
रत्नागिरी आणि कोल्हापूर जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या संगमेश्वर-आंबा घाट मार्गावर आज (१५ ऑगस्ट) सकाळी मोठी दरड कोसळली. ही घटना घाटातील अतिधोकादायक वळणावर घडल्याने वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.
दरड कोसळल्यामुळे रस्त्याच्या एका बाजूवर मलब्याचा प्रचंड ढीग साचला असून, वाहतुकीचा वेग कमी झाला आहे. स्थानिकांच्या माहितीनुसार, सकाळपासूनच त्या भागात दगड-गोटे घसरून पडत होते आणि दरड कोसळण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अखेर काही तासांनंतर मोठ्या प्रमाणावर माती व दगड खाली पडले.
सध्या रस्त्याचा एक भाग वाहतुकीसाठी बंद असून, वाहनचालकांना अत्यंत सावधगिरीने व कमी वेगाने प्रवास करण्याचे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले आहे.
दरड कोसळल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली असून, घाटातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. या मार्गावरून रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांचा मोठा ओघ असतो. त्यामुळे या घटनेचा परिणाम मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवरही झाला आहे.
दरम्यान, पावसाळ्यात आंबा घाटातील धोकादायक वळणांवर दरड कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. त्यामुळे संबंधित विभागाने अशा भागांमध्ये सतत देखरेख ठेवावी आणि आवश्यक ती दुरुस्तीची कामे तातडीने करावीत, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.