरीराला दमवणारं असतं.
उन्हं, पाऊस, मातीचा चिकटपणा या साऱ्यांतूनही कोकणातील माणूस हसतमुखाने काम करतो. अंगावर चिखलाचे डाग, हातांना मातीचा वास, आणि चेहऱ्यावर तृप्त हास्य हे चित्र दरवर्षी कोकणातल्या शेतांमध्ये दिसतं. लावणीच्या वेळी एकमेकांना मदत करणं, गमतीजमती करणं, गाणी म्हणणं, आणि मधूनच एखाद्या वाक्यावर हसणं या साऱ्यांतून श्रमांचं ओझं कमी होतं आणि त्यात आनंद मिसळतो.
लावणीच्या दिवशीचा खास क्षण म्हणजे श्रमानंतरचा जेवणाचा पंगत. साधा पण प्रेमाचा अस्सल बेत नाचणीच्या किंवा भाकरी, पिठलं, ठेचा, भजी, कोशिंबीर आणि गरमागरम भात. श्रमाने थकलेल्या अंगातही या जेवणाने नवसंजीवनी येते. सगळे एकत्र बसून जेवण करतात, आणि त्या क्षणी श्रीमंत, गरीब, वयस्कर, तरुण असा भेद कुठेच उरत नाही. ही पंगत केवळ पोट भरण्याचा भाग नसून गावकुसातील बंध नक्कीच घट्ट करते.
आज यांत्रिकीकरणामुळे अनेक ठिकाणी भात लावणीची कामं सोपी झाली आहेत. ट्रॅक्टर, पावर टिलर, रोप लावणी मशीन यांचा वापर होतो आहे. पण तरीही कोकणात अनेक ठिकाणी पारंपरिक पद्धतीने भात लावणी केली जाते.
कारण भात लावणी हा केवळ एक शेतीचा हंगाम नाही, तो एक मानवी भावना, सामाजिक बंध, आणि परंपरेचा भाग आहे. या परंपरेतून मिळणारी एकोपा, श्रमसंस्कार आणि निसर्गाशी असलेली नाळ अजूनही कोकणातल्या शेतीत जिवंत आहे.
कोकणातला पाऊस, भात लावणीचा मातीचा गंध, शेतामधील श्रमांची अनुभूती, आणि लोकांच्या मनातली आपुलकी हे सर्व अनुभवणं म्हणजे कोकणाला खरंखुरं जाणून घेणं.
भात लावणी पाहण्यासाठी किंवा त्यात सहभागी होण्यासाठी अनेकजण आता पर्यटनाच्या दृष्टीनेही कोकणात येतात. शेतीपर्यटनाचं हे नवं रूप कोकणात आकार घेत आहे. शहरी लोकांसाठी हा अनुभव नवाच असतो शेतात पाय रुतवून काम करणं, मातीत खेळणं, श्रमांचं मोल जाणणं आणि निसर्गाशी जवळचं नातं जडणं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.