IND vs AFG: शतक रोहितचं, पण चर्चा विराट-नवीनची! चाहत्यांना झाली स्मिथची आठवण, पण का? वाचा सविस्तर

Virat Kohli-Naveen-ul-Haq: विराट-नवीनचं पॅचअप! IPL चा वाद वर्ल्डकपमध्ये थांबला अन् चाहत्यांना झाली स्मिथची आठवण
Virat Kohli | Naveen ul Haq | Steve Smith
Virat Kohli | Naveen ul Haq | Steve SmithDainik Gomantak
Published on
Updated on

ICC ODI World Cup 2023, India vs Afghanistan, Virat Kohli-Naveen-ul-Haq Spirit of Cricket: बुधवारी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारत आणि अफगाणिस्तान संघात दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारताने रोहित शर्माच्या शतकाच्या जोरावर 8 विकेट्सने सहज विजय मिळवला.

दरम्यान, भारताच्या या विजयाबरोबरच विराट कोहली आणि नवीन-उल-हक यांनी दाखवलेल्या खिलाडूवृत्तीचीही बरीच चर्चा झाली.

खरंतर याच वर्षी आयपीएल 2023 स्पर्धेदरम्यान 1 मे रोजी झालेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स स्पर्धेदरम्यान विराट आणि नवीन यांच्यात मोठा वाद झाला होता.

त्या सामन्यात हे दोन्ही खेळाडू एकमेकांना भिडले होते, तसेच त्यानंतरही सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्यानेही त्यांचे वाद सर्वांसमोर आले होते.

त्यामुळे त्या वादाचा परिणाम बुधवारी भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघातील सामन्यातही पडणार का, असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. मात्र, या सामन्यादरम्यान भारताचा स्टार खेळाडू विराट आणि अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीनने त्यांच्यातील वाद मिटवल्याचे दिसले.

झाले असे की विराट फलंदाजीला करत असताना नवीन गोलंदाजीला आल्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांकडून त्याची खिल्ली उडवली जात होती.

ते पाहून विराटने फलंदाजी करताना थांबून हातवारे करत प्रेक्षकांना असे न करण्याचे सांगितले. त्याची ही खिलाडूवृत्ती पाहून अनेकांनी त्याचे कौतुक केले.

तसेच सामन्यानंतरही हे दोन्ही खेळाडू झाले गेले ते विसरून एकमेकांना भेटले. त्यांनी यावेळी एकमेकांशी बोलून गळाभेटही घेतल्याचे दिसले. तसेच दोघेही हसताना दिसत होते. त्यावरून तरी त्यांच्यातील वाद मिटल्याचे स्पष्ट झाले.

या घटनांचे व्हिडिओ आयसीसीने सोशल मीडियावर देखील पोस्ट केले असून त्यावर चाहत्यांकडून विविध प्रतिक्रिया उमटत असून अनेकांनी यावर आनंदही व्यक्त केला आहे.

चार वर्षांपूर्वीची आठवण ताजी

दरम्यान, या घटनेने चाहत्यांना 4 वर्षांपूर्वीच्या घटनेची आठवण झाली आहे. 2019 वर्ल्डकपमध्ये स्टिव्ह स्मिथ चेंडू छेडछाडीच्या प्रकरणामुळे आलेली बंदी पूर्ण करून पुनरागमन करत होता. त्यावेळी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामन्यादरम्यान स्मिथची त्या प्रकरणावरून प्रेक्षकांकडून टिंगल केली जात होती.

त्यावेळीही विराटने पुढे येत प्रेक्षकांना असे न करण्याबद्दल सांगितले होते. त्यामुळे विराट आणि स्मिथ यांचे अनेक वर्षांपूर्वी बिघडलेले संबंध सुधारल्याचे दिसून आले होते. विशेष म्हणजे त्यावेळी विराटने केलेल्या या कृतीला 2019 मधील सर्वोत्तम खिलाडूवृत्ती म्हणून आयसीसीचा पुरस्कारही मिळाला होता.

दरम्यान, बुधवारी झालेल्या सामन्याबद्दल सांगायचे तर अफगाणिस्तानने  हश्मतुल्लाह शाहिदी आणि अझमतुल्लाह उमरझाई यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारतासमोर 273 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग भारताने ३५ षटकात २ विकेट्स गमावत सहज पूर्ण केला. भारताकडून रोहित शर्माने 84 चेंडूत 16 चौकार आणि 5 षटकारांसह 131 धावांची खेळी केली. तसेच विराटने नाबाद 55 धावा केल्या. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने 4 विकेट्स घेतल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com